Monday, March 5, 2012

आयुष्याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या स्टेशनवरच्या मुलांच्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या कहाण्या सांगणारं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे अमिता नायडू यांचं पुस्तक.‘समकालीन प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं अंतरंग उलगडणारा लेख.विकासाची वाटचाल यशस्वीपणे करणाऱ्या आपल्या राज्याला-देशाला चपराक बसावी तसं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ आपल्या साऱ्यांच्याच डोळ्यात अंजन घालतं.स्टेशनवरची, प्लॅटफॉर्मवरची बेवारस किंवा घर सोडून आलेली मुलं, त्यांचं जगणं म्हणजे यातनाघर. त्यांना तुडविणारे पोलीस आणि मनातून हद्दपार करणारा
ही कलाकृती म्हणजे दहा व्यक्तिरेखांचा संग्रह नाही. प्लॅटफॉर्म- रेल्वेचे रूळ हेच जगण्याचं केंद्र बनलेल्या मुलांच्या बालपणाची ही आघात यात्रा आहे. व्यक्तिचित्र हा लेखिकेने स्वीकारलेला फॉर्म. प्रत्येकाचं इथे येण्याचं प्रयोजन निराळं. त्यांच्या शोककथा वाचकाला कासावीस करतात. मात्र परस्परांचे नातेसंबंध, त्यातील मैत्र आणि शत्रुत्वदेखील वाचकाला हर एक क्षणी थक्क करून सोडतं.




अन्थनी, बिल्लू, केक्या, मुन्ना, झहीर, राणा, किशोर आणि जग्गू, म्हाद्या, शिद्या यांच्या कहाण्या, कुणावर विस्थापनाचं संकट तर कुणी घरातल्या अत्याचाराला कंटाळलेलं. देशातल्या प्रगत-अतिप्रगत भागांतून किंवा दुष्काळी-मागास प्रदेशांतून आलेली मुलं शरीराचा-मनाचा-संवेदनांचा सांधा निखळवणाऱ्या वातावरणात तग धरून राहतात. लेखिकेने हे नकारात्मक चित्रण केलेलं नाही. भडकपणाचा- बटबटीतपणाचा रंग देऊन कुठेही ते कृत्रिमही झालेलं नाही. घटना फारशा घडत नाहीत. मात्र प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ या विशीच्या आतील, कधी कधी तर दहा-बाराच्या वयातील मुलांना कसं प्राप्त होतं यामुळे स्तिमित व्हायला होतं.


या मुलांपैकी बरीच छोटा-मोठा माल ट्रेनमध्ये विकणारी. सरकारने दिलेल्या स्टेशनजवळच्या शाळेतल्या खोलीत राहणारी. मिशनने रात्रीच्या जेवणाची सोय केल्याने खूश होणारी ही पोरं. पोलीस डिपार्टमेंट आणि वस्तीतल्या मोठय़ा पोरांना हप्ता देणारी, सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबणारी, कुणी भंगार गोळा करतं, तर कुणी मासिकं-पुस्तकं-प्लॅस्टिकच्या वस्तूंची विक्री. दिवसाला मिळणारे तुटपुंजे पैसे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी बसणारा मार. मात्र त्यातही ‘कुटुंब’ संकल्पनेला व्यापक बनविणारी ही मुलं वाचकाला अनेक गोष्टी शिकवून जातात.


या सर्व मुलांची घरं दारिद्रय़रेषेखालील, व्यसनी वडील, आई घर सांभाळणारी, आत्याची सुस्थिती पण भावाला आर्थिक मदत न करणारी, त्यात भावाचं आजारपण. त्याच्या इलाजासाठी अँथनी आत्याचे पैसे चोरतो, दवाखान्यात भरतो. आपण केला तो गुन्हा, हे लक्षात आल्याक्षणी घर सोडून पळून जातो. प्लॅटफॉर्मवर राहताना पैशाची बचत करत आत्याचे पैसे परत करून घरी जायचं हे ‘स्वप्न’ बाळगतो. जन्मापासून पांगळ्या असणाऱ्या केक्याला आजी भिकारी बनवते. त्याच्या ‘जिवावर’ खोली घेते. रोज भरपूर कमावणारा केक्या ‘भिकारी हटाव’ मोहिमेमुळे गोत्यात आल्यावर त्याला मारणारा बाप. त्याच्या माराला कंटाळून दुसऱ्या स्टेशनवर लोळत-लोंबत केक्या भीक मागतो. सोनारकाम घरी करताना एक फुंकरीने भडका उडून घर पेटणं, त्यात आई-वडील डोळ्यांसमोर जळणं, मुन्नाची जळालेली कातडी आणि पायाची चिकटलेली बोटं, घराबाहेर असल्याने वाचलेली बहीण, या बहीण-भावंडांना घराबाहेर हाकलणारा चुलता, बहिणीला एका संस्थेत ठेवून पैसे कमावण्यासाठी पळालेला मुन्ना. साथीच्या आजारात झहीरची अम्मी आणि दोन बहिणींचा झालेला मृत्यू, तो धक्का सहन न झाल्याने दारू पिऊन पिऊन स्वत:ला संपविणारे अब्बा. झहीर धाकटा. मोठय़ा बहिणीने नऊ वर्षांच्या झहीरला घरी आणलं खरं. परंतु जीजाच्या मारहाणीला कंटाळून पळालेला झहीर याच प्लॅटफॉर्मवर आलेला. सगळ्यांच्याच कहाणीत घरात बसणारा मार. अठराविश्वे दारिद्रय़, मुलांना सांभाळण्याची कुवत नसणारं कुटुंब, हा समान धागा. परंतु या साऱ्यांचा आक्रोश हे या पुस्तकाचं सूत्र नाही. त्या मुलांमध्ये असणारी व्यावहारिक दृष्टी, त्याचं एकूण वर्तन, त्याचं सरकारी अधिकारी व पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून होणारं अतोनात शोषण. या शोषणाचे असंख्य प्रकार. रेल्वे रुळावर कुणाचं बेवारस प्रेत पडलं तर याच कोवळ्या मुलांकडून उचलणं. कुठलीही चोरी-गुन्हा घडला की याच मुलांना तुडवणं, त्यांच्या कमाईत वाटा मागणं, त्यांच्या मित्रांना दुसऱ्या गटातल्या मुलांनी मारणं, हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करण्याची वेळ आल्यानंतर स्वत:च्या पैशांनी मुलांनी मागवलेल्या पदार्थावर इन्स्पेक्टर मॅडमने ताव मारणं, अधिकाऱ्यांच्या घराचं शिफ्टिंग म्हटल्यावर याच मुलांकडून सामान उचलून घेणं, बंगलेवाल्यांनी त्यांच्या घरासमोरचं गवत साफ करवून घेणं. अनेक दिवसांचे कपडे धुऊन घेणं, कुठल्याशा भाई लोकांच्या मोठय़ा मुलांच्या अत्याचाराला सातत्याने बळी पडणं, लैंगिक शोषण, हा या मुलांच्या आयुष्यातला नित्याचा भाग, हवालदार, इन्स्पेक्टर, एकूणच सरकारी यंत्रणा प्लॅटफॉर्मवरील मुलांशी ज्या अमानुषतेने वागते, त्यातून विघातक शक्तींशी या मुलांचा समेट का नि कसा घडतो हे सहजच लक्षात येतं.


सगळ्यांचंच जगणं असं उसवलेलं असलं तरी त्यात आपला विरंगुळा- आनंद शोधणारी मुलं, त्यांच्यातली शेरो-शायरी, हिंदी चित्रपटांचा प्रचंड प्रभाव, त्यातून त्यांच्या तयार झालेल्या लकबी, माणसांची होणारी पारख, खऱ्या-खोटय़ाची जाण, त्यांचं ‘लाइफ’ आपापल्या व्याख्या घेऊन आलेलं त्यांचं केवळं शरीर आणि निरागस मन अनेकांनी कुस्करून टाकल्याने थोडीफार शिल्लक राहिलेली संवेदना घेऊन जगणारी प्लॅटफॉर्मवरची मुलं.


वाचकाला या पुस्तकातील भाषा भुरळ घालते. त्या मुलांची अभिव्यक्ती.. त्यात शिव्या आहेत. हिंदी येते, पण ‘मुंबय्या.’ क्वचित त्यांची म्हणून बोली त्यात डोकावते. निवेदन आणि संवाद प्लॅटफॉर्मच्या निराळ्या हिंदीने लपेटून घेतले आहेत. भाषेचा हा लहेजा हे या पुस्तकाचं नक्कीच निराळं वैशिष्टय़ ठरेल.


शोषणकर्त्यांबरोबरच समजून घेणाऱ्या दिनेश सरांची व्यक्तिरेखा मुलांबरोबर वाचकाला दिलासा देते. शेकडो करपलेल्या मुलांची भावनिक- शारीरिक- मानसिक गरज जाणून घेणारे सर किंवा त्या मुलांच्या नातलगांपर्यंत त्यांना पोहोचवू पाहणारे अंकल. त्यांच्यासाठी या मुलांचं बाह्य़ वर्तन तिरस्करणीय नसतं, त्यांचं दिसणं, वावरणं, तोंडातल्या अर्वाच्य शिव्या, व्हिडीओ पाहणं, ‘सोल्युशन’ पिणं, तीन पत्तीचा डाव मांडणं, बिडी-सिगारेट फुंकणं, राडा करणं, चोरी करताना पकडलं जाणं या गोष्टींमुळे या मुलांबद्दलची प्रतिमा संवेदनकर्त्यांकडून खराब होण्याचा प्रश्न नसतो. दिनेश सरांना आणि अंकलना मुलांचं जगण्याचं तत्त्वज्ञान ठाऊक असतं. वाचकही या तत्त्वज्ञानाशी समरस होत जातो.


समकालीन प्रकाशनाने शोध पत्रकारितेला प्राधान्य देत गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांकडून उत्तमोत्तम साहित्य लिहवून घेतलं. हे पुस्तक याच पठडीतलं आहे. लेखिकेचा समकालीन प्रकाशन आणि युनिक फीचर्सशी जवळचा संबंध आहे. स्टेशनवर आयुष्य काढणाऱ्या मुलांबरोबरचं तिचं काम तिला पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावंसं वाटलं याची लेखिकेने काही कारणं सांगितली आहेत. भारताचं आशास्थान आणि ‘तरुण भारत’ म्हणून गौरवलं जात असलेल्या या लोकसंख्येला आपण कसं वागवत आहोत; त्यांच्याकडे, त्यांच्या गरजांकडे, हक्कांकडे कसं बघितलं जात आहे, हे सांगताना भारतातील सुमारे पन्नास कोटी मुलं जगण्याच्या संदर्भात आपलं बालपण हरवून जाताना दिसतात, असं आकडेवारीवरून ती स्पष्ट करते. आजची आपली व्यवस्था या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा, विकासाचा हक्क मिळवून देण्यात अंमलबजावणीच्या पातळीवर अपयशी ठरते. हेही लेखिका स्पष्टपणे मांडते. पण यात सर्वसामान्य सुजाण नागरिकाची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. एखाद्या बिसलेरी बाटलीसारखा या मुलांचा वापर करणारा समाजच त्यांच्या शोषणाला कारणीभूत आहे. बॉम्बस्फोट, एखादा दहशतवादी हल्ला, दंगल यांसाठी या मुलांचा जर वापर झाला तर कारणीभूत कोण, हा नक्कीच विचार करण्यासारखा भाग.


स्टेशनवर सर्वच प्लॅटफॉर्मना क्रमांक असतात. झिरो किंवा शून्य या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म अस्तित्वात नाहीच. या मुलांचा प्रवासच शून्यापासून शून्याकडे जाणारा, त्यांचा जगण्याचा प्लॅटफॉर्मच समाजाने काढून घेतलेला, या अर्थाने ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे सूचक शीर्षक. या पुस्तकातील छायाचित्रं, मुखपृष्ठ, एकूण मांडणीचं श्रेय श्याम देशपांडे यांचं. त्यामुळेच दाहक वास्तवाची जळजळीत धग वाचकाला अनुभवता येते. पुस्तकाच्या संहितेचं डॉ. सुहास कुलकर्णी आणि अमृता वाळिंबे यांनी केलेलं उत्तम संपादन या पुस्तकाला अधिक वाचनीय बनवतं. चक्रव्यूहात अडकलेल्या या मुलांची सुटका पुस्तक वाचल्यानंतर तात्काळ होणं शक्य नाही. मात्र, सुटकेचा विचार मनात आला तरी अशा पुस्तकांची उपयुक्तता जाणवेल हे नक्की.


-वृन्दा भार्गवे


प्लॅटफॉर्म नंबर झिरो 
-अमिता नायडू 
समकालीन प्रकाशन,पुणे
पृष्ठे : १५८ / मूल्य : १५० रुपये.

हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी इथे भेट द्या!

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...