Saturday, February 25, 2012


फ्रान्समध्ये शिकलेले इराणी लेखक सादिक हिदायत यांच्यावर काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात- आणि विशेषत:
‘द ब्लाइंड आऊल’ या कादंबरीत ठळकपणे आढळते. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी कादंबरीचा मानदंड समजली जाते. आधुनिकतावादी इराणी कादंबरीची खरी सुरुवातही
‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली.
काही पुस्तकं वाचताना गुंतवून ठेवतात. स्थळ-काळाचं भान नाहीसं करतात. आपण त्यांच्या संपर्कात असेपर्यंत इतर कसलाही विचार करू शकत नाही. इतर कुठल्याही गोष्टीत गुंतू शकत नाही. मात्र, वाचन संपलं की त्यांचा अंमल ओसरायला सुरुवात होते. त्यांनी दिलेल्या आनंदाची फिकट चव शिल्लक उरते. तीही काही दिवसांनी विरून जाते. ती पुस्तकं इतर पुस्तकांच्या मांडीला मांडी लावून आपल्या संग्रहात बसून राहतात. पण त्यांना पुन्हा उचलायची इच्छा होत नाही. कालांतरानं ती आपल्या संग्रहातून हद्दपार होतात.
काही पुस्तकांचा प्रकार वेगळा असतो. ती वाचताना गुंतवून ठेवतातच असं नाही. उलट, त्यांचं वाचन ही त्रासदायक प्रक्रिया असते. त्यातून जाताना आपण सतत बेचन असतो. आपण वाचन अध्र्यावर थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते शक्य नाही, हे लक्षात येतं. आपण पुस्तकाच्या पुरते कब्जात गेलेले असतो. आता ते नेईल तिथे जाण्यावाचून पर्याय नसतो. ही पुस्तकं वाचून झाल्यावर खऱ्या अर्थानं सुरू होतात. ती आपल्या जगण्यात रुजतात. वाढतात. बहरतात. त्यांची सावली कायम आपली सोबत करते. अशा पुस्तकांनाच ‘अभिजात’ हे विशेषण लावता येतं.
सादिक हिदायत (Sadegh Hedayat) या इराणी लेखकाची ‘द ब्लाइंड आऊल’ (The blind Owl) ही या प्रकारात मोडणारी कादंबरी. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी (Persian) कादंबरीचा मानदंड समजली जाते. इराणी कादंबरीची खरी सुरुवातही ‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली. तोपर्यंत इराणमध्ये केवळ मनोरंजक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. आपल्याकडच्या नाथमाधव किंवा दातारशास्त्रींप्रमाणे! ‘द ब्लाइंड आऊल’नं इराणी वाचकाला खडबडून जागं केलं. त्याला पहिल्यांदा कादंबरी या वाङ्मयप्रकाराच्या ताकदीची कल्पना आली. इराणमधील रझा राजवटीत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीवर तिथे अगदी काल-परवापर्यंत बंदी होती. आता मात्र ही कादंबरी नवइराणी साहित्याचा मानदंड समजली जाते.
या कादंबरीची संहिता दोन भागांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या भागाचा निवेदक एक चित्रकार आहे. तो पेनच्या आवरणांवर चित्रं काढत असतो. हे चित्र कायम एकच असतं. एक दाढीवाला भारतीय पोशाखातला म्हातारा झाडाखाली उभा. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या तरुणीला तो तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याची खूण करतो आहे. चित्रकाराला हे चित्र वारंवार स्वप्नात दिसतं. झपाटून टाकतं. मात्र, त्याचा अर्थ कळत नाही. एक दिवस चित्रातली तरुणी थेट त्याच्या दारातच अवतरते. तो तिला घरात घेतो. घरात तिचा गूढ मृत्यू होतो. त्यानं तो बावचळून जातो. मात्र, त्याला तिचं चित्र काढण्याचा मोह आवरत नाही. त्यानं चित्र काढायला सुरुवात केल्यावर ती जिवंत झाल्यासारखी डोळे उघडते आणि पुन्हा प्राण सोडते. तो तिच्या प्रेताचे तुकडे करून ट्रंकेत भरतो आणि दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेतो. तिथला म्हातारा रखवालदार दफनासाठी खड्डा खणतो. त्यात एक प्राचीन सुरई सापडते. तिच्यावरचं चित्र नायक पेनच्या आवरणावर काढत असलेल्या चित्रासारखंच असतं. म्हातारा ती सुरई नायकाला भेट देऊन टाकतो. नायक घरी येतो. त्या रहस्यमय तरुणीची आठवण त्याला बेचैन करत राहते. ती विसरण्यासाठी तो भरपूर अफू घेतो आणि बेशुद्ध पडतो. कादंबरीचा पहिला भाग इथे संपतो. दुसऱ्या भागात नायक शुद्धीवर येतो, तो एका वेगळ्याच विश्वात.
इथे तो चित्रकार नसून लेखक आहे. त्याचं लग्न झालेलं आहे आणि बायको आपल्याशी प्रतारणा करत असल्याच्या संशयावरून हय़ानं तिचा खून केलेला आहे. तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याचे हात रक्तानं माखलेले असतात आणि आतल्या खोलीत बायकोचं प्रेत पडलेलं असतं. त्याच्या घराबाहेर बसलेला भिकारी अगदी पहिल्या भागातल्या म्हाताऱ्याची आठवण करून देणारा. कादंबरीत यापुढे अनेक उपाख्यानं एकमेकांत गुंतून येतात. शेवटी नायक आरशात बघतो तेव्हा आपला चेहरा अगदी त्या म्हाताऱ्यासारखाच झाला आहे असं त्याला वाटतं.
अत्यंत गुंतागुंतीची संरचना असलेल्या या कादंबरीचा हा केवळ ढोबळ आराखडा. तिचं खरं रूप वर्णन करणं जवळजवळ अशक्य आहे. स्वप्न आणि भास यांच्या संधिप्रकाशातलं निवेदन, निवेदकाची अविश्वसनीयता, दोन्ही भागांचीप्रतिबिंबासारखी  रचना आणि संपूर्ण कादंबरीत पसरलेलं पलूदार प्रतिमांचं जाळं.. या सगळ्यांमुळे ही कादंबरी वाचकाला सतत सतर्क राहायला भाग पाडते. काही प्रतिमा आणि पात्रं दोन्ही भागांत वेगवेगळ्या रूपांत येतात. म्हातारा पहिल्या भागात स्मशानाचा रखवालदार असतो. त्याच भागात आधी आलेलं लेखकाच्या काकांचं वर्णनही याच म्हाताऱ्याशी जुळणारं, तर दुसऱ्या भागात हाच म्हातारा निवेदकाच्या घरासमोर भीक मागताना दिसतो. पहिल्या भागात नायक पेनवर काढत असलेलं चित्र त्याला स्वप्नात दिसतं. त्यातला म्हाताराही याच प्रकारचा. पहिल्या भागातली गूढ तरुणी आणि दुसऱ्या भागातली लेखकाची बायको यासुद्धा अशा एकमेकींच्या प्रतिबिंबा सारख्या. पहिल्या भागात म्हाताऱ्यानं नायकाला दिलेली सुरई आणि दुसऱ्या भागातल्या म्हाताऱ्या भिकाऱ्यानं दिलेला वाडगा हेही अशा  प्रतिबिंबित  प्रतिमेचं उदाहरण.
कथासूत्रातली संदिग्धता हे लेखकाचं कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोहचविण्याचं साधन असावं, असं ‘द ब्लाइंड आऊल’ वाचताना वाटत राहतं. पहिल्या भागात शुद्ध हरपलेला नायक दुसऱ्या भागात शुद्धीवर येतो. पण दुसऱ्या भागाचं स्वरूपही स्वप्नवत असल्यामुळे वास्तव काय आणि स्वप्न कोणतं, हे वाचकाला नीट कळत नाही. कदाचित दोन्ही स्वप्नं असून, वास्तव तिसरंच असू शकेल, किंवा दोन्ही एकाच वेळी घडणारी समांतर वास्तवं असतील. ते ठरवण्याचं स्वातंत्र्य वाचकाचं. लेखक ते हिरावून घेत नाही.
स्वतच्या उत्कट भावनांचा आविष्कार कोणत्याही वाङ्मयीन संकल्पनेपेक्षा महत्त्वाचा मानणं, हे जर अभिव्यक्तीवादाचं मुख्य सूत्र असेल, तर ही कादंबरी नक्कीच अभिव्यक्तीवादी आहे. हिदायत ज्या काळात लिहीत होता, तो युरोपमध्ये अभिव्यक्तीवादी लेखनाला प्रोत्साहक असा काळ होता. काफ्काच्या साहित्यानं तरुण लेखकांना प्रभावित करायला सुरुवात केली होती. फ्रान्समध्ये शिकलेल्या हिदायतवरसुद्धा काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात, आणि विशेषत: या कादंबरीत ठळकपणे आढळते. हिदायतनं काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’चा फारसी अनुवादही केलेला आहे. तो स्वतला काफ्का आणि पो यांचा वंशज मानायचा. या दोघांची गुणसूत्रं त्याच्या साहित्यात सापडतात हे खरं. त्यामुळे हिदायत हा केवळ युरोपियन प्रभाव आत्मसात करून लिहीत होता, असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. हिदायतचा इस्लामपूर्व इराणी संस्कृतीचा खोल अभ्यास होता. अकराव्या शतकातला फारसी कवी मानुचेहरी याच्या कवितेचे संस्कारही हिदायतच्या साहित्यावर झालेले होते. ‘द ब्लाइंड आऊल’मधलं नायकानं काढलेलं चित्र मानुचेहरीच्या ‘मुसम्मत’ या दीर्घकवितेतल्या एका प्रसंगाचं आहे. व्यवस्थेविरोधातली बंडखोरी आणि नव्या वाङ्मयीन परंपरेचं प्रवर्तन हे या दोघांना जोडणारे आणखी काही दुवे. मानुचेहरीनं फारसी दरबारी कवितेचं स्वरूप संपूर्ण बदललं. ‘राजाचा स्तुतिपाठक’ ही कवीची ओळख पुसून त्यानं तत्कालीन सामाजिक वास्तव पहिल्यांदा कवितेत आणलं. हिदायतनं इराणी कादंबरीत नवीन प्रवाह सुरू केला. तो पुढे वाढला आणि समृद्ध झाला. त्यातूनच पुढे इराणी नवकादंबरीची ठिणगी पडली.
‘द ब्लाइंड आऊल’विषयी आपल्याला जिव्हाळा वाटेल अशी आणखी एक गोष्ट आहे. १९३७ ते १९३९ या काळात हिदायत मुंबईत मुक्कामाला होता. याच काळात त्यानं ‘द ब्लाइंड आऊल’ लिहून पूर्ण केली आणि तिची मर्यादित प्रतींची आवृत्ती मुंबईतच प्रकाशित केली. या प्रतींवर ‘नॉट फॉर सेल इन इराण’ असा शिक्का मारलेला आहे. ती इराणमध्ये प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला.
हिदायतच्या मुंबईतल्या वास्तव्यात त्याला हिंदू,तसंच बौद्ध संस्कृतीविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याचे पडसाद ‘द ब्लाइंड आऊल’मध्येही उमटलेले दिसतात. कादंबरीच्या पहिल्या भागात नायकाची आई हिंदू नर्तकी असल्याचा संदर्भ येतो. दुसऱ्या भागात लेखकाच्या खोलीत बुद्धाची मूर्ती असल्याचा उल्लेख येतो. कादंबरीच्या द्विदल रचनेत द्वैतवादाच्या खुणा आढळतात.
हिदायतचं आयुष्य मानसिक अस्थैर्यानं ग्रासलेलं होतं. उत्तरायुष्यात तो अफूच्या आहारी गेला. निराशावाद तर त्याच्या स्वभावातच होता. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यानं पॅरिसमध्ये स्वतला गॅसनं बंद केलेल्या खोलीत कोंडून आत्महत्या केली. या घटनेमुळे ‘द ब्लाइंड आऊल’ अशुभ आहे, अशी समजूत अनेक वर्षांपर्यंत इराणमध्ये प्रचलित होती. वाचकाला झपाटण्याची या कादंबरीची ताकद पाहता ती खरी असावी, असं मानायला जागा आहे.


कादंबरी:‘द ब्लाइंड आऊल’(The blind Owl)
लेखक : सादिक हिदायत(Sadegh Hedayat) 

हे पुस्तक सध्या मराठीत उपलब्ध नाही.अद्याप  त्याचा मराठीत अनुवाद कोणी केलेला  नाही
Buy The Blind Owl (Imported Edition:English) from Here

[This review of the novel 'The Blind Owl' :Author Sadegh Hedayat,is written by Mr.Nikhilesh Chitre for Loksatta daily]

Wednesday, February 15, 2012


मानवी मनोव्यापाराचे लहानसहान असंख्य पदर उलगडून दाखविणारा शेक्सपीअर (William Shakespeare)हा देश, धर्म, प्रांत आणि संस्कृतीच्या पल्याड पोचला तो त्याच्या अजरामर नाटय़ आणि साहित्यकृतींनी! मानवी भावभावना आणि त्यातील नातेसंबंधांचे गुंते हे कुठल्याही संस्कृतीत सारखेच असतात, यावर जणू शेक्सपीअरच्या असंख्य व्यक्तिरेखांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कालातीत ठरलेल्या या नाटय़कृतींचा गोष्टीवेल्हाळ कथास्वरूपात आस्वाद घेण्याची संधी मराठी वाचकांना ‘कथारूप शेक्सपीअर’ या ग्रंथरूपात मिळाली आहे. प्रभाकर देशपांडे साखरेकर लिखित ‘कथारूप शेक्सपीअर (खंड १)’ हा ग्रंथ औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ने प्रकाशित केला आहे. या कथाखंडात शेक्सपीअरच्या ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’, ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लियर’, ‘मॅकबेथ’, ‘ज्युलियस सीझर’, ‘अँटनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ या सात शोकान्तिकांचा समावेश आहे. 
रसाळ, ओघवत्या शब्दांमध्ये कथन केलेल्या शेक्सपीअरच्या नाटय़कृतींतील गोष्टी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. प्रत्येक कथेतील पात्रांची स्वभाववैशिष्टय़े, स्थल-काळाचे वर्णन, राजे, राण्या, राजपुत्र, प्रधान, सैनिक, दास-दासी असा कथानकाचा अपरिहार्य भाग असलेल्या सर्व व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतील, असे त्यांचे रूप या कथांमधून मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. 
शेक्सपीअरच्या या अनुवादित शोकान्तिकांमध्ये मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि बोलीभाषेचा चपखल वापर केलेला पुस्तकात जागोजागी आढळतो. त्यामुळेच त्या वाचताना अनुवाद आणि कथाकथन यांची सुंदर सरमिसळ झाल्याचे अनुभवास येते. प्रत्येक कथेत चितारलेले प्रसंग, त्यातील पात्रांचे संवाद, त्यातून उभे राहणारे नाटय़ या पुस्तकात पानोपानी भेटते. 
शेक्सपीअरच्या नाटकांचा हा कथारूप अनुवाद करताना वाचकाला मूळ नाटक वाचल्याचा आनंद मिळावा, यादृष्टीने काही पदरची वाक्ये आपण अभावितपणे लिहिल्याची कबुलीही देशपांडे यांनी पुस्तकाचे मनोगत व्यक्त करताना दिली आहे. हे पुस्तक लिहिताना शेक्सपीअरच्या साहित्यावर वा त्यांच्या नाटकांवर भाष्य करण्याचा, त्यांची चिकित्सा करण्याचा मोह आवरून मूळ नाटकातील आशय वाचकांपर्यंत जसाचा तसा नेमक्या पद्धतीने कसा पोचेल, याबाबतही अनुवादक आग्रही राहिला आहे, हे विशेष.
शेक्सपीअरने आपल्या नाटकांतून उभ्या केलेल्या अजरामर काल्पनिक पात्रांमधील संघर्ष, त्यांची महत्त्वाकांक्षा, नेतृत्वगुण, चारित्र्य, भावभावना यासंबंधीचे गुंतागुंतीचे विश्लेषण साध्या-सोप्या मराठीतून करणे खरेच कठीण होते. मात्र, हे शिवधनुष्य पेलण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रभाकर देशपांडे यांनी यानिमित्ताने केला आहे. काही ठिकाणी मात्र त्यात एकजिनसीपणा आढळत नाही. ‘नाटय़ की कथा’ नेमक्या कुठल्या प्रकारात मांडायचीय, या घोळात अनुवादक चाचपडतोय आणि त्यामुळे कथा सांगताना ती कुठल्या ‘काळा’त लिहायची, हा संभ्रम काही ठिकाणी असल्याचं जाणवतं. मात्र, या त्रुटी अगदीच क्षुल्लक व नगण्य आहेत. या पुस्तकाद्वारे एक अत्यंत महत्त्वाचं काम लेखकाने शेक्सपीअरच्या सकस नाटकांच्या कथारूपी अनुवादाने केले आहे. 

शेक्सपीअरने रंगविलेल्या अनेकानेक व्यक्तिरेखा, त्यांची वर्तणूक, त्यातून दिसणारे त्यांचे स्वभावदर्शन या साऱ्याचा परिचय मराठी वाचकांना यानिमित्ताने कथारूपात पुन्हा एकदा होत आहे. 

-सुचिता देशपांडे,लोकसत्ता ,रसग्रहण

कथारूप शेक्सपिअर -(खंड १- सात शोकांतिका),
-प्रभाकर देशपांडे साखरेकर
 जनशक्ती वाचक चळवळ,
 पृष्ठे- २५६, किंमत- २०० रु.

शरदिन्दू बंडोपाध्याय हे बंगाली रहस्यकथांच्या विश्वातलं गाजलेलं नाव. व्योमकेश बक्षी हा त्यांचा डिटेक्टिव्ह. बंगालीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या शरदिन्दू बंडोपाध्याय यांच्या या व्योमकेश बक्षीच्या गाजलेल्या रहस्यकथा रोहन प्रकाशननं मराठी वाचकांसाठी तीन भागांत आणलेल्या आहेत. मराठीत त्यांचा अनुवाद हा सुप्रसिद्ध अनुवादक अशोक जैन यांनी केलेला आहे. सत्यजित राय यांच्या ‘फेलुदां’च्या बारा पुस्तकांचा अनुवाद यापूर्वी जैन यांनीच केलेला आहे आणि ‘रोहन’तर्फेच हा पुस्तकांचा संच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच दर्जेदार परंपरेतला हा व्योमकेश बक्षीचाही संच म्हणता येईल.
‘व्योमकेश बक्षी’ आपल्याला तसा नवीन नाही. १९९३ साली बासू चटर्जी यांनी दूरदर्शनवर रजित कपूरला घेऊन व्योमकेश बक्षी हिंदी मालिकेत आणलेला होता आणि ती दूरदर्शन मालिका खूप गाजली होती. जाणकारांनीही या मालिकेला आणि रजित कपूरच्या अभिनयाला चांगली दाद दिली होती. मालिका पाहण्यापेक्षा या रहस्यकथा वाचतानाचा अनुभव वेगळा आहे. कथेतील रहस्य आणि ते सोडविताना व्योमकेश आपल्या तल्लख बुद्धिमत्तेची जी चमक दाखवितो, त्यामुळे ती रहस्यकथा वाचताना वेगळीच मजा येते. त्याची शोध घेण्याची पद्धत तर्कसुसंगत असते आणि एकेक करीत कथेतला तपशील आपल्यासमोर येत राहतो. कथेतली रहस्यं टप्प्या-टप्प्याने उलगडत जात असल्याने वाचक कथा वाचताना गुंगून जातो.
या कथा लिहीत असताना शरदिन्दूंच्या डोळ्यांसमोर शेरलॉक होम्स आहे, हे उघड आहे. तिथे शेरलॉक होम्सच्या मदतीला वाटसन आहे तर इथे अजित आहे आणि अजितच्या तोंडूनच सारा कथाभाग आपल्याला समजतो. शेरलॉक होम्सचा खूपच प्रभाव शरदिन्दूंवर आहे, पण तरीही या अस्सल बंगाली रहस्यकथा आहेत. फक्त कथा कोलकाताच्या आसपास घडतात म्हणून नाही तर कथेतील वातावरण अस्सल बंगाली आहे.
१९३२ साली ‘पाथेर काटा’ (या पुस्तकात ‘काटे’री रहस्य) ही कथा लिहून शरदिन्दूंनी रहस्यकथेची वाटचाल सुरू केली. छातीत घुसणारी ग्रामोफोनची सुई आणि तिच्याद्वारे होणारा खून, हा वेगळा प्रकार आहे. शरदिन्दूंच्या साऱ्याच रहस्यकथांमध्ये बरेचसे खून कसे घडवून आणलेले आहेत, हे पाहणं मोठं मनोरंजक ठरेल. व्योमकेश बक्षी याला आपल्याला ‘डिटेक्टिव्ह’ म्हणवून घेणं पसंत नाही. तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ म्हणवून घेतो. काही जण १९३३ साली शरदिन्दूंनी लिहिलेली ‘सत्यान्वेषी’ हीच त्यांची पहिली रहस्यकथा मानतात. ही कथा घडते कोलकत्याच्या बकाल भागात असलेल्या एका बोर्डिग हाऊसमध्ये. तिथं कथेचा निवेदक अजित राहत असतो. काही दिवसांनी अतुल चंद्र मित्रा हा तरुण येतो आणि अजित याचा रूमपार्टनर म्हणून राहू लागतो. हा बेकार तरुणच पुढे खुनाचं रहस्य उलगडतो आणि नंतर आपलं खरं नाव ‘व्योमकेश बक्षी’ असल्याचं जाहीर करतो आणि अजितला तो पुढे आपल्या बोर्डिग हाऊसमध्ये घेऊन जातो. व्योमकेशला त्याची बायको सत्यवती मिळते तीही अशाच एका खुनाच्या तपासातून. त्या कथेचं नाव आहे - ‘अर्थमनार्थम्’ (मृत्युपत्रानेच घेतला बळी). सत्यवतीच्या भावावर खुनाचा आरोप जवळजवळ पक्का झालेला असतो. ती व्योमकेशला भावाला वाचविण्याची विनंती करते. त्या तपासा दरम्यान सत्यवती आणि तो अधिक जवळ येतात. सत्यवती त्याची बायको झाल्यावर त्या दोघांच्यात झडणारे संवाद वाचून त्या काळात बंगालमधल्या भद्रलोकांमधील नवरा-बायकोचे संबंध कसे मोकळेपणाचे होते, हे आपल्या लक्षात येते.
या तीन पुस्तकांत शरदिन्दूंच्या बारा कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यात त्यांच्या ‘शोजारूर काँटा’ (साळिंदराचा काटा), ‘मकोरशार’ (टॅरंटुलाचं विष), ‘अग्निबाण’ (जीवघेणी ज्वाळा- भाग १), ‘उपसंहार’ (जीवघेणे ज्वाळा- भाग २), ‘चित्रचोर’ (चित्रचोर), ‘चिडीयाखाना’ (प्राणिसंग्रहालय) या गाजलेल्या रहस्यकथांचा समावेश आहे. आपल्या विशिष्ट अशा चित्रमय भाषाशैलीत शरदिन्दू या साऱ्या कथा सांगतात. त्यातली पात्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात. त्यामुळेच ‘चिडीयाखाना’वर सत्यजित राय यांनाही चित्रपट बनविण्याचा मोह झाला.
या रहस्यकथांतील एखाद-दुसरी कथा सोडता बहुतेक कथा या कोलकात्याच्या परिसरात घडतात. व्योमकेश बक्षीला छोटय़ा चोऱ्या, किरकोळ खून असल्या गोष्टींत रस नसतो. त्यामुळे तो बऱ्याचदा घरी निवांत बसून असतो. हे निवांतपण त्या काळातल्या संथ जीवनाचाच एक भाग म्हणता येईल. आजच्यासारखे मोबाइल फोन तर सोडाच, पण लॅण्डलाइन फोन तरी घरोघर कुठे होते? त्यामुळे फोन करण्यासाठी एखाद्या श्रीमंत माणसाकडे जावं लागतं. इन्स्पेक्टरला निरोप द्यायचा असेल तर नोकराकरवी चिठ्ठी पाठवावी लागे. हे दोघे खून झाल्यावर घटनास्थळी जातात ते बसनं किंवा ट्रेननं. आजच्या काळात हे सारं वाचताना आपल्याला ‘पीरियड फिल्म’ पाहिल्यासारखीच वाटते.  ‘या रहस्यकथा म्हणजे परदेशी कथांची इकडून तिकडून केलेली उचलेगिरी नसून त्यातल्या साऱ्या कल्पना या मूळच्या माझ्या आहेत आणि त्या कथा या पूर्णपणे माझीच निर्मिती आहे,’ असं शरदिन्दूंनी ठासून सांगितलेलं आहे.
१९९९ साली शरदिन्दूंची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्ताने ‘पेंग्विन’ने त्यांच्या काही निवडक कथांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध केले. अशोक जैन यांनी या इंग्रजी कथांचे अनुवाद केलेले आहेत. रहस्यकथेला साजेशा ओघवत्या मराठीत त्यांनी अनुवाद उतरवलेले आहेत. पण तरीही शॉवरला ‘तुषारस्नान’, पुस्तकाच्या शेल्फला ‘शिडाळी’, ग्रुप फोटोला ‘समूह फोटो’ असे काही गमतीशीर शब्द जैन यांनी का वापरले आहेत, ते समजत नाही. (‘सकाळचे साडेदहा वाजायला आले होते. उठून ‘तुषारस्नान’ घ्यावं, असा विचार करीत असतानाच टेलिफोनची घंटी अचानक वाजू लागली’ असं वाक्य वाचलं की बंगाली लोकांचं पान खाणंच अधिक आठवतं.)
शरदिन्दू बंडोपाध्याय यांचा आणि महाराष्ट्राचा जुना ऋणानुबंध आहे. १९३२ साली त्यांनी लेखनाला सुरुवात केली. नंतर १९३८ साली ते चित्रपटासाठी पटकथालेखन करण्यासाठी म्हणून मुंबईला आले. ‘बॉम्बे टॉकीज’ आणि अन्य कंपन्यांसाठी त्यांनी लेखन केलं. १९५२ पर्यंत ते मुंबईत होते. नंतर चित्रपटासाठीचे लेखन थांबवून त्यांनी पुन्हा ललित लेखन करायचं ठरवलं. त्यांनी त्यासाठी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी नंतरची १८ वर्षे बंगाली भाषेत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा, बालकथा असं विविध प्रकारचं लेखन केलं. आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं. १९७० मध्ये त्यांचं पुण्यातच निधन झालं. पुण्याचा आणि महाराष्ट्राचा शरदिन्दूंशी असा जवळचा संबंध आलेला आहे.
व्योमकेश बक्षींच्या तीन पुस्तकांच्या या संचाची निर्मिती रोहन प्रकाशननं त्यांच्या नेहमीच्या परंपरेला जागून देखणी केलेली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांची देखणी मुखपृष्ठं लाभलेला हा तीन पुस्तकांचा संच रोहन प्रकाशननं आकर्षक गिफ्ट पॅकमध्येही उपलब्ध करून दिलेला आहे. जुन्या काळात घडत असणाऱ्या या उत्कंठावर्धक, रोमहर्षक कथा जुन्या वाचकांना तर आवडतीलच, पण आजच्या नव्या पिढीलाही त्या आकर्षित करतील आणि खिळवून ठेवतील.


-मुकुंद टाकसाळे
व्योमकेश बक्षी - भाग १ (पृष्ठसंख्या - २०४) रु. १४०, व्योमकेश बक्षी - भाग २ (पृ सं - १७५) रु. १४०,व्योमकेश बक्षी - भाग ३ (पृ सं  - १७८) रु. १४०, ३ भागांचा संच - रु. ३५०
व्योमकेश बक्षी
लेखक - शरदिन्दू बंडोपाध्याय
अनुवाद - अशोक जैन

प्रकाशक - रोहन प्रकाशन

हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी इथे भेट द्या!

Sunday, February 5, 2012

सुरेश चांदवणकर
‘गॅलिलिओ गॅलिली’ (१५६४-१६४२) हे नाव घेतलं की अनेकांना पिसाचा झुकता मनोरा व तिथल्या चर्चमध्ये झुलणाऱ्या दिव्यावरून त्याला सुचलेली लंबकाची संकल्पना पटदिशी आठवेल. सत्तरच्या दशकात जे विज्ञानात पदवी परीक्षेचा अभ्यास करत होते त्यांना ‘लाइफ ऑफ गॅलिलिओ’ हे बरटॉल्ट ब्रेख्तचं अवांतर वाचनासाठी पण लेखी परीक्षेकरिता नेमलेलं नाटक आठवेल. आज इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्या कामाविषयी पुष्कळ माहिती शेकडो पानांमध्ये साठवून ठेवलेली वाचावयास मिळते. मात्र त्याच्या कुटुंबाविषयी फारच थोडी माहिती आढळते. देवा सोबल (kDeva Sobel) यांच्या ‘गॅलिलिओज् डॉटर’ या पुस्तकाने ही उणीव काहीशी भरून काढली आहे. त्या पत्रकार असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अक्षांश-रेखांशांची कल्पना मांडणारा जॉन हॅरिसन, सूर्य व पृथ्वीच्या स्थानांवरून व गतीबाबत धर्मपीठांशी संघर्ष ओढवून घेणारे कोपíनकस व गॅलिलिओ हे त्यांच्या खास अभ्यासाचे विषय असून लिखाणाचा बाज हा रसाळपणे गोष्टी सांगण्याचा असल्याने वाचकाला बांधून ठेवतो.
प्रस्तुत पुस्तकात गॅलिलिओच्या कौटुंबिक जीवनाची माहिती मिळते. मरिना गांबा या व्हेनिसच्या सुंदर तरुणीबरोबरच्या विवाहबाहय़ संबंधांतून १६०० ते १६०६ या काळात त्यांना तीन मुलं झाली. मोठय़ा दोन मुली (व्हर्जििनया व लिव्हिया) व व्हिन्सेनझियो हा मुलगा. तोवर त्याच्या वयाची चाळिशी उलटून गेलेली होती. मुलं लहान असतानाच मरिना गांबा मरण पावली. १९२० च्या आसपास ग्रँड डय़ूकच्या मत्रीतून त्यानं मुलाचा बाप्तिस्मा करवून घेतला. मुलगा त्याच्या कुटुंबाबरोबर अखेपर्यंत गॅलिलिओबरोबरच राहिला. मात्र दोन मुलींच्या समाजमान्यतेविषयी शंका असल्यानं व काहीशा असुरक्षिततेच्या भावनेतून गॅलिलिओनं दोन्ही मुलींना १०-१२ वर्षांच्या असतानाच जोगतिणी (Nuns) बनवायचं ठरवलं. त्यासाठी पण त्याला बडय़ा लोकांच्या ओळखीचा आधार घ्यावा लागला होता. फ्लॉरेन्समधल्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल करताना थोरल्या व्हर्जििनयाचं नाव बदलून Suor(सिस्टर)Maria Celeste Galile असं ठेवण्यात आलं. ती १९३४ मध्ये अवघ्या ३४ व्या वर्षी मरण पावली. कॉन्व्हेंटच्या बाहेरपण फारशी कधी पडली नाही. वडील कधीतरी येऊन भेटत. त्यांचं काम, राजघराण्याशी असलेली त्यांची मत्री व रोमच्या धर्मपीठानं दिलेली शिक्षा याविषयी ऐकीव माहितीच तिच्यापर्यंत पोहोचत असे. मात्र बापलेकीत नियमित पत्रव्यवहार होत असे. लेकीनं लिहिलेली १२४ पत्रं गॅलिलिओच्या जपून ठेवलेल्या कागदपत्रांतून अभ्यासकांच्या हाती लागली. मात्र बापानं लेकीला लिहिलेली पत्रं कॉन्व्हेंटच्या प्रमुख जोगतिणीनं जाळून टाकली. कारण गॅलिलिओ हा चर्चनं ठोठावलेली शिक्षा भोगणारा गुन्हेगार असल्यानं त्याची पत्रं सांभाळणं धोक्याचं ठरणारं होतं. त्यामुळं बापानं लिखाणातून व्यक्त केलेल्या भावना फारशा प्रकाशात आलेल्या नाहीत. पण इतरांशी केलेल्या पत्रव्यवहारातून ही मुलगी त्याची सर्वात लाडकी होती असं दिसतं.
१९२४ ते १९३४ या १० वर्षांत ही पत्रं लिहिलेली असून मूळ इटालियन भाषेतली ही पत्रं लेखिकेनं इंग्रजीत रूपांतरित केलेली आहेत. मोठी मुलगी या नात्यानं आईच्या पश्चात वडिलांचं खाणंपिणं, कपडे, औषधं व भावनिक आधार याबाबत तिची जागरूकता या पत्रांतून पानोपानी जाणवते. या लिखाणाभोवतीच लेखिकेने या अनोख्या पिता-पुत्रीची कहाणी लिहिलेली आहे. यानिमित्ताने गॅलिलिओचं चरित्र, तत्कालीन रोमन साम्राज्यातल्या राजसत्ता व धर्मपीठ यांचे नातेसंबंध व वैज्ञानिकांची झालेली ससेहोलपट या गोष्टींचा आढावा घेण्यात आलेला आहे.
एकूण सहा विभागांत व तेहतीस प्रकरणांत या ४०० पानी पुस्तकाची रचना केलेली असून रोमन काळातली रेखाचित्रं, नकाशे, शिल्पं इ.चा कल्पक वापर केलेला आढळतो. शेवटी काळानुसार महत्त्वाच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या यादीवरून एक नजर टाकली तरी एक मोठा कालखंड डोळय़ांसमोरून जातो. उदा. कोपíनकसनं(१४७३-१५४३)सूर्य हा केंद्रस्थानी असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, असं आयुष्याच्या अखेरीस लिहून प्रसिद्ध केलं. त्यानंतर २१ वर्षांनी गॅलिलिओ जन्माला आला.१६०० साली कोपíनकसच्या पुढे जाऊन ब्रुनोनं (Bruno) सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे असं मांडलं. या प्रमादाबद्दल शिक्षा म्हणून रोमच्या धर्मपीठानं त्याला जिवंत जाळून मारलं. अशा दहशतीच्या वातावरणात काम करायचं आहे याचं भान गॅलिलिओला होतं. त्यामुळेच अतिशय सावधपणे राजसत्तेशी मत्री करून व धर्मसत्तेशी जुळवून घ्यायचं धोरण त्यानं अंगीकारलं होतं. याची अनेक उदाहरणं या पुस्तकात आढळतात. ग्रहगोलांची स्थानं व भ्रमणावरचं कोपíनकसचं काम पुढ नेत असताना गॅलिलिओचं इतर अनेक विषयातलं स्वतचं काम व अध्यापनाबरोबरच पुस्तकं लिहिणं पण चालूच होतं.
स्वत: सश्रद्ध असूनही दुर्बणिीतून दिसणाऱ्या निराळय़ाच विश्वाचं दर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, अशी कळकळ त्याला होती. त्यामुळेच ‘दि डायलॉग’ हे संवादात्मक पुस्तक त्यानं लिहिलं व धर्मपीठाच्या परवानगीनंच १६३२ मध्ये प्रसिद्ध केलं. यात तीन मित्रांनी टोलेमी, कोपíनकस व गॅलिलिओच्या सिद्धांतांवरती गप्पा मारलेल्या आहेत. तेसुद्धा या तिघांची नावं न येऊ देता. त्याची भाषा ही अभिजनांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कुणालाही समजेल अशीच आहे. त्यामुळेच त्यावर गदारोळ उठला. पुढच्याच वर्षी चौकशी होऊन त्यावर बंदी घालण्यात आली. त्या चौकशी समितीसमोर झालेली मूळ प्रश्नोत्तरं पुस्तकात दिलेली असून ती मुळातूनच वाचावीत अशीच आहेत. १९३३ मध्ये शिक्षा म्हणून चर्चची जाहीर माफी मागावी लागली व एकांतवासाला सुरुवात झाली. पण तोवर पुस्तकाच्या काही प्रती व इतर हस्तलिखितं गुपचूप युरोपातल्या इतर देशांत जाऊन पोहोचली होती. १९३४ साली त्याची मुलगी सिस्टर सेलेस्ते मरण पावली. पण या सगळय़ा मन:स्तापाच्या काळात तिची पत्रं हाच मोठा दिलासा गॅलिलिओला होता.सुमारे ८० वर्षांच्या आयुष्यात गॅलिलिओनं इटलीतल्या पिसा, रोम व फ्लॉरेन्स शहरांमध्येच काम केलं. त्याच्या आयुष्यात त्यानं केलेल्या कामाला मान्यता मिळाल्याचं त्याला पाहायला मिळालं नाही. पण त्याच्या पुस्तकांच्या माध्यमातनं हे काम इतरत्र पसरलं व आधुनिक ‘विज्ञानाचा जनक’ अशी कीर्ती त्याला मरणानंतर लाभली. त्याचा पट्टशिष्य टॉरिसेली यानं या कामी बराच पुढाकार घेतला. ते काम व्हिन्सेंझो व्हिव्हियानी (१६२२-१७०३) या आणखी एका शिष्यानं पुढं चालवलं. १६४२ मध्ये निधन पावलेल्या गॅलिलिओचं शव त्याच्या इच्छेप्रमाणं त्याच्या कुटुंबीयांच्या दफनभूमीत पुरण्यात आलेलं होतं. ते नव्या जागी सन्मानानं भव्य स्मारकात हलवलं जावं, याकरिता व्हिव्हियानीनं आयुष्यभर अयशस्वी खटपट केली. तो गेल्यावर त्याची शवपेटिका त्याच्या इच्छेप्रमाणं गुरू गॅलिलिओच्या शवपेटीवर पुरण्यात आली. पुढं अनेकांच्या प्रयत्नांना यश येऊन गॅलिलिओचं शव १७३७ मध्ये खास तयार केलेल्या स्थळी समारंभपूर्वक हलवण्यात आलं. त्यावेळच्या उत्खननात गॅलिलिओच्या शवपेटीखाली आणखी एक शवपेटी आढळली. ती पेटी पण सन्मानपूर्वक नव्या ठिकाणी हलवण्यात आली. आजही ती तिथं आहे पण तिच्यावर "Suor Maria Celeste Galilei" या नावाची पाटी मात्र नाही. १८३५ मध्ये त्याच्या ‘दि डायलॉग’ हय़ा पुस्तकावरची बंदी मागं घेण्यात आली. १९३५ मध्ये पोपच्या हस्ते व्हॅटिकन वेधशाळेचं (ऑब्झर्वेटरी) उद्घाटन झालं. त्यानं मांडलेले सिद्धांत व केलेली अनेक भाकितं आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकानं अनेक पारितोषिकं मिळवली. ते वाचून अलीकडेच खगोलशास्त्रांनी ‘शुक्रा’वरील एका विवराला (क्रेटरला) Suor Maria Celeste हे नाव दिलेलं आहे.


सौजन्य:लोकसत्ता

Related Posts Plugin for WordPress, Blogger...