Saturday, January 15, 2011

झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे। ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीत फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथाच आहेत असे नाही तर दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे ते विश्वरूप दर्शन आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, निसर्ग,बापाचा आडमुठेपणा,आईचा होणारा अपरिमित छळ,लागोपाठ होणारी मुले,मुलांचे अपमृत्यू,शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव,तर्हा,गावातले उरूस,जत्रा,गांधीवधानंतर झालेली स्थिती...अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्र आहे. या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे. झोंबी हे आत्मचरित्र कादंबरी रूपात लिहिताना आनंद यादवांनी आपली कुणी कणव करावी अशी भूमिका घेतलेली नाही. एका सहृदय चिंतनशील माणसाने आपल्या बालपणी भोगलेल्या व्यथा इथे शब्दरूप केलेल्या आहेत. वाचकांना अस्वस्थ करण्याचं प्रचंड सामथ्र्य या कादंबरीत आहे. दारिद्र्याचे श्रीमंत चित्रण करणारी कादंबरी.
झोंबी
लेखक : आनंद यादव
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Wednesday, January 5, 2011

तसलिना नासरिनच्या कौमार्यातले उध्वस्त भावविश्व
तसलिमा नासरिन या बंगाली लेखिकेचे नाव गेली काही वर्षे जगभर गाजत आहे. सलमान रश्दीप्रमाणे तसलिमा नासरिनवरही देश सोडून जाण्याची वेळ आली. आपल्या लज्जा या कादंबरीत बंगालमधील हिंदू शेजार्यांवर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केल्यामुळे तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपली मते अभ्यासपूर्ण रीतीने, ठामपणे, निर्भीडतेने मांडणे हे तसलिमांच्या विचारसरणीचे बलस्थान आहे. तसलिमा अशा कशा घडल्या याचे उत्तर आपल्याला त्यांचे "आमार मेयेबेला' वाचून मिळते. आमार मेयेबेला म्हणजे "माझा मुलगीपणाचा काळ'. वयाच्या तेरा-चौदा वर्षापर्यतच्या आठवणी या पुस्तकात आहेत. तिचे कुटुंब या लेखनातून वाचकांपुढे उभे राहते. त्यात कोठेही उदात्तीकरण केलेले नाही. व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शनच घडवलेले आहे. तसलिमाचे वडील रजब अली डॉक्टर आहेत. देखणे, बुद्धिवादी, अहंकारी आहेत. स्वत:च्या पुरुषपणाचा त्यांना अभिमान आहे. तर आई कुरूप, कमी शिकलेली आहे. आपला नवरा कधीही आपल्याला तलाक देईल या भीतीने कायम धास्तावलेली आहे. या विजोड जोडप्याला चार मुले आहेत. तसलिमा स्वत:चे पूर्वायुष्य, त्यातील व्यक्ती, त्यांचे वागणे, बोलणे, स्वभाव विशेष याबद्दल औचित्य-अनौचित्याचे दडपण न ठेवता लिहिते. तसलिमांच्या व्यक्तिमत्त्वात आणि तिच्या पारिवारिक ताण्याबाण्याचा प्रभाव मोठाच पडलेला आहे. तसलिमांचे संवेदनशील मन पानोपानी प्रकट होते. तीच या लेखनाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रसंगातून तसलिमाचं बंडखोर व्यक्तित्व वाचकाला जागवत राहते. पृष्ठे : 295 किंमत :200
आमार मेयेबेला
मूळ लेखिका : तसलीमा नसरीन
अनुवाद : मृणालिनी गडकरी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Related Posts Plugin for WordPress, Blogger...