Monday, January 5, 2009

आत्मचरित्रे ही सर्वसाधारणपणे आत्मसमर्थनार्थ लिहीली जातात, असे जयवंत दळवींचे मत होते. खरेखुरेआत्मचरित्र लिहिण्याचे धैर्य नसेल तर भल्या माणसाने आत्मचरित्र लिहू नये असेही ते म्हणत असत.
प्रस्तुतच्या पुस्तकात दळवींच्या आत्मपर लेखांचे विलोभनीय दर्शन घडते. मत्स्याहार प्रिय असलेले रसिकखवय्ये म्हणून त्यांचे दर्शन ' माझे खाणेपिणे माझा मत्स्यावतार ', 'अनंताश्रम' ,'भंडारी हॉटेल' यांसारख्या लेखांतून घडते. कुटुंबातले दळवी 'माझ्या कुटुंबात मी' मधून उभे रहातात. 'दादरचे दिवस', 'आठवणीतली वास्तू' यांसारखे लेख त्यांच्यातील व्रात्य मुलाची आठवण करून देतात. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' यासारख्या लेखातून ते आपल्या मृत्युकडे ज्या खेळकरपणाने पहातात, आणि जय विनोदी ढंगात पेश करतात, ते अविस्मरणीय आहे. नाट्यक्षेत्रातल्या स्वःताच्या पडेल पदार्पणावरही ते तेवढ्याच खेळकरपणाने लिहितात. 'धी वर्ल्ड इज लाइक धिस' हा युसिसमधील नोकरीच्या काळातील अमेरिकन अधिकारयांविषयीचा लेख वैशिष्ट्यपूर्ण आहे. 'माझ्यासाहित्यातील धर्म' 'देहधर्म', 'चक्र' शी नसलेला संबंध' या लेखांतून साहित्यिक दळवींचे दर्शन घडते.
दळवींची शैली ही अत्यंत पारदर्शक आहे. दळवींच्या आयुष्यातील व्यक्ती-घटना-प्रसंग या विषयींचे हे मार्मिकलेखन गजालीच्या स्वरूपात वाचकांसमोर उलगडत जाते आणि वाचक त्यात गुंतत जातो.

आत्मचरित्राऐवजी
-जयवंत दळवी
सौजन्य: मॅजेस्टिक प्रकाशन

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...