Saturday, April 30, 2011

सौजन्य : अतुल माने,दै.लोकसत्ता
अद्भुत, उत्कंठावर्धक तसेच क्षणाक्षणाला श्वास रोखून धरण्याची जबरदस्त ताकद असलेल्या रहस्यकथांच्या माध्यमातून तमाम वाचकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडविणारे ‘रहस्यकथांचे शहेनशहा’ म्हणून परिचित असणारे ज्येष्ठ साहित्यिक गुरुनाथ नाईक यांनी तब्बल १२०४ कादंबऱ्यांचा टप्पा पार करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आपल्या रहस्यकथांनी उभ्या महाराष्ट्राला एकेकाळी वेड लावणाऱ्या नाईक यांची ही झेप कौतुकास्पद असली तरी शासनदरबारी मात्र त्याची कोणालाच दखल घेण्याची गरज भासली नाही. आज वयाच्या सत्तरीतही नाईक यांची लेखणी तेवढय़ाच जोमाने व उत्साहाने सुरूच आहे. यापूर्वी १०९२ कादंबऱ्यांचा विक्रम रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या नावावर होता. विशेष म्हणजे, गुरुनाथ नाईक यांनी तेवढय़ाच दमदारपणे पत्रकारितेमध्येही समर्थपणे वाटचाल केली आहे.
वयाच्या ३२ व्या वर्षी पुण्यात एक इंग्रजी चित्रपट पाहताना भन्नाट कथा लिहिण्याचा फंडा डोक्यात भिनला आणि चित्रपट अर्धवट सोडून नाईक आपल्या खोलीत गेले आणि रात्रभर जागून त्यांनी ‘चुंबन’ ही मृत्यूकडे नेणारी पहिली रहस्यकथा लिहिली. आणि विशेष म्हणजे त्याच झपाटय़ात त्यांनी त्याच दिवशी ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी रहस्यकथाही लिहिली. तो काळ होता सत्तरीच्या दशकातला; ज्यावेळी रहस्यकथांच्या क्षेत्रात अर्नाळकरांनी आपला निर्विवाद ठसा उमटविला होता आणि जयवंत दळवी, शं. ना. नवरे, दि. बा. मोकाशी, अरविंद गोखले, सुभाष भेंडे, मधु मंगेश कर्णिक असे एकाहून एक अशा सरस कथाकारांनी आपल्या रसरशीत कथांनी मराठी वाचकांवर गारूड केले होते. याच काळात नाईक यांनीही वाचकांच्या मनावर कायमचा कब्जा केला, तो आजतागायत..
त्यांचा हा  लेखन प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला, तो तब्बल
१२ वर्षे म्हणजे एक तप. मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच डोक्याला ताण देत मनाचीही पकड घेणाऱ्या या रहस्यकथा रसिकांच्या काळजाचाच ठाव घेऊ लागल्या.
दरम्यान बाबुरावांनी आपले लेखन आवरते घेण्यास सुरुवात केली होती. या तब्बल १२ वर्षांमध्ये नाईक यांनी ७२४ रहस्यकथा तसेच गूढकथा लिहून काढल्या. यामध्ये सैनिकी जीवनावरील २५० कादंबऱ्यांचाही समावेश आहे. ‘गोलंदाज’ ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती फिरणाऱ्या १५० कथा लिहिणारे नाईक हे साहित्य विश्वामधील एकमेव लेखक आहेत. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथाप्रेमींच्या मनात आजही घर करून आहेत. ‘थेंब थेंब तेलासाठी’, धडक, सत्यमेव जयते, क्रांतिवीर या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. याच कादंबऱ्यांमधून दीपाजी राणे हे गाजलेले नाटकही रंगमंचावर साकारण्यात आले होते, तसेच कल्याणी या कादंबरीवरून एका खासगी दूरचित्रवाहिनीवर कल्याणी ही मालिकाही प्रसारित करण्यात आली होती. या व्यतिरिक्त नाईक यांनी १०० हून अधिक लघुकथा लिहिल्या आहेत. ताण असह्य़ झाल्याने नाईक यांनी १९८४ मध्ये आपले रहस्यकथांचे लेखन काही काळ थांबविले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक लेखन थांबविल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण नंतर काही काळाने त्यांनी लेखन पुन्हा सुरू केले.
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी १९५७ ते ६३ या काळामध्ये नाईक यांनी विविध विषयांवर लिखाण केले आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या नाईक यांनी पत्रकारितेमध्येही आपला ठसा उमटवला आहे. १९५६ मध्ये त्यांनी पत्रकारितेत पाऊल टाकले आणि नंतर विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी कार्यकारी संपादक, संपादक अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. अलीकडेच त्यांची ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरील ‘युद्धशास्त्राचे जनक छत्रपती शिवराय ’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. युध्दशास्त्रावर वेगळे आणि नेमके लेखन करणाऱ्यांत नाईक यांचा समावेश आहे. साहित्यक्षेत्रामध्ये आपल्या दर्जेदार आणि अद्भुत लिखाणाने वेगळा ठसा उमटविणाऱ्या नाईक यांनी कादंबऱ्या लिहिण्याचा ‘विक्रम’ केला असला तरी आजही त्याची दखल ना सरकारने, ना साहित्यविश्वाने घेतली. पण कोठेही खचून न जाता तसेच प्रसिद्धीपासून दूर राहत नाईक यांची लेखणी आजही तेवढय़ाच उत्साहात सुरूच आहे.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...