Wednesday, October 31, 2012




मारामाऱ्या करणारा मुलगा म्हणून शेजाऱ्यांना त्याची आठवण आहे.. केजीबीसाठी काम करायचं स्वप्न बाळगणारा हा मुलगा, पुढे राजकारणात यायचं ठरवून तिथून बाहेर पडला आणि रशियाचा अध्यक्ष झाला.. विषय म्हणून पुतिन खुणावत असतील, तर हे तपशील महत्त्वाचेच!
स्थळ : इस्तंबुल. नोव्हेंबर, २००५. वातावरणात म्हटलं तर थंडी. पण हातपाय आखडून टाकणारी नक्कीच नाही. उलट प्रसन्नपणे घराबाहेर काढणारी. एकतर हे गाव कमालीचं सुंदर. बायझंटाईन, रोमन, ऑटोमन अशी अनेक साम्राज्यं त्यानं पाहिलेली. आपण शाळेत असताना कॉन्स्टॅन्टिनोपल नावानं त्याचा परिचय झालेला.
आता त्याचं इस्तंबुल झालंय. कॉन्स्टॅन्टिनोपलपेक्षा इस्तंबुल कितीतरी सुरेख आहे. म्हटलं तर अरेबिक , म्हटलं तर युरोपिअन. एकाच वेळी ख्रिश्चन, इस्लामी अशा संस्कृतींचा परिचय देणारं. पण तिथला माझा जो यजमान होता त्याला तसं संस्कृतीशी वगैरे काही देणंघेणं नव्हतं. तो वास्तव्याला दुबईत असतो. तेलाच्या व्यापारातला गडगंज. त्याचं इस्तंबुललाही घर होतं. तेलाच्या व्यवसायात असल्यानं अनेक ठिकाणी- जिथं सर्वसामान्य जात नाहीत- त्याची ऊठबस होती. या क्षेत्रातल्यांना पडद्यामागून अनेक गोष्टी करायची सवय असते. कोण कोण काय काय उद्योग करतं हे माहीत असतं. या क्षेत्रात त्याचा अधिकार नोंद घेण्यासारखा होता. बाकीच्या बाबतीत तो इतका आंधळा होता की त्याला ओऱ्हान पामुक या नोबेल विजेत्या लेखकाचं घर इस्तंबुलमध्ये कुठे आहे, हे माहीत नव्हतं. पण कोणता भारतीय उद्योगपती इथे कोणाला भेटायला येतो आणि काय काय करतो. अशा चविष्ट पण निरुपयोगी माहितीचे तुकडे त्याच्याकडे सतत चघळायला असायचे. संपायचेच नाहीत. माझा तेलातला रस लक्षात घेऊन त्या दिवशी तो एकाला भेटायला घेऊन गेला. कोण, काय विचारलं, तर म्हणाला बघच. आधी सांगितलं तर तू येणारच नाहीस..
हे असं म्हटल्यामुळे उत्कंठा भलतीच ताणलेली.
बोस्फोरस या जगातल्या अतिरम्य म्हणता येईल अशा परिसरातल्या एका रेस्तराँमध्ये भेट ठरली. जागा अप्रतिम. पाण्याला समांतर अशी रेस्तराँची जमीन. प्रत्येक खिडकीतनं बाहेरचं पाणी दिसेल अशी व्यवस्था. संध्याकाळ उतरत होती. सीगल पक्ष्यांचे थवे शरीर अलगद पाण्यावर सोडून लाटेप्रमाणे वरखाली होत होते. आत टेबलाटेबलांवर काचेच्या पात्रांत मेणबत्या लावायला सुरुवात झाली होती. बाहेर पाण्यावर त्या मेणबत्त्यांच्या पिवळलाल प्रकाशाची प्रतिबिंबं पडत होती. आकाशातही तशाच रंगांचा प्रकाश. तिथून वितळून तो थेट असा समोर टेबलावर आल्यासारखा वाटावा. पण यातली मजा घेता येत नव्हती. कारण कोण येणार आहे भेटायला हे अजून कळत नव्हतं. दरम्यान, काचेच्या चिमुकल्या कपातनं दोनतीन वेळा त्याच मेणबत्तीच्या प्रकाशरंगाचा चहा येऊन गेला.
तर थोडय़ा वेळानं तो आला. तोपर्यंत बाहेर अंधार अधिकच गडद झालेला. रम्यता धूसरतेकडे झुकलेली.. आणि धिप्पाड अशा सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात तो आला. ते सुरक्षा रक्षक कुपोषित वाटावेत असा त्याचा देह. महाकाय. हनुवटी संपल्यावर लगेच बाहेर आलेली छातीच. देहाचा परीघ इतका की चालताना हात अर्धवर्तुळाकार फिरायचे आणि त्या टप्प्यात जे काही येईल त्याचा कपाळमोक्षच होईल असं वाटायचं. तो आलेला पाहिल्यावर माझा यजमान म्हणाला, आत चल. आता आम्ही एका खोलीत गेलो. माझ्या यजमानानं ओळख करून देताना हा अधिक जवळून पाहता आला. गोरागोरापान. शुद्ध वर्तुळाकार चेहरा. दाढी. अगदी भूमितीय पद्धतीनं कोरलेली. बसला. ओळख सांगितल्यावर मी थिजलोच. रशियातल्या चेचेन बंडखोरांचा तो नेता होता. यजमानानं सांगितलं : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात जे काही बंड सुरू आहे, त्याचं नेतृत्व हा करतोय.. पुतिन आणि केजीबी याच्या मागावर आहे. हे ऐकल्यावर मी सहज इकडेतिकडे बघितलं. कोणी आपल्या टेबलाकडे नजर ठेवून आहे का वगैरे.. त्याला इंग्रजी येत नव्हतं. आणि बोलायची फारशी इच्छाही दिसली नाही त्याची. काहीतरी पुटपुटत होता. ते माझ्या यजमानाला कळायचं. दोघांचे चेहरे आपले मी पाहत होतो. संभाषण असं काही नव्हतंच. एक नाव मात्र बोलताना दोनेकदा आलं. लिटविनेन्को. अध्र्या-पाऊण तासानं तो गेला. आम्ही जेवलो. येताना मी यजमानाला विचारत होतो त्या लिटविनेन्को नावाबद्दल. तो म्हणाला, तो केजीबीत होता.. आता पुतिनविरोधी उचापती करतोय. आता आला होता त्याचा मित्र आहे वगैरे. त्याच्याविषयी आणि या चेचेनविषयी बरंच काही चमचमीत कानावर आलं.
दुसऱ्या दिवशी माझं भल्या सकाळचं विमान होतं. मुंबईत घरी पोहोचल्यावर सवयीनं टीव्हीवर बीबीसी लावलं तर बातमी सुरू होती अलेक्झांडर लिटविनेन्को याच्या लंडनच्या रुग्णालयात झालेल्या गूढ मृत्यूची. मी गारच झालो. नाव कोणी घेत नव्हतं उघडपणे. पण त्याच्या मृत्यूमागे अध्यक्ष पुतिन यांचा हात होता असं सूचित केलं जात होतं. पुढे त्याचे अनेक तपशील आले.
पुतिन हे एक विषय म्हणून तेव्हा डोक्यात घुसले ते घुसलेच. पुतिन केजीबीत होते. त्यांच्याविषयी बरंच काही वाचायला मिळत गेलं. पुढे नाटो फौजांनी जॉर्जियावर केलेला हल्ला, तेलावर लिहीत असताना भेटलेली रशियाची युकोस ही बलाढय़ कंपनी, गाझप्राम आणि तो वादग्रस्त मिखाईल खोडोर्कोव्हस्की.. अशा सगळय़ातून रशिया आणि पुतिन ही रसाळ कहाणी तयार होत गेली. जेवढं जेवढं अधिक वाचायला मिळालं पुतिन यांच्याविषयी तेवढा तेवढा हा माणूस अधिकच वाचनीय होत गेला. त्यात सगळय़ात जास्त अशी आनंददायी भर घातली अत्यंत ताज्या पुस्तकानं.
‘द मॅन विदाउट अ फेस : द अनलाइक्ली राइज ऑफ व्लादिमीर पुतिन’ हे अगदी ताजं पुस्तक. एका मित्रानं कळवलं आवर्जून वाचच. म्हणून लगेच मिळवलं आणि मित्राच्या शिफारशीवरचा विश्वास अधिकच दृढ झाला.
लेनिनग्राडला अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय- खरंतर गरीबच म्हणता येईल अशा कामगारी घरात व्लादिमीर याचा जन्म. अभ्यासात हुशार वगैरे अजिबातच नाही. अत्यंत वांड म्हणता येईल असाच स्वभाव. मारामारी करणं हा छंद. लेखिका माशा गेसन हिनं पुतिन यांचे शाळासोबती वगैरे शोधून काढले. त्यांना भेटली. ते जिथं राहत होते तेव्हाच्या शेजाऱ्यांना तिनं हुडकून काढलं. त्यांच्या व्लादिमीरच्या लहानपणीच्या आठवणी नोंदवल्या. सगळय़ांतून पुढे आली ती एकच बाब. मारामाऱ्या करणारा व्लादिमीर. अनेकांनी त्याच्या मारामाऱ्यांच्या कौशल्याच्या आठवणी रंगवल्यात. अगदी हिंदी चित्रपटात शोभाव्यात अशा त्या आहेत. मुळातूनच वाचायला हव्यात त्या. त्यातूनच रशियन प्रकार सँबो आणि नंतर ज्युदो यात व्लादिमीर पारंगत झाला. कळायला लागल्यापासून एकच ध्यास होता त्याचा. तो म्हणजे, केजीबीत नोकरी करायची. केजीबीत लागलो रे लागलो की आपल्याला काही विशेषाधिकार मिळतात आणि जेम्स बाँडसारखंच आपण करू शकतो, असा काहीसा त्याचा समज होता. पुढे तो लागलाही केजीबीत. पहिली नेमणूक झाली ती ड्रेस्डेन इथं. हे झेक सीमारेषेवरचं गाव. त्या वेळी पूर्व जर्मनीत होतं, आणि पूर्व जर्मनी हा तेव्हाच्या सोविएत गटात होता. म्हणजे ही नेमणूक तशी काही शत्रुराष्ट्रातली नव्हती. त्यापेक्षा अमेरिकेच्या गटातल्या पश्चिम जर्मनीत त्याची नेमणूक झाली असती तर जास्त रोमांचक काम करायला मिळालं असतं. ड्रेस्डेनमध्ये काही नव्हतं. नुसतं उद्योगांचा, वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा अहवाल मॉस्कोला पाठवायचा. इतकंच काय ते काम. पण तरुण व्लादिमीर केजीबीच्या प्रेमापोटी तेही करत राहिला. त्यातल्या त्यात उत्साहजनक एवढंच की व्लादिमीर तिकडे असतानाच पूर्व आणि प. जर्मनी यांना विभागणारी बर्लिनची भिंत कोसळली आणि या दोन्ही देशांच्या एकत्रीकरणाची- आणि अर्थातच शीतयुद्धाच्या शेवटच्या पर्वाची- सुरुवात झाली.
तिथून पुढे व्लादिमीरची नेमणूक झाली ती परत रशियात. लेनिनग्राडला. तिथल्या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांवर हेरगिरी करण्याचं काम त्याच्याकडे होतं. त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं ते इथेच. या विद्यापीठात त्याची गाठ पडली ती अनातोली सोब्चाक यांच्याशी. लेनिनग्राडचे महापौर होते ते. एव्हाना ९१ साल उजाडलं होतं. केजीबीनं अध्यक्ष मिखाइल गोर्बाचोव यांच्याविरोधात कधीच हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातला मोठा उठाव म्हणता येईल असा प्रयत्न त्या वर्षी घडला. हा क्षण व्लादिमीरनं साधला आणि थेट राजीनामाच देऊन टाकला केजीबीचा. त्याला आता राजकारण खुणावू लागलं होतं. सोब्चाक यांच्या कार्यालयात त्यानं सल्लागार म्हणून स्वत:ची वर्णी लावून घेतली. पहिला म्हणता येईल असा मोठा भ्रष्टाचार व्लादिमीर यांच्या नावावर इथेच घडला. लेनिनग्राडमधील उद्योगाचा भाग म्हणून जर्मनीशी कच्चा माल पुरवण्याचा करार त्यांनी केला. त्या बदल्यात लेनिनग्राडला धान्यसाठा दिला जाणार होता. त्यानुसार लेनिनग्राडमधून कच्चा माल गेला परदेशात. पण त्या बदल्यात आलं मात्र काहीच नाही. नऊ कोटी ३० लाख डॉलर्सचा हा सगळा व्यवहार होता. ही सगळी रक्कम पुतिन यांनीच घशात घातल्याचा संशय आहे. त्या संदर्भात त्यांची चौकशीही झाली होती. पुढच्या आयुष्यात अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे आहोत असा दावा पुतिन यांच्याकडून केला गेला. पण गेसन हिनं धारिष्टय़ दाखवत पुतिन म्हणतात तसे स्वच्छ नाहीत. असं पुस्तकात सोदाहरण दाखवून दिलंय. ‘धारिष्टय़ दाखवत’ असं एवढय़ासाठी म्हणायचं की पुतिन यांना विरोध करणारे अनेक पत्रकार अचानक गायब झाल्याचा इतिहास ताजा आहे. अगदी इंग्लंडमध्ये राहून पुतिनविरोधी लिहिणारेही अचानक दिसेनासे झाल्याच्या नोंदी आहेत.
तेव्हा अशा कराल राजकारण्याविषयी इतकं तपशीलवार लिहिणं असं अवघडच. आणि त्यात मॉस्कोत राहून हे सगळं करणं अधिकच अवघड. गेसन हिनं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. गोर्बाचोव यांच्यानंतर रशियाचं नेतृत्व करणारे बोरिस येल्तसिन आजारी असताना त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांच्याच कार्यालयात असलेले व्लादिमीर पुतिन अध्यक्षपदासाठी योग्य वाटले. त्यांना वाटलं या माणसाला नेमून सूत्रं आपल्याकडेच ठेवता येतील.
अर्थातच त्यांचा हा अंदाज पुतिन यांनी खोटा ठरवला. सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत गूढ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतिन यांच्याविषयीचं हे पुस्तक जगाच्या राजकारणावर प्रेम असणाऱ्यांसाठी आवश्यक वाचनच ठरेल. ते महत्त्वाचं अशा अर्थाने की रशिया म्हटलं की आपल्याकडे स्मरणरंजनात रंगणारा एक मोठा लेखकवर्ग आहे. स्टालिन, ट्रॉटस्की वगैरेंच्या पुढे काही हा विचारवंतांचा वगैरे वर्ग गेलेला नाही. त्यामुळे विद्यमान रशियाचं प्रतिबिंब आपल्याकडे माध्यमांत दिसतच नाही. तेव्हा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं.
पण आतापर्यंतचा रशियाचा इतिहास हा पक्षीय अभिनिवेशाला दूर ठेवत समजून घ्यायचा असेल तर आणखी एक पुस्तक नुसतं वाचनीयच नाही तर संग्रहणीयदेखील आहे, ते म्हणजे ‘द पेंग्विन हिस्टरी ऑफ मॉडर्न रशिया : फ्रॉम झारीझम टू द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’. क्रांती, नागरी उठाव, दहशतवाद ते आताची अवस्था अशा अनेक टप्प्यांवर रशिया समोर येत असतो. त्याची क्रमवार आणि तपशीलवार मांडणी लेखक रॉबर्ट सव्‍‌र्हिस यांनी या पुस्तकात अत्यंत उत्तमपणे केली आहे. रशियाचा राजकीय इतिहास देता देता या देशाच्या आर्थिक अवस्थेवर ते उत्तम भाष्य करतात आणि तो देश समजून घ्यायला त्यामुळे मदतच होते.
आता मे महिन्यात पुतिन पुन्हा सत्तेवर आलेत. त्यांना सत्तेवर आणणाऱ्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुका बनावट होत्या अशी नागरिकांची धारणा आहे. पण पुतिन यांना पर्वा नाही. अमेरिकेच्या डॉलरचं स्थान हिरावून रुबल्सला जगाचं चलन बनवण्याचं अशक्यप्राय असं स्वप्न ते बघतायेत.
..आणि त्याच वेळी गेले काही महिने रशियात मोठय़ा प्रमाणावर पुतिन यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की, पुतिन यांना राज्य करणं आता अवघड जाईल. त्या देशातनं पूर्ण आणि खरी माहिती मिळत नाही. अजूनही तिथला पोलादी पडदा पूर्णपणे हटलेला नाही. अशा वेळी त्या पडद्यामागचा खुनशी सूत्रधार आहे तरी कसा, हे जाणून घ्यायला या पुस्तकांमुळे मदतच होईल.


-गिरीश कुबेर ,लोकसत्ता
girish.kuber@expressindia.com


  1. The Man without a Face: The Unlikely Rise of Vladimir Putin by Masha Gessen
  2. The Penguin History of Modern Russia by Robert Service

     

Saturday, August 25, 2012

माणूस आणि त्याच्या भोवतीची नैसर्गिक संपत्ती यांच्यातील देवाण-घेवाण तसेच, ही संपत्ती कशासाठी वापरली जाते आणि त्यात अचानक बदल झाला तर नेमके काय परिणाम होतात, एखादी समाजरचनाच उन्मळून पडते की, समाजातील एखादा घटक शिरजोर बनतो की दोन्ही घडते.. या सगळ्यांचा मागोवा या पुस्तकात घेतला गेला आहे.
यात एकूण सहा लेख आहेत. प्रत्येक लेख लिहिताना मिलिंद बोकील यांनी त्या-त्या भागात जाऊन भरपूर संशोधन केलं. प्रत्येक विषयाचा अतिशय गंभीरपणे, सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे. हे सर्वच लेख दीर्घ असूनही कुठेही कंटाळवाणे अजिबात वाटत नाही. उलट प्रत्येक लेख म्हणजे एक उत्तम कथानकच बनलेलं आहे.
प्रत्येक विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन त्याची उकल करणं हे मिलिंद बोकील यांचं लेखन वैशिष्टय़ आपल्याला ‘एकम्’ आणि ‘समुद्र’मध्येही बघायला मिळतं.
सबंध भारतात असे एकही अभयारण्य नसेल जेथे माणसे पूर्वीपासून राहत नव्हती. अभयारण्यामध्ये जंगलातील प्राण्यांना आणि वनस्पतींना संरक्षण मिळालं आहे पण, त्यात राहणाऱ्या माणसांचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. ‘प्राण्यांना अभय, माणसांना वनवास’ या लेखात मिलिंद बोकील यांनी या प्रश्नावर प्रकाश टाकला आहे. त्यासाठी त्यांनी कोयना अभयारण्यातील डिचोली गावाचा अभ्यास केला.
कोयना अभयारण्य म्हणून जसं जाहीर झालं तसं, डिचोली आणि इतर गावातल्या लोकांना त्याची झळ जाणवू लागली. फॉरेस्ट खात्याच्या संरक्षणामुळे जंगल वाढायला लागले. जंगलतोड जवळपास बंदच झाली. तसेच जास्त पावसाचा प्रदेश असल्याने जंगलाची वाढ झपाटय़ाने होऊ लागली. जंगलापासून दूर असलेली गावं जंगलाजवळ आली. त्यामुळे अभय मिळालेल्या वन्यप्राण्यांचा गावकऱ्यांना त्रास होऊ लागला. कळंब नावाचे गवत गावकरी छपरासाठी वापरत. ते जंगलातील रानगव्यांनी हुंदाडून नष्ट केले. ही नासाडी इतकी जास्त की त्या गवताचे पुनरुत्पादनच बंद झाले. लोकांच्या घराचे छप्परच नाहीसे झाले. अभय मिळाल्यानं डुकरांची संख्या बेसुमार वाढू लागली. ही डुकरं संपूर्ण शेतं उध्वस्त करू लागली. इतर हिस्र प्राण्यांचा त्रास होऊ लागला तो वेगळाच.
कोयना धरणाची वीज वापरून बाकीचा महाराष्ट्र समृद्ध झाला पण, ज्यांची घरेदारे त्यामध्ये बुडाली त्या सर्वाना अजूनही पूर्णपणे न्याय मिळाला नाही.
‘भूमिकन्यांचे भालप्रदेश’ या लेखात लातूरच्या भूकंपानंतर ज्या स्त्रिया विधवा झाल्या, त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या शेतजमिनी मिळून त्या शेतकरी झाल्या. जमीन कसत असताना स्त्री म्हणून आणि त्यात विधवा म्हणून येणाऱ्या अडचणी, त्यांचे समाजातले स्थान, त्यांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था याबद्दल विस्तृत माहिती सांगितली आहे.
भूकंपामुळे विधुर झालेल्या अनेक पुरुषांनी पुनर्विवाह केलेत. अनाथ मुलांना जवळचे नातेवाईक आणि स्वयंसेवी संस्था यांचा आधार मिळाला. एकटय़ा पडल्या त्या या विधवा स्त्रिया पण, न घाबरता, हिमतीनं या स्त्रिया शेतीची सर्व कामं शिकल्या आणि स्वबळावर शेती करू लागल्या. बोकील लिहितात, ‘रामायणातल्या भूमिकन्या सीतेने पुरुषप्रधान व्यवस्था असय्य झाली म्हणून भूमातेची प्रार्थना केली आणि भूमातेने तिला पोटात घेऊन मुक्त केले. विसाव्या शतकाच्या अखेरीस भूमातेने बाकी सर्व पोटात घेतले पण, भूमिकन्यांना मात्र जिवंत ठेवले, नांगरांच्या फाळाने त्यांनी मुक्तीचा नवीन मार्ग शोधावा म्हणून.’
‘किनाऱ्यावरचा कल्पवृक्ष’ या लेखात डहाणू तालुक्यातील बोर्डी गावच्या परिसरात चिक्कूच्या झाडाच्या लागवडीमुळे लहान आदिवासी शेतकऱ्यांतही कशी आर्थिक क्रांती घडून आलेली आहे याबद्दल समजते. यात चिक्कूच्या फळाचा इतिहास, त्याची लागवड, त्याचे गुणधर्म आणि या लागवडीमुळे आदिवासींचे झालेले सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तन तसेच या क्रांतीमागचे प्रवर्तक डॉ. जयंत पाटील यांचे कार्य, याबद्दल परिपूर्ण माहिती यात मिळते. मिलिंद बोकील लिहितात, ‘बोर्डीच्या किनाऱ्यावर जो कल्पवृक्ष उभा आहे तो म्हणजे चिक्कूचे झाड नाही. त्या झाडापेक्षा विशाल, त्यापेक्षा दणकट आणि त्यापेक्षा कनवाळू असा तो समाजसेवेचा वृक्ष आहे. त्या वृक्षाची जोपासना अनेक ज्ञात आणि अज्ञात कार्यकर्त्यांनी आपला घाम, अश्रू आणि प्रसंगी रक्त शिंपून केली आहे.’
‘भरती आणि ओहोटी’ या लेखात एका मोठय़ा औद्योगिक कारखान्यामुळे (लक्ष्मी मित्तल यांचा इस्पात इंडस्ट्रीज लि.) पर्यावरणाचा कसा विनाश घडला आणि हातावर पोट असणाऱ्या मच्छीमारांचे आयुष्य कसे उध्वस्त होत गेले ते दिले आहे.
मोठय़ा औद्योगिक कंपन्या, त्यांच्याशी हातमिळवणी करणारे भ्रष्ट राजकारणी हे एका बाजूला आणि अशिक्षित, असंघटित, उपेक्षित अल्पसंख्य लोकं दुसऱ्या बाजूला यांच्यातील संघर्ष विस्ताराने दिला आहे. एक गट कमकुवत तर एक गब्बर यांच्यातही संघर्ष होऊ शकतो. कारण या अशिक्षित लोकांना शिवकरांसारखा ध्येयनिष्ठ आणि लढाऊ नेता मिळतो.
बोकील म्हणतात, अशाप्रकारच्या संकटाला विरोध करणे हे सोपे काम नाही. कारण असे प्रकल्प हे ‘मागास भागाचा विकास’ या चंदेरी वेष्टनात गुंडाळून आणलेले असतात. यात नक्की फायदा कोणता आणि तोटा कोणता, हेच स्पष्टपणे समजत नाही. औद्योगिक क्रांती ही देशाच्या विकासासाठी नक्कीच चांगली पण, त्यामुळे याच देशातील एखादा समाज उध्वस्त होऊन कसे चालेल? विकास ज्या सृष्टीच्या आधारे करायचा, ती सृष्टी सजीव, समृद्ध आणि संवर्धनशील असणं गरजेचं आहे.
शेवटी मिलिंद बोकील म्हणतात, ‘समुद्र आणि खाडय़ांना भरती-ओहोटी रोजच येत असते. भरतीनंतर ओहोटी आणि मग पुन्हा भरती हे चक्र चालूच असते. मानवी समाजाने मात्र स्वत:ला या चक्रात बांधून घ्यायचे की नाही, ते ठरवणे गरजेचे आहे. नाही तर काही जणांना भरती येईल तेव्हा इतरांना ओहोटी लागेल. ज्यांना भरती येईल त्यांचे जगणे वैभवसंपन्न होईल पण, ओहोटी लागलेले मात्र दरिद्री होऊन जातील. भरती आणि ओहोटीच्या या चक्रात गुंतून पडायचे की कधीतरी त्याचा भेद करून स्वस्थ, समृद्ध आणि संतुलित समाजाचे स्वप्न बघायचे, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.’  


- सुहास खानझोडे,लोकसत्ता
 
  Book: जनाचे अनुभव पुसतां 

Author: मिलिंद बोकील 
Category: कथासंग्रह
Language: मराठी
Publication: मौज प्रकाशन -(पहिली आवृत्ती : २००२)
Price:  १५० रुपये

 हे पुस्तक भारतात कोठेही घरपोच मागवण्यासाठी येथे टिचकी मारा.

[enotes: Milind Bokil (1960) is one of the important and frontline Marathi writers today. He has brought in newer kinds of sensibilities to Marathi literature by introducing different subjects and enlarging the scope of human consciousness. His writing is imbued with a quest for meaning in life and presents a finer understanding of personal emotions and social relationships without sacrificing artistic dexterity. Bokil is a sociologist by profession and has also written extensively about rural and tribal communities as well as on development issues.] 

Monday, July 30, 2012

इस्रायलची एकांगी स्तुती, त्या राष्ट्राच्या विजिगीषु वृत्तीचा उदोउदो, यांमागे अनेकदा अहंकारी दर्पही असू शकतो. तो नसेल, तर ही दोन पुस्तकं वाचायला हवीत. इस्रायलला आदर्श मानून त्याचा अभिमान बाळगण्याचं कारण नाही,
हे सप्रमाण आणि  साधार सांगतानाच पॅलेस्टिनी विरुद्ध इस्रायली या लढाईच्या दोन्ही बाजू समतोलपणे मांडणारं ‘होली लँड, अनहोली वॉर’ हे पुस्तक आणि दुसरं- पॅलेस्टिनींचे नेते अराफात यांच्यासह काम केलेल्या एका माजी पॅलेस्टिनी राष्ट्रवादय़ानं लिहिलेलं पुस्तक! तडजोडवादी राजकारण आणि बळींनी पुन्हा छळवादी होणं म्हणजे काय, याचा पक्का अदमास ही पुस्तकं देतात..

मोहम्मद यासर अब्दुल रहमान अब्दुल राउफ अराफात अल कदा अल हुसैनी.. इतक्या अगडबंब नावानं सहसा आपल्याला काही संदर्भ लागणार नाही. पण यासर अराफात म्हटलं की बऱ्याच गोष्टी लख्खकन दिसू लागतात. या शतकातल्या रंगीबेरंगी व्यक्तींची यादी करायची म्हटलं तर या माणसाचा क्रमांक नक्कीच पहिल्या पाचांत लागेल. माणूस आयुष्यभर पॅलेस्टिनींसाठी जगला. पॅलेस्टाइन या देशाची स्वतंत्र भूमी पाहावी, हे त्याचं आयुष्यभराचं ध्येय होतं. ते साध्य करण्यासाठी त्यांनी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला. फताह ही दहशतवादी संघटना काढली. तिच्या मार्फत वाटेल ते उद्योग केले. ते करताना अमाप पैसा मिळवला. ज्यांच्यासाठी ते लढत होते.. निदान तसा आभास निर्माण करीत होते.. ते पॅलेस्टिनी भणंगासारखं, निर्वासितांचं आयुष्य जगत असताना अराफात यांची जीवनशैली एखाद्या o्रीमंत राष्ट्रप्रमुखालादेखील लाजवेल अशी होती. यांची पत्नी पॅरिसला अतिश्रीमंती आयुष्य जगत होती. तिला पैसा अराफात यांच्या संघटनेकडनं जात होता. या संघटनेकडे कुठून यायचा पैसा? अनेक इस्लामी देशांकडून. असो. मुद्दा अर्थातच त्यांच्याकडच्या पैशाचा नाही. तो काय तमिळ वाघांचा प्रमुख प्रभाकरन याच्याकडेही होता. जगात कोणीही कोणाविरुद्ध काही तरी करतंय म्हटल्यावर कोणी ना कोणी तरी मदत करणारा असतोच. त्यात एखाद्या देशाविरोधात काही होतंय म्हटल्यावर त्या देशाविरोधात असणारे त्या कथित बंडखोराच्या मागे उभे राहतातच.
पण गमतीचा भाग म्हणजे या सगळय़ाचा तपशील माहीत नसलेले जनसामान्य हा विरुद्ध तो या भूमिकेतूनच आसपासच्या घटनांकडे पाहत असतात. त्यात या ‘हा विरुद्ध तो’ला धर्माचा स्पर्श झाला की, पाहायलाच नको. मग तर समीकरण अगदीच सोपं होऊन जातं. त्यामुळे यहुदी धर्मीयांचा इस्रायल आणि अरब-पॅलेस्टिनींची संघटना यांच्यात बारा महिने चौदा काळ हाडवैर असणार, असं आपलं मत बनून जातं. वरकरणी ते बरोबरही असतं म्हणा. परंतु बऱ्याचदा हे विरुद्ध वाटणारे तसे आतून एकमेकांच्या हिताचंच काम करीत असतात, हे आपल्याला माहीत नसतं. उदाहरणार्थ इस्लामधर्मीय इराण आणि यहुदी इस्रायल हे जनसामान्यांच्या समजाप्रमाणे एकमेकांचे कट्टर वैरीच असायला हवेत. पण अगदी अलीकडेपर्यंत इस्रायल हा कडवे म्हणून ओळखले जाणाऱ्या अयातोल्ला खोमेनी यांच्या इराणचा शस्त्रास्त्र पुरवठादार होता, हे आपल्याला माहीतच नसतं. किंवा या अराफात यांनीसुद्धा अनेकदा पडद्यामागून इस्रायली नेतृत्वाशी हातमिळवणी केली असू शकेल, हे आपल्या गावीही नसतं. पॅलेस्टिनींसाठी लढणारी आणखी एक संघटना होती हमास. अहमद यासीन या गूढ गृहस्थानं ती स्थापन केली होती. हा अराफात यांच्यापेक्षा कडवा होता. इस्रायलचं अस्तित्व नकाशावरनं पुसायलाच हवं, असं म्हणायचा. त्याला एका भल्या सकाळी इस्रायली फौजांनी क्षेपणास्त्रानं टिपलं. तर अराफात यांच्या फताह या संघटनेचा वापर बऱ्याचदा इस्रायलीवादी शक्तींनी- म्हणजे अर्थातच अमेरिका वगैरेंनी- अहमद यासीन यांच्या हमासविरोधात सोयीस्करपणे केला. अराफात यांनी तो करूही दिला. त्याचमुळे तर अमाप दहशतवादी कृत्यं करूनही शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक मिळवण्याची किमया अराफात यांना साधता आली. राजकारणात आजचा दहशतवादी उद्याचा शांततावादी असा ठरतो.
तर या अराफात यांचा सहकारी होता अबू शरीफ नावाचा. याचं ‘अराफात अँड द ड्रीम ऑफ पॅलेस्टाइन’ अशा नावाचं एक पुस्तक आहे. हा अबू स्वत: कडवा दहशतवादी म्हणून विख्यात- किंवा कुख्यातही- होता. फताह या अराफात यांच्या संघटनेच्या आधीही पॅलेस्टिनींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या. पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन या नावाची त्यातली सगळय़ात मोठी. अबू शरीफ तिच्यासाठी काम करायचा. विमान अपहरणं वगैरे दहशतवादी कृत्य त्याच्या डाव्या हाताचा मळ होती. एकेकाळी टाइम साप्ताहिकानं दहशतवादाचा चेहरा असं त्याचं वर्णन केलं होतं, इतका तो कडवा होता. तो इतका उपद्रवी होता की एकदा मोसाद या इस्रायली गुप्तहेर संघटनेनं त्याच्याकडे पुस्तक पाठवलं. ‘द मेमॉयर्स ऑफ चे गवेरा’ नावाचं. चे हा रोमँटिक बंडखोर अनेकांचा प्रेरणास्थान होता. तर अबूनं हे पुस्तक उघडलं आणि ढम्कन त्यातला बाँब फुटला. अबूचा एक डोळा, एक कान आणि चार बोटं त्यात उडाली. पुढे त्याला उपरती झाली असावी आणि तो पॅलेस्टिनी प्रश्न दहशतवादानं सुटणार नाही असं म्हणायला लागला. इजिप्तचे त्या वेळचे अध्यक्ष होस्नी मुबारक वगैरेंशी तो चर्चा करायला लागला. त्याच्या संघटनेला हे काही आवडलं नाही. बऱ्याचशा दहशतवादी संघटना वा चळवळी एकदा स्थिरस्थावर झाल्या की खंडणीखोरी करायला लागतात. त्यांचा चेहरा दहशतवादाचा असतो. पण उद्दिष्ट कधीच मागे पडलेलं असतं. नंतर नंतर अशा संघटनांचं पोट दहशतवादावरच अवलंबून असतं. याही संघटनेचं तसं होतं. त्यामुळे अबूनं जरा काही वेगळा सूर काढला म्हणून संघटनेचे पदाधिकारी त्याच्यावर चिडले. त्याला काढूनच टाकलं त्यांनी. मग हा आला यासर अराफात यांच्याकडे. अराफात यांच्या बऱ्याच उद्योगांचा हा साक्षीदार. त्यामुळे त्याच्या पुस्तकात एक मजा आहे. म्हणजे दहशतवादीही आपली कृत्यं कशी उदात्ततेच्या मुलाम्यातून सांगू शकतो. हे त्यातून समजतं. अराफात यांनी १९६७ साली गुप्तपणे जेरुसलेमला भेट दिली होती. इस्रायली नेत्यांशी चर्चा करण्यासाठी. खरं तर हे महामोठं अब्रह्मण्यम त्यांच्या हातून घडलं. तर तिकडे जाताना ते कोणत्या मार्गानं कसे चोरून गेले, वाटेत कोणत्या डोंगराच्या गुहेत राहिले.. वगैरे अनेक मनोरंजक मसालेदार चिजा या पुस्तकात जागोजागी आढळतात. पुढे लिबियाच्या वाटेवर असताना वाळूच्या वादळात यासर अराफात यांचं विमान सापडलं आणि भरकटून कोसळलं. अनेकांना वाटलं त्यांच्या जिवाचं काही बरंवाईट झालं. पण अराफात त्यातून वाचले. विमानाचे तीन तुकडे झाले होते आणि वैमानिक आणि त्याचा साथीदार जागच्या जागीच गेले होते.
पॅलेस्टिनींच्या प्रश्नाचं काय झालं हे या पुस्तकातून कळणार नाही. पण त्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचं काय झालं, अगदी २००४ सालच्या त्यांच्या निधनापर्यंत.. हे सगळं वाचायला यात नक्की मिळतं. पण मुळात हा पॅलेस्टिनींचा प्रश्न नक्की काय आहे हे तटस्थपणे समजून घ्यायचं असेल तर अंतोन ला गार्डिया यांचं ‘होली लँड, अनहोली वॉर’ हे पुस्तक वाचणं उत्तम. इस्रायलची भूमी पवित्र मानली जाते. अगदी बायबलमध्ये त्याचा संदर्भ आढळतो.. जॉर्डन नदीच्या काठावर जगातील समस्त यहुदींची स्वप्नभूमी कशी आकाराला येणार आहे. असा दृष्टान्त दिला गेलाय. या सगळय़ा नवदेशाच्या जन्माची भव्य कहाणी सांगणारी लिऑन उरिसची अजरामर ‘एक्झोडस’ खूप आधी वाचली होती. पुढे या सगळय़ा राजकारणावर, त्यातलं धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसाचाराचं ‘अधर्मयुद्ध’ लिहीत असताना एका परदेशी पत्रकार मित्रानं ‘होली लँड..’ वाचायचा सल्ला दिला. अत्यंत योग्य ठरला तो.
 याचं कारण असं की पॅलेस्टाइन आणि ज्यू प्रश्नावर लिहिलेली पुस्तकं अभिनिवेशी आहेत. या किंवा त्या बाजूची. त्या विषयावरील उत्तम तटस्थ पुस्तकाचा शोध त्यामुळे ‘होली लँड..’पाशी येऊन थांबतो. अंतोन लंडनच्या टेलिग्राफचा इस्रायलमधला वार्ताहर होता. त्या अधिकारातून अनेक ठिकाणी त्याला जाता आलं. पाश्चात्त्य देशांतल्या पत्रकारांना हा एक फायदा असतो. अन्यथा इस्रायलमधे राहून रमल्ला इथं पॅलेस्टिनींशीही संपर्क ठेवायचा.. अशी दुहेरी जगण्याची सोय अन्य देशांतल्या वार्ताहरांना नसते. पण ती अंतोनला असल्यामुळे त्याला अनेकांच्या मुलाखती घेता आल्या, अनेकांच्या कूळकथा मांडता आल्या आणि इतिहासाकडे निकोप वर्तमानाच्या नजरेतून पाहता आलं.
 त्यातून तयार झालं.. होली लँड. त्यानं त्यात काही मूलभूत प्रश्न मांडलेत. १९४८ साली हा देश जन्माला येत असताना बेन गुरियन वगैरे मंडळींनी सर्व जगातील ज्यूंना पॅलेस्टिन नदीच्या खोऱ्याकडे मार्गक्रमणा करायला सांगितलं आणि बघता बघता अरबांच्या निवासावर अतिक्रमणं सुरू झाली. या संदर्भातल्या दोन्ही बाजूंच्या कहाण्या ‘होली लँड..’मध्ये आहेत. त्या मांडताना अंतोन जसा ज्यूंना अनेक प्रश्न विचारतो तसाच पॅलेस्टिनींवर- विशेषत: त्यांच्या नेतृत्वावर- चांगलीच टीका करतो. इस्रायलचा जन्म व्हावा म्हणून वर्षांनुर्वष राहत असलेल्या अरबांना कसं हुसकावलं गेलं, याची कहाणी वाचताना अनेक प्रश्न पडतात. त्याहीपेक्षा आपल्याकडे इस्रायलविषयी असलेले अनेक गोड भ्रम दूर व्हायला मदत होते.
ते आवश्यक आहे. कारण इस्रायल आणि त्यांचा इतिहास विजिगीषु वगैरे म्हणतात ती वृत्ती यावर आपल्याकडे छाती फुगवून ‘गर्व से कहो..’ पद्धतीनं बरंच काही बोललं जातं. त्यातलं फसवेपण अधर्मयुद्धमध्ये मांडायला मिळालं. इथं ‘होली लँड..’मध्ये त्याला भरपूर जागा मिळालीय. आणि महत्त्वाचं म्हणजे अंतोन दोन्ही बाजूंविषयी तितकाच कठोर आहे. ज्यू हे दुसऱ्या महायुद्धात नाझींनी केलेल्या अत्याचारांचे बळी आहेत, हे तर तो सोदाहरण सांगतोच; पण अरब हे बळींचे बळी कसे आहेत, हेही तो उत्तमपणे समजावून सांगतो. तेव्हा पॅलेस्टिनी प्रश्न आणि त्या प्रश्नांवर जगणारे यासर अराफात हे दोन्ही विषय ठसठशीतपणे आपल्यासमोर उभे राहतात.
 विलासी जीवनशैलीत राहणाऱ्या यासर अराफात यांच्या पत्नीनं गेल्या आठवडय़ातच आरोप केलाय.. अराफात मेले नाहीत, त्यांना विषप्रयोगानं मारण्यात आलंय.. त्यामुळे, अराफात याचं दफन केलेलं कलेवर उकरून काढलं गेलंय. विषप्रयोग झाला किंवा नाही, हे तपासण्यासाठी. त्या निमित्तानं आता इतिहासाची मढीही उकरली जातील. तेव्हा हे नक्की काय प्रकरण आहे, हे आपल्याला माहीत असावं!


Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians by Anton La Guardia

Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account by Bassam Abu Sharif
 -गिरीश कुबेर ,लोकसत्तासाठी
girish.kuber@expressindia.com



माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही पुस्तकांचा मराठी अनुवाद अजून कोणी प्रकाशित केलेला नाही.मराठी अनुवाद प्रसिध्द झाल्यास कृपया वाचकांनी comment  form मध्ये प्रकाशक,किंमत यांची माहिती द्यावी ही नम्र विनंती.

(1)Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account by Bassam Abu Sharif हे इंग्रजीतील पुस्तक मोफत घरपोच मागवण्यासाठी  कृपया येथे क्लिक करा.
Buy Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account from Flipkart

(2) Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians by Anton La Guardia हे इंग्रजीतील पुस्तक मोफत घरपोच मागवण्यासाठी  कृपया येथे क्लिक करा.
Buy Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians from Flipkart
[This review is about the famous books-1) Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians by Anton La Guardia(2)Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account by Bassam Abu Sharif ]

Thursday, June 28, 2012


Frederick Forsyth
कधीकाळी तो बातमीदार होता.. आता केवळ तडाखेबंद खपाचाच नव्हे तर ‘प्रश्न पाडणारा’ लेखक आहे. त्याची एखादी कादंबरी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत नव्यानं दाखल होणारे क्रमिक पुस्तकासारखी वाचतात, पण याच यंत्रणेच्या क्रौर्याचं चित्रण करणारी त्याची दुसरी कादंबरी ब्रिटिश सरकारलाही या क्रौर्याची कबुली द्यायला लावते.. जगातले बारकावे टिपणारा, तपशिलात वर्णन करणारा फ्रेडरिक फोर्सिथ प्रत्यक्ष भेटीत ‘मी लेखकबिखक नाही’ म्हणाला, त्यात थोडंफार तथ्यही आहे. पण याला जग कळतं. इतरांपेक्षा लवकर कळतं. म्हणूनच, वाचणाऱ्याला प्रश्न पडतात!



आपल्याकडे कादंबरी लेखनाचा, म्हणजे अर्थातच लेखकाचा, परीघ ठरलेला असतो. गाव, जिल्हा.. फारच म्हणजे एखादी सिंहासन वगैरे आली तर, राज्य. त्यापुढे काही आपण जात नाही. झेपतच नाही आपल्याला. तीच तीच माणसं, त्यांच्या त्याच त्या व्यथा. मग त्यांच्यातल्या नातेसंबंधांच्या मनोव्यापाराचा आढावा आपले लेखक घेतात. मग ते झाल्यावर उरलेले लेखक मनोव्यापाराचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम आपल्या लेखनात मांडतात. मग ते वाचून आपण टाळय़ा वगैरे वाजवतो आणि मराठी कादंबरी किती खोल वगैरे गेल्याचे एकमेकांना सांगू लागतो.
आपल्या कादंबरीची इयत्ता कंची हा प्रश्न स्वत:लाच विचारून घ्यायचा असेल तर फ्रेडरिक फोर्सिथ वाचणं, हे राष्ट्रीय कर्तव्य मानायला हवं. एक तर त्याचे विषय. कधी त्यात जैविक युद्ध असतं. जनरल द गॉल या फ्रान्सच्या सर्वोच्च सेनानीची हत्या असते. एकात स्फोटकं घेऊन जाणारी बोटच्या बोट किनाऱ्यावर उत्पात घडवणार असते, तर कधी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारात अमली पदार्थानी घडवलेला हाहाकार असतो. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोविएत रशिया एकमेकांची पिकं कशी संपवतात याचीही तितकीच चित्तथरारक कथा फोर्सिथ रंगवतो. तितक्याच ताकदीनं. त्याच्या कादंबऱ्यांत एक प्रकरण व्हाइट हाऊसमधे घडतं. पुढचं युरोपीय राष्ट्रांच्या मुख्यालयात ब्रसेल्सला, तिसरं प्रागमध्ये. चौथं मॉस्कोत. पाचवं लंडनमध्ये. त्यात मध्येच कोणीतरी दिल्लीला वगैरे येऊन गेलेला असतो. आणि हे सगळे शेवटच्या दोनेक प्रकरणांत एकमेकांच्या सहवासात येतात आणि त्याची महाकादंबरी आपल्याला अचंबित करून संपते. यातला महत्त्वाचा भाग असा की ही गावं नुसती यायची म्हणून येत नाहीत. त्यातील बारीक सारीक तपशिलासह ती रंगवलेली असतात. म्हणजे कोणत्या नाक्यावर कसलं दुकान आहे, कोणतं कार्यालय आहे. त्यात काय होतं. वगैरे संपूर्ण तपशील.
मुळात मोठे इंग्रजी लेखक खूप, खूप तपशिलासह लिहितात. ललित वाङ्मय आहे म्हणून ठोकून देतो ऐसाजे असा प्रकार नाही. आणि यात फोर्सिथ इतरांपेक्षा मोठा का? तर त्याच्या व्यक्तिरेखाही खऱ्या असतात. म्हणजे त्याच्या कादंबऱ्यांत बिल क्लिंटन असतात. मार्गारेट थॅचर असतात. सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, क्युबातल्या छळछावण्या, डोनाल्ड रम्सफेल्ड.. असे सगळे खरे खरे असतात आणि फोर्सिथचं लिखाण नाकारणं त्यांनाही जमत नाही. आसपास जिवंत असलेल्या मंडळींवर लिहायचं तर खूप अभ्यास लागतो. फोर्सिथ तो करतो. आपल्याकडे अभ्यास हा रंजकतेच्या मुळावर येतो, असं मानायची पद्धत आहे. असं ज्यांना वाटतं त्यांनी फोर्सिथ वाचणं ही काळाची गरज समजावी आणि अधिक वेळ न दवडता फोर्सिथ वाचायला सुरुवात करावी. याचा तपशिलाचा अभ्यास इतका असतो की, ब्रिटनच्या एमआय-फाइव्ह या सरकारी गुप्तहेर यंत्रणेत दाखल होणाऱ्यांना क्रमिक पुस्तकं म्हणून फोर्सिथ वाचायला लावतात. यावरनंच त्याचा विषयांचा आवाका आणि अभ्यासाची बैठक लक्षात येऊ शकेल.
फोर्सिथ सुरुवातीला ब्रिटनच्या हवाई दलात पायलट होता. नंतर ते झाल्यावर छोटय़ामोठय़ा वर्तमानपत्रांत वार्ताहरी केली. पुढे तर रॉयटर्ससाठी झेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, फ्रान्स अशा अनेक ठिकाणी तो बातमीदार होता. शीतयुद्धाच्या तापत्या झळांनी जगाला वेढलं होतं तो काळ. चांगला बातमीदार असल्यानं आसपासच्या घटना तो सजगपणे टिपत गेला. त्यातूनच त्याची कादंबरी जन्माला आली ‘द डे ऑफ द जॅकल’. तिच्यावर सिनेमाही आल्यानं ती बऱ्यापैकी माहिती असते. पण फोर्सिथच्या पुढच्या अनेक कादंबऱ्या जॅकलपेक्षा कितीतरी उंचीच्या आहेत. जगाच्या राजकारणाचा थरार ज्यांना अनुभवायचा असतो त्यांच्यासाठी फोर्सिथसारखा दुसरा आनंद नाही. द ओडिसा फाइल्स, द डॉग्ज ऑफ वॉर, द फोर्थ प्रोटोकॉल, द निगोशिएटर, द डिसीव्हर, द डेव्हिल्स आल्टरनेटिव्ह.. अशा किती सांगता येतील. याच्याही नंतरची माझी प्रचंड आवडती म्हणजे द फिस्ट ऑफ गॉड. इराकच्या सद्दाम हुसेन याने तयार केलेली अण्वस्त्रं इस्रायली बाँबफेकी विमानं जाऊन नष्ट करतात, या सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी अशावेळी हाती आली की, मी तेलाच्या राजकारणात पिंपभर बुडालो होतो. फिस्ट ऑफ गॉड सलग वाचून, एकाच बैठकीत संपवावी लागते. तशी मी ती संपवली आणि फोर्सिथ घरी जमा व्हायला लागले. द फिस्ट ऑफ गॉड इतकी परिणामकारक आहे की, त्यानं ती आधी लिहिली आणि मग इस्रायलनं त्याप्रमाणे कृती केली असं वाटावं.
शिष्यवृत्तीच्या निमित्ताने १९९८ साली लंडनला सहा महिने राहायला मिळालं. त्यावेळी करायच्या कामात एक काम होतं फोर्सिथला भेटायचं. एका रविवारी त्याच्या घरी धडकलो. लंडनच्या उत्तरेला हर्डफोर्डशायरला त्याचं घर आहे. घर कसलं, हवेलीच ती. जवळपास तिनेकशे र्वष जुनी. आणि आत प्राणिसंग्रहालय. अगदी गाढवसुद्धा. त्याचं नाव आइन्स्टाइन का असंच काहीतरी. त्याचा विक्षिप्तपणा लक्षात येईल असं. पहिल्या भेटीतच तो सांगून जातो, ‘मी लेखकबिखक नाही’ आणि आपल्याला धक्काच बसतो. आपण म्हणजे त्याचे चाहते वगैरे असतो आणि हा तर म्हणतो मी लेखकच नाही. प्रश्न त्यामुळे त्याचं काय होणार हा नसतो, तर आपलं काय झालं हा असतो. तर फोर्सिथ त्याची लेखनप्रक्रिया उलगडून सांगतो.
तेव्हा जाणवतं की त्याला ठाम अशी राजकीय, परराष्ट्र राजकारणातली मतं आहेत आणि लेखक म्हणून तो भूमिका मांडायला अजिबात घाबरत नाही. म्हणजे पंतप्रधान म्हणून टोनी ब्लेअर अगदीच कुचकामी आहेत आणि इराक युद्धावरनं त्यांच्यावर महाअभियोग चालवून त्यांना हाकलून लावायला हवं.. इतक्या स्वच्छपणे त्यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या लिखाणातही ही भूमिका लपत नाही. म्हणजे त्याच्या एका कादंबरीत (द डिसीव्हर) त्याच्या एका गुप्तहेरास ब्रिटन निर्घृणपणे मारतं. यातली मेख अशी की मारला गेलेला गुप्तहेर आयरिश रिपब्लिकन आर्मीचा म्हणजे ‘आयआरए’चा असतो आणि त्याचवेळी ब्रिटन आणि आर्यलड यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झालेले असतात. यातला धक्कादायक भाग असा की, हे पुस्तक आलं त्याचवेळी आयआरएचा एक हेर गूढ अवस्थेत मेलेला आढळला होता. त्याच कादंबरीत फोर्सिथनं लिहिलेलं असतं : मारल्या गेलेल्या आयआरए बंडखोरांच्या अंत्यविधीप्रसंगी जमलेल्यांत काय चर्चा होते आहे हे कळावं म्हणून शवपेटय़ांतून सुद्धा ब्रिटनने हेरगिरीची यंत्रणा कशी ठेवलेली होती, हे छापून आल्यावर फोर्सिथला बऱ्याच निषेधाला तोंड द्यावं लागलं. परंतु नंतर ब्रिटिश सरकारला मान्य करावं लागलं- शवपेटय़ांत ट्रान्समीटर होते ते. फोर्सिथ बीबीसी रेडिओवरही दर शनिवारी कार्यक्रम करायचा. कमालीची लोकप्रियता लाभलेल्या या कार्यक्रमात त्याची मतं नेहमीच्याच परखडपणे समोर यायची. तो सांगतो की कादंबरीत फक्त मुख्य कट, त्याची आखणी, मांडणी त्याची असते. म्हणजे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेत वगैरे मुख्य शल्यक कसा हृदय बाहेर काढताना आणि परत आत ठेवून चालू करण्याचं काम करतो- बाकीची फाडाफाडी वगैरे छोटीमोठी कामं त्याचे सहायक डॉक्टर करतात- तसं फोर्सिथचं आहे. पुस्तकासाठी लागणारी बाकीची जुळवाजुळव त्याच्या पदरी असलेले लेखक करतात. एकदा का ती झाली की फोर्सिथ आणि त्याचे हे लेखक त्याच्या मालकीच्या बेटावर जाऊन राहतात.
..आणि मग तिथून जन्माला येते एक नवी कादंबरी. एक नवी सत्यकथा. त्याला भेटल्यानंतर त्याची दोन पुस्तकं आली. द अफगाण आणि कोब्रा. ‘नाइन इलेव्हन’मध्ये विमानं जाऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींना धडकतात. ‘द अफगाण’मधे अख्खीच्या अख्खी, महनीय व्यक्तींनी भरलेली बोट. तिच्यावरचं संकट टाळतो कर्नल माइक मार्टिन. ओसामाच्या कळपात शिरून त्याची संपूर्ण यंत्रणा माइक समजावून घेतो आणि त्याच्या रूपानं फोर्सिथ ती आपल्यासमोर मांडतो. फोर्सिथ चाहत्यांचा माइकशी चांगला परिचय असतो. कारण द फिस्ट ऑफ गॉडमध्ये त्यानेच महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. वाईट एवढंच की हा माइक आता परत भेटणार नसतो. अफगाणमध्येच त्याचा शेवट होतो.
अलीकडेच त्याचं ताजं पुस्तक आलंय. द कोब्रा. अमली पदार्थाची निर्मिती, त्याचा व्यापार याचं हिंस्र जग या पुस्तकातून समोर येतं. आणि कळते त्या जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेली देशोदेशींची चढाओढ. फोर्सिथची सगळी वैशिष्टय़ं यातही आहेत. साहजिकच जन्माला येताना त्याची पुस्तकं पहिली आवृत्ती पंधरा लाखाची, वगैरे असं मिरवत येतात.
पण तरीही फोर्सिथ रूढ अर्थानं लेखक नाही. एका अर्थानं बरंच आहे ते. फोर्सिथला एकच माहितीये. आपल्या वाचकांना प्रश्न पडला पाहिजे- याला आधीच कसं काय कळलं, हा!
तो प्रश्न त्याची पुस्तकं आजही पाडत असतात.


 गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com

[ Frederick Forsyth, CBE (born 25 August 1938) is an English author and occasional political commentator. He is best known for thrillers such as The Day of the Jackal, The Odessa File, The Fourth Protocol, The Dogs of War, The Devil's Alternative, The Fist of God, Icon, The Veteran, Avenger, The Afghan and The Cobra.]

Thursday, April 12, 2012


दहावीनंतर करिअरची वाट निवडून लवकरात लवकर मार्गी लागण्याचा ध्यास असंख्य विद्यार्थ्यांना लागतो. त्यांच्या पालकांना तर या सगळ्याची मुलांपेक्षाही अधिक घाई झालेली असते! अशा वेळी एखाद्या मुलाने वर्षभर पुढचे रीतसर शिक्षण न घेता मनाला आवडतील त्या गोष्टी करायच्या ठरवल्या तर.. त्याच्या या इच्छेला त्याचे पालक, शिक्षक, नातेवाईक, समवयस्क आणि इतर कसे रिअ‍ॅक्ट होतील? अशी इच्छा मनात डोकावून जरी गेली तरी इतरांच्या रिअ‍ॅक्शनच्या कल्पनेनेच त्या मुलाला दरदरून घाम फुटेल.. आणि बाकीचे तर त्या मुलाच्या आळशीपणाला बोल लावून त्याचे दिशाहीन कल्पनेचे उधळलेले वारू मारून मुटकून जागेवर म्हणजेच क्रमिक अभ्यासाच्या चौकटीत कसे आणता येईल, याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. काहीतरी वेगळं करण्याची त्या मुलाची ऊर्मी पुरती विझून गेली, की तो मार्गी लागल्याच्या भावनेने सारे कृतकृत्य होतील. मात्र या नेहमीच्या दृश्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रत्यक्षात घडतं तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते. मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेलं ‘शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती’ हे पुस्तक हे असंच वेगळं पठडीबाहेर झेपावणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारं आहे.
ही अशा एका मुलाची गोष्ट आहे, ज्याने दहावीनंतर वर्षभर क्रमिक शिक्षणाच्या चौकटीबाहेरच्या अनेक गोष्टी केल्या. राहुल अल्वारिस हा १६ वर्षांचा मुलगा, ज्याने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आई-बाबांच्या उत्तेजनामुळे वर्षभर औपचारिक शिक्षणापासून सुट्टी घेत विविध स्वरूपातील जीवनकौशल्याचे धडे घेतले. हे पुस्तक म्हणजे एका परीने या वर्षभरात त्याला आलेल्या निरनिराळ्या अनुभवांचं मोकळं केलेलं गाठोडं आहे. आलेले अनुभव शेअर करायच्या दृष्टीने लिहिलेलं डायरी स्वरूपातील लिखाण म्हणजे वेगळं काही करू इच्छिणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही प्रेरणादायी ठरेल, असे अनुभवांचे संचित आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे.
अभ्यासापासून सुट्टी घेत गोव्यात राहणाऱ्या राहुलने त्या वर्षभरात काय नाही केलं? म्हापशातील फिश टँक बनवणाऱ्या एका दुकानात काम केलं, शेतीचा अनुभव घेतला, ग्रीन हेरिटेज प्रदर्शनात सक्रिय सहभागी होऊन वनस्पती, फुलं, रोपटय़ांबद्दल बरंच काही जाणून घेतलं, त्या माहितीची टिपणं काढली. अळंबी कशी वाढवायची, याचे शास्त्रशुद्ध धडे घेतले, तीन आठवडे पुण्याच्या सर्पोद्यानात राहून सर्पाचा अभ्यास केला. १५ दिवस चेन्नईच्या गांडूळ संस्थेत राहून गांडूळ आणि गांडूळखत यांचा अभ्यास केला. त्यानंतर १५ दिवस कोळ्यांचा अभ्यास केला. त्यानंतर महिनाभर चेन्नईजवळच्या ममलापूरम येथील क्रोकोडाईल प्रजनन केंद्रामध्ये राहून मगरी, साप, कासवे, सरडे, घोरपड यांचा अभ्यास केला. त्यानंतर राहुलने काही मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आणि वन्यजीवविषयक माहिती जाणून घेतली. शालेय मुलांच्या कार्यशाळा, शिबिरे घेतली. पाँडेचरीला अरविंद आश्रमात राहिला. उन्हाळ्यात गोवा फाऊंडेशनच्या बेतीम जंगलविषयीच्या एका प्रकल्पावर जंगलात राहून काम केले. त्याच्या वर्षभराच्या अनुभवावर बेळगावच्या एका कार्यक्रमाला पाहुणा म्हणूनही त्याला आमंत्रित केलं गेलं. यातील प्रत्येक अनुभव आणि त्यावर राहुलने काढलेली टिपणं ही केवळ अप्रतिम. या प्रत्येक अनुभवाने त्याला आयुष्यभर पुरेल इतकी ज्ञानाची शिदोरी दिली आहे.
हे सगळं वाचताना हे प्रकर्षांने जाणवतं की, या अनुभवांच्या पलीकडेही तो वर्षभरात बरंच काही शिकला.. एकटय़ाने प्रवास करताना बऱ्याच अनुभवांना तो सामोरे गेला, जाईल तिथल्या लोकांशी त्याला जुळवून घ्यावं लागलं असेल, पानात पडेल ते खावं लागलं असणार, अशा एक ना अनेक छोटय़ा- मोठय़ा गोष्टी शिकत या वर्षभरात प्रत्यक्ष जगण्याच्या अनुभवाजवळ तो अधिक गेला. अनेकदा मनात ठाण मांडून बसलेल्या अनेक भीतींचा निचरा होण्यासाठीही असं एकटय़ाने फिरणं आवश्यक असतंच. आयुष्यात नवनव्या संधींना सामोरं जायला लाखमोलाची ठरणारी गोष्ट म्हणजे बाहेरच्या जगात एकटं वावरण्याचा आलेला आत्मविश्वास- ही गोष्ट राहुल या वर्षभरात शिकला.
हे त्याचे अनुभव वाचताना राहून राहून वाटतं की, जर हे वर्ष त्याच्या वाटय़ाला आलं नसतं आणि अकरावीच्या रुळलेल्या वाटेने तोही गेला असता तर त्याने किती काय काय गमावलं असतं? उलटपक्षी, या वर्षांने राहुलला जे भरभरून देऊ केलं, ते क्रमिक शिक्षणात काही टक्के तरी मिळालं असतं का? याचं श्रेय जसं राहुलचं तसं किंवा त्याच्यापेक्षाही त्याच्या आई-बाबांचं. ज्यांना मुलाचं बोटं नेमकं कधी सोडायचं हे ठाऊकही होतं आणि त्यांनी तसं धाडसही दाखवलं.
राहुलचा हा अफलातून जीवनानुभव हा प्रत्येकाने वाचायलाच
हवा आणि आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनुभवायलाही हवा! 

   
-सुचिता देशपांडे ,लोकसत्ता
suchitaadeshpande@gmail.com

शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती 
- राहुल अल्वारिस,
मनोविकास प्रकाशन,
पृष्ठे ११३, मूल्य ९० रु.

Thursday, March 15, 2012

जयप्रकाश सावंत - लोकरंग(लोकसत्ता)


 योगेंद्र आहुजांच्या कथेतला मोठा अवकाश चिंतनाने व विचारांनी व्यापलेला असतो. ते खरोखरच खूप कमी लिहितात. वर्षांला एक किंवा दोन कथा. बस्स. पण त्यांची कथा एखाद्या नियतकालिकात आलीय किंवा येणार आहे, हे कळल्यावर ते नियतकालिक आवर्जून मिळवावंसं वाटतं, हे निश्चित. आहुजांच्या अशा संयमित लेखनामुळे १९५९ साली जन्मलेल्या आणि कॉलेजच्या दिवसांपासून कथालेखन करणाऱ्या हिंदीतील या महत्त्वाच्या कथालेखकाचा ‘अँधेरे मे हँसी’ हा एकच कथासंग्रह अजूनपर्यंत प्रकाशित झालाय. यावर्षी त्यांचा दुसरा संग्रह येऊ घातलाय. आणि त्याबद्दल जाणकार वाचकांना प्रचंड कुतूहल आहे..
ज्ञा नपीठ पुरस्कारविजेते हिंदी साहित्यिक निर्मल वर्मा यांनी योगेंद्र आहुजांना वीसेक वर्षांपूर्वी पाठवलेल्या एका पत्रात लिहिलं होतं- ‘‘तुमच्या कथेची वाट पाहत असतो.. तुम्ही अशा मोजक्या तरुण लेखकांपैकी आहात, ज्यांच्या कथा ‘विचारां’च्या विश्वात आकार घेतात.’’ यात असलेल्या दोन्ही विधानांची सत्यता योगेंद्र आहुजांच्या कथा वाचणाऱ्यांना पटण्यासारखी आहे. आहुजांच्या कथेतला मोठा अवकाश चिंतनाने व विचारांनी व्यापलेला असतो. आणि ते खरोखरच खूप कमी लिहितात. वर्षांला एक किंवा दोन कथा. बस्स. पण त्यांची कथा एखाद्या नियतकालिकात आलीय किंवा येणार आहे, हे कळल्यावर ते नियतकालिक आवर्जून मिळवावंसं वाटतं, हे निश्चित. आहुजांच्या अशा संयमित लेखनामुळे १९५९ साली जन्मलेल्या आणि कॉलेजच्या दिवसांपासून कथालेखन करणाऱ्या हिंदीतील या महत्त्वाच्या कथालेखकाचा ‘अँधेरे मे हँसी’ (भारतीय ज्ञानपीठ- २००४) हा एकच कथासंग्रह अजूनपर्यंत प्रकाशित झालाय. यावर्षी त्यांचा दुसरा संग्रह येऊ घातलाय, ही माझ्यासारख्या योगेंद्र आहुजांच्या चाहत्यांसाठी विशेष आनंदाची बातमी आहे.
‘अँधेरे में हँसी’ला वाचक व समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दोनेक महिन्यांपूर्वीच भोपाळचा ‘स्पंदन’ संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘स्पंदन कृति पुरस्कार’ या कथासंग्रहाला देण्यात आला. ‘अँधेरे मे हँसी’ला याआधीही दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. या गुणसंपन्न कथासंग्रहातली ‘सिनेमा सिनेमा’ ही कथा कथेत काय काय करता येतं, याचं चकित करणारं भान आणून देणारी आहे. किंबहुना, काही वर्षांपूर्वी तरुण अनुवादक मित्र बलवंत जेऊरकर याने ‘शब्दालय’च्या दिवाळी अंकासाठी केलेला तिचा अनुवाद वाचूनच मी आहुजांच्या लेखनाकडे ओढला गेलो.
उत्तर प्रदेशातील एका छोटय़ा शहराच्या रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांची ही कथा आहे. या दोघांना सिनेमाचं अतोनात वेड आहे. शहराच्या कॅम्प भागात इंग्रजांच्या काळापासून असलेलं एक जुनाट थिएटर आहे. तिथे जाऊन ते मुंबईहून येणारे सिनेमे पाहतात. कॅम्पमधल्या रस्त्यांवरून जीवनानंद दासांच्या कविता, आधीच्या शतकातल्या महान रशियन कादंबऱ्या आणि देशी-विदेशी कृष्णधवल सिनेमा यांच्याविषयी चर्चा करत ते भटकतात. यातला एकजण ही गोष्ट सांगतोय. दुसऱ्याचे वडील रेल्वेत कारकून आहेत. आणि त्याचं त्याच कॉलनीत राहणाऱ्या उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीशी प्रेम जुळलंय. साहजिकच प्रखर विरोध, कानउघाडणी, दमबाजी आणि मारहाणसुद्धा.. या साऱ्या तणावांतून जात हा मित्र एका रात्री त्या मुलीला पळवून नेतो. कथा इथे संपते खरी; पण पुढे आणखी काय घडेल, त्या दोघांचं काय होईल, अशा काळजीचं दडपण वाचकाच्या मनावर ठेवूनच!
या कथासूत्राला जोडून या अठ्ठावीस पानी दीर्घकथेत सिनेमाविषयक जे चिंतन येतं, ते केवळ अपूर्व आहे. नेमाडय़ांच्या ‘बिढार’मध्ये (आता ‘हूल’मध्ये) ‘त्या दिवसांत रेडिओ फारच प्रिय झाला..’ या वाक्याने सुरू होणारं हिंदी सिनेसंगीताविषयीचं चांगदेवचं एक अप्रतिम स्वगत आहे. त्याची आठवण यावी अशा धर्तीचं, तितकंच खोल आणि तितकंच अस्वस्थ करणारं हे चिंतन आहे. उदाहरणार्थ हा एक उतारा पाहा :
त्या सिनेमातल्या नायिका बेहद्द सुंदर होत्या.. त्यांच्या हास्यातून एक तांबूस रंगाचा प्रकाश उमलून पसरे.. सर्व काही स्वच्छ आणि उज्ज्वल करणारा. त्या जीव तोडून प्रेम करत.. मोडून जात नसत- अखेपर्यंत. त्या अनेकदा उदास होत आणि अशावेळी त्या सिनेमागृहाच्या डाग पडलेल्या मलीन पडद्यावर मरण उतरून येई.. त्या सर्व सिनेमांची थीम एकच असे- प्रेम. आणि ज्या काळात ते बनवले गेले होते, त्या काळात हा शब्द अश्लील आणि गलिच्छ झाला नव्हता. ते तर खूप नंतर घडलं. त्यावेळी हा शब्द मृत्यू, करुणा, सौंदर्य आणि सत्य अशा अनेक अर्थानी ओतप्रोत होता. अविचलित आणि अ-नश्वर. पृथ्वीवरच्या प्राचीन कातळांसारखा.
या दोघा मित्रांचं जग कथेतील प्रवासासोबत विस्तारलंय. व्ही. शांताराम, बिमल रॉय, गुरुदत्त यांच्यानंतर त्यांच्या जाणिवेत सत्यजित राय, आइझेन्स्टाइन, तारकोवस्की अवतरताहेत. ते ब्रेख्त आणि लोर्का, नाजिम हिकमत आणि अर्नेस्तो कार्देनाल वाचू लागलेयत. त्यांच्या आजूबाजूचं जग बदलतंय. गोर्बाचेव्ह यांनाही या कथेत महत्त्वाची भूमिका आहे. ते सोविएत संघाचं पतन घडवून आणतायत. या सर्व गोष्टींची गुंफण करत ही कथा एक अद्भुत रूप घेते. कुठल्याही कथाकाराला ‘ही आपण लिहायला हवी होती!’ असं वाटायला लावणारी ही कथा आहे. (आणि माझ्यासारख्या अनुवादकाला ‘आपण हिचा अनुवाद करायला हवा होता!’ असं वाटायला लावणारीही.)
‘सिनेमा सिनेमा’चा मराठी अनुवाद वाचल्यानंतर थोडय़ाच दिवसांत ‘पहल’च्या एका जुन्या अंकात मूळ हिंदी कथाही मिळाली होती. दरम्यान, आहुजांचं एका हिंदी नियतकालिकात आलेलं अतिशय हृद्य आत्मकथनही वाचायला मिळालं होतं. मग ‘अँधेरे में हँसी’ अगदी तातडीने हवंच झालं. आमच्या लोकवाङ्मय गृहाच्या पीपल्स बुक हाऊसद्वारे ते मागवलं. पण हिंदीतले प्रकाशक बऱ्याच वेळा खूप ताटकळत ठेवतात. माझी अस्वस्थता बलवंतने बहुधा आहुजांना कळवली आणि त्यांनी अतिशय आस्थेने मला हा संग्रह सप्रेम भेट म्हणून पाठवला. त्यानंतर काही पत्रांची व पुस्तकांची देवाणघेवाण, अधूनमधून फोनवर बोलणं यातून प्रत्यक्षात एकदाही न भेटता आहुजांशी एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला. मध्येच केव्हातरी काम्यूच्या ‘प्लेग’मधली डॉ. रिऊ ( Dr. Riux) ही व्यक्तिरेखा आम्हा दोघांचीही ‘जीवलग’ आहे हे लक्षात आलं; तेव्हा आणखी एका आंतरिक बंधाने आम्ही जोडले गेलो.
आहुजाचं घराणं पाकिस्तानातलं. त्यांचे आजोबा तिथे युनानी पद्धतीने उपचार करणारे हकीम होते. फाळणीच्या वेळी आहुजांनी आत्मकथनात लिहिलंय त्याप्रमाणे ‘रक्ताची नदी पार करून त्यांचा उद्ध्वस्त परिवार’ दिल्लीत आला. प्रथम सफदरजंग मकबरा.. मग किंग्ज कँपमधले तंबू.. नंतर दिल्लीतली निर्वासितांची वसाहत अशी फरफट झाली. मग केव्हातरी वडिलांना रेल्वेत नोकरी मिळाली आणि अन्य कुटुंबीयांना सोडून ते उत्तर प्रदेशात (हल्लीच्या उत्तरांचलात) वस्तीला आले. इथल्या वास्तव्यात फाळणीनंतर बारा वर्षांनी योगेंद्र आहुजांचा जन्म झाला. काठगोदाम, काशीपूर आणि बदायूँमधल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये आहुजांनी जे बालपण अनुभवलं तेही विलक्षण आहे.
ते १४-१५ वर्षांचे असताना काशीपूरच्या रेल्वे कॉलनीत त्यांना जे मित्र लाभले त्या सर्वाची महत्त्वाकांक्षा एकच होती- लेखक बनण्याची! हे सर्वजण मिळून हस्तलिखित साप्ताहिकं, मासिकं काढत. कोणी कविता लिही, कोणी कथा आणि एखादा क्रमश: कादंबरीही. ‘या साऱ्यातून कोणी लेखक बनला नसता तरच नवल!’ असं आहुजांनी म्हटलंय. या ग्रुपमधला कमाल अहमद हा त्यांचा हीरो : ‘किशोरवयात आयुष्यात आलेला पहिला गंभीर लेखक.’ अत्यंत हुन्नरी. त्याचं त्या कॉलनीतल्या निलोफर नावाच्या परदानशील अप्सरेवर प्रेम बसलं आणि ते उघड झाल्यावर एका रात्री त्याला खूप मारहाण करण्यात आली. निलोफरला तिच्या मामाच्या गावी पाठवण्यात आलं. या प्रत्यक्षातल्या प्रेमकहाणीचा शेवट ‘सिनेमा-सिनेमा’सारखा नव्हता. काही दिवसांनंतर कमाल घर सोडून पळून गेला. कुठे नाहीसा झाला काहीच कळलं नाही. आहुजा लिहितात, ‘अजूनही जेव्हा कधी ते नव्या शहरात जातात, तेव्हा बसच्या किंवा ट्रेनच्या खिडकीतून ते लोकांचे चेहरे निरखून पाहत असतात.’
आहुजांच्या नंतरच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती होती- निर्मल वर्मा. तरुण आहुजा कथा लिहू लागले होते आणि लिहिल्यावर अभिप्रायासाठी कुठच्या मासिकाला न पाठवता ते निर्मल वर्माकडे पाठवत. निर्मलजीही कथा वाचून स्पष्ट व परखड प्रतिक्रिया देत. हळूहळू त्यांच्यात गुरू-शिष्य स्वरूपाचा पत्रसंवाद सुरू झाला. (यातील निर्मल वर्माची काही पत्रं मध्यंतरी आहुजांनी ‘अकार’ नामक त्रमासिकात छापली होती.) आहुजा निर्मल वर्माना दिल्लीत जाऊन भेटतही. कुतूहलजनक गोष्ट म्हणजे डाव्या विचारसरणीचे विरोधक समजल्या जाणाऱ्या निर्मलजींनीच आहुजांना गजानन माधव मुक्तिबोध या प्रखर मार्क्‍सवादी साहित्यिक-चिंतकाचं लेखन वाचायला भाग पाडलं. आणि आता जगभरातलं उत्कृष्ट साहित्य वाचणाऱ्या आहुजांच्या हृदयात मुक्तिबोधांचं जीवन आणि लेखन यांना परमोच्च स्थान आहे. त्यांच्या कथासंग्रहाच्या शीर्षकातसुद्धा मुक्तिबोधांच्या कवितेचे पडसाद आहेत. निर्मल वर्माशी असलेल्या त्यांच्या संबंधांत मात्र मोठाच अंतराय निर्माण झाला. गुजरात दंगलीनंतर निर्मल वर्मानी ‘असं काय मोठं झालंय गुजरातमध्ये?’ म्हणत भाजपची ज्या तऱ्हेने बाजू घेतली, त्याने आहुजा खूप दुखावले गेले. त्यांनी लिहिलंय, ‘निर्मल वर्माचं त्यांच्या अतिभव्य, सौंदर्यस्नात आणि अपूर्व संवेदनशील भाषेसोबत आपल्या संस्कृतीतील आणि आपल्या काळातील सर्वात कुरूप गोष्टीच्या निकट जाणं मी खोल वेदनेनिशी पाहत राहिलो.’ एक खूप भावोत्कट संबंध संपला. नंतर निर्मल वर्माही गेले. अजूनही आहुजांना त्याविषयी उदास व्हायला होतं. पण जे झालं त्याची अपरिहार्यताही जाणवते.
मुक्तिबोधांच्या ‘अँधेरे में’ या विख्यात कवितेत शहरातल्या एका मिरवणुकीचं वर्णन आहे. या मिरवणुकीत ‘ज्यांचे चेहरे वर्तमानपत्रांत छापून येतात’ अशी शहरातली प्रतिष्ठित आणि विद्वान मंडळी आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून तिथला कुप्रसिद्ध खुनी डोमाजी उस्तादही आहे. हे आणखी भयावह पद्धतीने प्रत्यक्षात आलंय. देशातल्या सर्व मोठय़ा जागा आता डोमाजी उस्तादांनी व्यापल्यायत. योगेंद्र आहुजांच्या अलीकडच्या कथांमध्ये हे वास्तव प्रकर्षांने येतं. झपाटय़ाने चकचकीत मॉलमध्ये रूपांतरित होणारी उपनगरं आणि त्यातली वाढती गुन्हेगारी, हिंसा, भय आणि दहशत यांचं अस्वस्थ करणारं दर्शन या कथांमधून होतं. बहुतेक कथांमधल्या घटना या भय वाटायला लावणाऱ्या अंधारात किंवा धुक्यात किंवा पिवळसर अंधुक प्रकाशात घडतात. ‘स्त्रीविमर्श’ शीर्षकाच्या एका कथेत उपनगरं आणि चकाकतं शहर यांच्या सीमारेषेवरचा भाग आहे. एका बाजूला जुन्या नगरातले चाकू-सुरेवाले गुन्हेगार आहेत, तर नव्या शहरातला पोलीस इन्स्पेक्टर वरिष्ठांकडे जाऊन गयावया करतोय, की माझी जुन्या विभागात बदली करा. या नव्या शहरातले, उंच टॉवर्समधले संतांच्या चेहऱ्याचे गुन्हेगार मला कळत नाहीत, त्यांची जास्त भीती वाटते..
अशा अंधाऱ्या वातावरणात योगेंद्र आहुजा हास्य शोधू पाहताहेत. मिळेल का ते त्यांना?

Monday, March 5, 2012

आयुष्याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या स्टेशनवरच्या मुलांच्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या कहाण्या सांगणारं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे अमिता नायडू यांचं पुस्तक.‘समकालीन प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं अंतरंग उलगडणारा लेख.विकासाची वाटचाल यशस्वीपणे करणाऱ्या आपल्या राज्याला-देशाला चपराक बसावी तसं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ आपल्या साऱ्यांच्याच डोळ्यात अंजन घालतं.स्टेशनवरची, प्लॅटफॉर्मवरची बेवारस किंवा घर सोडून आलेली मुलं, त्यांचं जगणं म्हणजे यातनाघर. त्यांना तुडविणारे पोलीस आणि मनातून हद्दपार करणारा
ही कलाकृती म्हणजे दहा व्यक्तिरेखांचा संग्रह नाही. प्लॅटफॉर्म- रेल्वेचे रूळ हेच जगण्याचं केंद्र बनलेल्या मुलांच्या बालपणाची ही आघात यात्रा आहे. व्यक्तिचित्र हा लेखिकेने स्वीकारलेला फॉर्म. प्रत्येकाचं इथे येण्याचं प्रयोजन निराळं. त्यांच्या शोककथा वाचकाला कासावीस करतात. मात्र परस्परांचे नातेसंबंध, त्यातील मैत्र आणि शत्रुत्वदेखील वाचकाला हर एक क्षणी थक्क करून सोडतं.




अन्थनी, बिल्लू, केक्या, मुन्ना, झहीर, राणा, किशोर आणि जग्गू, म्हाद्या, शिद्या यांच्या कहाण्या, कुणावर विस्थापनाचं संकट तर कुणी घरातल्या अत्याचाराला कंटाळलेलं. देशातल्या प्रगत-अतिप्रगत भागांतून किंवा दुष्काळी-मागास प्रदेशांतून आलेली मुलं शरीराचा-मनाचा-संवेदनांचा सांधा निखळवणाऱ्या वातावरणात तग धरून राहतात. लेखिकेने हे नकारात्मक चित्रण केलेलं नाही. भडकपणाचा- बटबटीतपणाचा रंग देऊन कुठेही ते कृत्रिमही झालेलं नाही. घटना फारशा घडत नाहीत. मात्र प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ या विशीच्या आतील, कधी कधी तर दहा-बाराच्या वयातील मुलांना कसं प्राप्त होतं यामुळे स्तिमित व्हायला होतं.


या मुलांपैकी बरीच छोटा-मोठा माल ट्रेनमध्ये विकणारी. सरकारने दिलेल्या स्टेशनजवळच्या शाळेतल्या खोलीत राहणारी. मिशनने रात्रीच्या जेवणाची सोय केल्याने खूश होणारी ही पोरं. पोलीस डिपार्टमेंट आणि वस्तीतल्या मोठय़ा पोरांना हप्ता देणारी, सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबणारी, कुणी भंगार गोळा करतं, तर कुणी मासिकं-पुस्तकं-प्लॅस्टिकच्या वस्तूंची विक्री. दिवसाला मिळणारे तुटपुंजे पैसे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी बसणारा मार. मात्र त्यातही ‘कुटुंब’ संकल्पनेला व्यापक बनविणारी ही मुलं वाचकाला अनेक गोष्टी शिकवून जातात.


या सर्व मुलांची घरं दारिद्रय़रेषेखालील, व्यसनी वडील, आई घर सांभाळणारी, आत्याची सुस्थिती पण भावाला आर्थिक मदत न करणारी, त्यात भावाचं आजारपण. त्याच्या इलाजासाठी अँथनी आत्याचे पैसे चोरतो, दवाखान्यात भरतो. आपण केला तो गुन्हा, हे लक्षात आल्याक्षणी घर सोडून पळून जातो. प्लॅटफॉर्मवर राहताना पैशाची बचत करत आत्याचे पैसे परत करून घरी जायचं हे ‘स्वप्न’ बाळगतो. जन्मापासून पांगळ्या असणाऱ्या केक्याला आजी भिकारी बनवते. त्याच्या ‘जिवावर’ खोली घेते. रोज भरपूर कमावणारा केक्या ‘भिकारी हटाव’ मोहिमेमुळे गोत्यात आल्यावर त्याला मारणारा बाप. त्याच्या माराला कंटाळून दुसऱ्या स्टेशनवर लोळत-लोंबत केक्या भीक मागतो. सोनारकाम घरी करताना एक फुंकरीने भडका उडून घर पेटणं, त्यात आई-वडील डोळ्यांसमोर जळणं, मुन्नाची जळालेली कातडी आणि पायाची चिकटलेली बोटं, घराबाहेर असल्याने वाचलेली बहीण, या बहीण-भावंडांना घराबाहेर हाकलणारा चुलता, बहिणीला एका संस्थेत ठेवून पैसे कमावण्यासाठी पळालेला मुन्ना. साथीच्या आजारात झहीरची अम्मी आणि दोन बहिणींचा झालेला मृत्यू, तो धक्का सहन न झाल्याने दारू पिऊन पिऊन स्वत:ला संपविणारे अब्बा. झहीर धाकटा. मोठय़ा बहिणीने नऊ वर्षांच्या झहीरला घरी आणलं खरं. परंतु जीजाच्या मारहाणीला कंटाळून पळालेला झहीर याच प्लॅटफॉर्मवर आलेला. सगळ्यांच्याच कहाणीत घरात बसणारा मार. अठराविश्वे दारिद्रय़, मुलांना सांभाळण्याची कुवत नसणारं कुटुंब, हा समान धागा. परंतु या साऱ्यांचा आक्रोश हे या पुस्तकाचं सूत्र नाही. त्या मुलांमध्ये असणारी व्यावहारिक दृष्टी, त्याचं एकूण वर्तन, त्याचं सरकारी अधिकारी व पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून होणारं अतोनात शोषण. या शोषणाचे असंख्य प्रकार. रेल्वे रुळावर कुणाचं बेवारस प्रेत पडलं तर याच कोवळ्या मुलांकडून उचलणं. कुठलीही चोरी-गुन्हा घडला की याच मुलांना तुडवणं, त्यांच्या कमाईत वाटा मागणं, त्यांच्या मित्रांना दुसऱ्या गटातल्या मुलांनी मारणं, हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करण्याची वेळ आल्यानंतर स्वत:च्या पैशांनी मुलांनी मागवलेल्या पदार्थावर इन्स्पेक्टर मॅडमने ताव मारणं, अधिकाऱ्यांच्या घराचं शिफ्टिंग म्हटल्यावर याच मुलांकडून सामान उचलून घेणं, बंगलेवाल्यांनी त्यांच्या घरासमोरचं गवत साफ करवून घेणं. अनेक दिवसांचे कपडे धुऊन घेणं, कुठल्याशा भाई लोकांच्या मोठय़ा मुलांच्या अत्याचाराला सातत्याने बळी पडणं, लैंगिक शोषण, हा या मुलांच्या आयुष्यातला नित्याचा भाग, हवालदार, इन्स्पेक्टर, एकूणच सरकारी यंत्रणा प्लॅटफॉर्मवरील मुलांशी ज्या अमानुषतेने वागते, त्यातून विघातक शक्तींशी या मुलांचा समेट का नि कसा घडतो हे सहजच लक्षात येतं.


सगळ्यांचंच जगणं असं उसवलेलं असलं तरी त्यात आपला विरंगुळा- आनंद शोधणारी मुलं, त्यांच्यातली शेरो-शायरी, हिंदी चित्रपटांचा प्रचंड प्रभाव, त्यातून त्यांच्या तयार झालेल्या लकबी, माणसांची होणारी पारख, खऱ्या-खोटय़ाची जाण, त्यांचं ‘लाइफ’ आपापल्या व्याख्या घेऊन आलेलं त्यांचं केवळं शरीर आणि निरागस मन अनेकांनी कुस्करून टाकल्याने थोडीफार शिल्लक राहिलेली संवेदना घेऊन जगणारी प्लॅटफॉर्मवरची मुलं.


वाचकाला या पुस्तकातील भाषा भुरळ घालते. त्या मुलांची अभिव्यक्ती.. त्यात शिव्या आहेत. हिंदी येते, पण ‘मुंबय्या.’ क्वचित त्यांची म्हणून बोली त्यात डोकावते. निवेदन आणि संवाद प्लॅटफॉर्मच्या निराळ्या हिंदीने लपेटून घेतले आहेत. भाषेचा हा लहेजा हे या पुस्तकाचं नक्कीच निराळं वैशिष्टय़ ठरेल.


शोषणकर्त्यांबरोबरच समजून घेणाऱ्या दिनेश सरांची व्यक्तिरेखा मुलांबरोबर वाचकाला दिलासा देते. शेकडो करपलेल्या मुलांची भावनिक- शारीरिक- मानसिक गरज जाणून घेणारे सर किंवा त्या मुलांच्या नातलगांपर्यंत त्यांना पोहोचवू पाहणारे अंकल. त्यांच्यासाठी या मुलांचं बाह्य़ वर्तन तिरस्करणीय नसतं, त्यांचं दिसणं, वावरणं, तोंडातल्या अर्वाच्य शिव्या, व्हिडीओ पाहणं, ‘सोल्युशन’ पिणं, तीन पत्तीचा डाव मांडणं, बिडी-सिगारेट फुंकणं, राडा करणं, चोरी करताना पकडलं जाणं या गोष्टींमुळे या मुलांबद्दलची प्रतिमा संवेदनकर्त्यांकडून खराब होण्याचा प्रश्न नसतो. दिनेश सरांना आणि अंकलना मुलांचं जगण्याचं तत्त्वज्ञान ठाऊक असतं. वाचकही या तत्त्वज्ञानाशी समरस होत जातो.


समकालीन प्रकाशनाने शोध पत्रकारितेला प्राधान्य देत गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांकडून उत्तमोत्तम साहित्य लिहवून घेतलं. हे पुस्तक याच पठडीतलं आहे. लेखिकेचा समकालीन प्रकाशन आणि युनिक फीचर्सशी जवळचा संबंध आहे. स्टेशनवर आयुष्य काढणाऱ्या मुलांबरोबरचं तिचं काम तिला पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावंसं वाटलं याची लेखिकेने काही कारणं सांगितली आहेत. भारताचं आशास्थान आणि ‘तरुण भारत’ म्हणून गौरवलं जात असलेल्या या लोकसंख्येला आपण कसं वागवत आहोत; त्यांच्याकडे, त्यांच्या गरजांकडे, हक्कांकडे कसं बघितलं जात आहे, हे सांगताना भारतातील सुमारे पन्नास कोटी मुलं जगण्याच्या संदर्भात आपलं बालपण हरवून जाताना दिसतात, असं आकडेवारीवरून ती स्पष्ट करते. आजची आपली व्यवस्था या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा, विकासाचा हक्क मिळवून देण्यात अंमलबजावणीच्या पातळीवर अपयशी ठरते. हेही लेखिका स्पष्टपणे मांडते. पण यात सर्वसामान्य सुजाण नागरिकाची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. एखाद्या बिसलेरी बाटलीसारखा या मुलांचा वापर करणारा समाजच त्यांच्या शोषणाला कारणीभूत आहे. बॉम्बस्फोट, एखादा दहशतवादी हल्ला, दंगल यांसाठी या मुलांचा जर वापर झाला तर कारणीभूत कोण, हा नक्कीच विचार करण्यासारखा भाग.


स्टेशनवर सर्वच प्लॅटफॉर्मना क्रमांक असतात. झिरो किंवा शून्य या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म अस्तित्वात नाहीच. या मुलांचा प्रवासच शून्यापासून शून्याकडे जाणारा, त्यांचा जगण्याचा प्लॅटफॉर्मच समाजाने काढून घेतलेला, या अर्थाने ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे सूचक शीर्षक. या पुस्तकातील छायाचित्रं, मुखपृष्ठ, एकूण मांडणीचं श्रेय श्याम देशपांडे यांचं. त्यामुळेच दाहक वास्तवाची जळजळीत धग वाचकाला अनुभवता येते. पुस्तकाच्या संहितेचं डॉ. सुहास कुलकर्णी आणि अमृता वाळिंबे यांनी केलेलं उत्तम संपादन या पुस्तकाला अधिक वाचनीय बनवतं. चक्रव्यूहात अडकलेल्या या मुलांची सुटका पुस्तक वाचल्यानंतर तात्काळ होणं शक्य नाही. मात्र, सुटकेचा विचार मनात आला तरी अशा पुस्तकांची उपयुक्तता जाणवेल हे नक्की.


-वृन्दा भार्गवे


प्लॅटफॉर्म नंबर झिरो 
-अमिता नायडू 
समकालीन प्रकाशन,पुणे
पृष्ठे : १५८ / मूल्य : १५० रुपये.

हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी इथे भेट द्या!

Saturday, February 25, 2012


फ्रान्समध्ये शिकलेले इराणी लेखक सादिक हिदायत यांच्यावर काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात- आणि विशेषत:
‘द ब्लाइंड आऊल’ या कादंबरीत ठळकपणे आढळते. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी कादंबरीचा मानदंड समजली जाते. आधुनिकतावादी इराणी कादंबरीची खरी सुरुवातही
‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली.
काही पुस्तकं वाचताना गुंतवून ठेवतात. स्थळ-काळाचं भान नाहीसं करतात. आपण त्यांच्या संपर्कात असेपर्यंत इतर कसलाही विचार करू शकत नाही. इतर कुठल्याही गोष्टीत गुंतू शकत नाही. मात्र, वाचन संपलं की त्यांचा अंमल ओसरायला सुरुवात होते. त्यांनी दिलेल्या आनंदाची फिकट चव शिल्लक उरते. तीही काही दिवसांनी विरून जाते. ती पुस्तकं इतर पुस्तकांच्या मांडीला मांडी लावून आपल्या संग्रहात बसून राहतात. पण त्यांना पुन्हा उचलायची इच्छा होत नाही. कालांतरानं ती आपल्या संग्रहातून हद्दपार होतात.
काही पुस्तकांचा प्रकार वेगळा असतो. ती वाचताना गुंतवून ठेवतातच असं नाही. उलट, त्यांचं वाचन ही त्रासदायक प्रक्रिया असते. त्यातून जाताना आपण सतत बेचन असतो. आपण वाचन अध्र्यावर थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते शक्य नाही, हे लक्षात येतं. आपण पुस्तकाच्या पुरते कब्जात गेलेले असतो. आता ते नेईल तिथे जाण्यावाचून पर्याय नसतो. ही पुस्तकं वाचून झाल्यावर खऱ्या अर्थानं सुरू होतात. ती आपल्या जगण्यात रुजतात. वाढतात. बहरतात. त्यांची सावली कायम आपली सोबत करते. अशा पुस्तकांनाच ‘अभिजात’ हे विशेषण लावता येतं.
सादिक हिदायत (Sadegh Hedayat) या इराणी लेखकाची ‘द ब्लाइंड आऊल’ (The blind Owl) ही या प्रकारात मोडणारी कादंबरी. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी (Persian) कादंबरीचा मानदंड समजली जाते. इराणी कादंबरीची खरी सुरुवातही ‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली. तोपर्यंत इराणमध्ये केवळ मनोरंजक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. आपल्याकडच्या नाथमाधव किंवा दातारशास्त्रींप्रमाणे! ‘द ब्लाइंड आऊल’नं इराणी वाचकाला खडबडून जागं केलं. त्याला पहिल्यांदा कादंबरी या वाङ्मयप्रकाराच्या ताकदीची कल्पना आली. इराणमधील रझा राजवटीत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीवर तिथे अगदी काल-परवापर्यंत बंदी होती. आता मात्र ही कादंबरी नवइराणी साहित्याचा मानदंड समजली जाते.
या कादंबरीची संहिता दोन भागांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या भागाचा निवेदक एक चित्रकार आहे. तो पेनच्या आवरणांवर चित्रं काढत असतो. हे चित्र कायम एकच असतं. एक दाढीवाला भारतीय पोशाखातला म्हातारा झाडाखाली उभा. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या तरुणीला तो तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याची खूण करतो आहे. चित्रकाराला हे चित्र वारंवार स्वप्नात दिसतं. झपाटून टाकतं. मात्र, त्याचा अर्थ कळत नाही. एक दिवस चित्रातली तरुणी थेट त्याच्या दारातच अवतरते. तो तिला घरात घेतो. घरात तिचा गूढ मृत्यू होतो. त्यानं तो बावचळून जातो. मात्र, त्याला तिचं चित्र काढण्याचा मोह आवरत नाही. त्यानं चित्र काढायला सुरुवात केल्यावर ती जिवंत झाल्यासारखी डोळे उघडते आणि पुन्हा प्राण सोडते. तो तिच्या प्रेताचे तुकडे करून ट्रंकेत भरतो आणि दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेतो. तिथला म्हातारा रखवालदार दफनासाठी खड्डा खणतो. त्यात एक प्राचीन सुरई सापडते. तिच्यावरचं चित्र नायक पेनच्या आवरणावर काढत असलेल्या चित्रासारखंच असतं. म्हातारा ती सुरई नायकाला भेट देऊन टाकतो. नायक घरी येतो. त्या रहस्यमय तरुणीची आठवण त्याला बेचैन करत राहते. ती विसरण्यासाठी तो भरपूर अफू घेतो आणि बेशुद्ध पडतो. कादंबरीचा पहिला भाग इथे संपतो. दुसऱ्या भागात नायक शुद्धीवर येतो, तो एका वेगळ्याच विश्वात.
इथे तो चित्रकार नसून लेखक आहे. त्याचं लग्न झालेलं आहे आणि बायको आपल्याशी प्रतारणा करत असल्याच्या संशयावरून हय़ानं तिचा खून केलेला आहे. तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याचे हात रक्तानं माखलेले असतात आणि आतल्या खोलीत बायकोचं प्रेत पडलेलं असतं. त्याच्या घराबाहेर बसलेला भिकारी अगदी पहिल्या भागातल्या म्हाताऱ्याची आठवण करून देणारा. कादंबरीत यापुढे अनेक उपाख्यानं एकमेकांत गुंतून येतात. शेवटी नायक आरशात बघतो तेव्हा आपला चेहरा अगदी त्या म्हाताऱ्यासारखाच झाला आहे असं त्याला वाटतं.
अत्यंत गुंतागुंतीची संरचना असलेल्या या कादंबरीचा हा केवळ ढोबळ आराखडा. तिचं खरं रूप वर्णन करणं जवळजवळ अशक्य आहे. स्वप्न आणि भास यांच्या संधिप्रकाशातलं निवेदन, निवेदकाची अविश्वसनीयता, दोन्ही भागांचीप्रतिबिंबासारखी  रचना आणि संपूर्ण कादंबरीत पसरलेलं पलूदार प्रतिमांचं जाळं.. या सगळ्यांमुळे ही कादंबरी वाचकाला सतत सतर्क राहायला भाग पाडते. काही प्रतिमा आणि पात्रं दोन्ही भागांत वेगवेगळ्या रूपांत येतात. म्हातारा पहिल्या भागात स्मशानाचा रखवालदार असतो. त्याच भागात आधी आलेलं लेखकाच्या काकांचं वर्णनही याच म्हाताऱ्याशी जुळणारं, तर दुसऱ्या भागात हाच म्हातारा निवेदकाच्या घरासमोर भीक मागताना दिसतो. पहिल्या भागात नायक पेनवर काढत असलेलं चित्र त्याला स्वप्नात दिसतं. त्यातला म्हाताराही याच प्रकारचा. पहिल्या भागातली गूढ तरुणी आणि दुसऱ्या भागातली लेखकाची बायको यासुद्धा अशा एकमेकींच्या प्रतिबिंबा सारख्या. पहिल्या भागात म्हाताऱ्यानं नायकाला दिलेली सुरई आणि दुसऱ्या भागातल्या म्हाताऱ्या भिकाऱ्यानं दिलेला वाडगा हेही अशा  प्रतिबिंबित  प्रतिमेचं उदाहरण.
कथासूत्रातली संदिग्धता हे लेखकाचं कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोहचविण्याचं साधन असावं, असं ‘द ब्लाइंड आऊल’ वाचताना वाटत राहतं. पहिल्या भागात शुद्ध हरपलेला नायक दुसऱ्या भागात शुद्धीवर येतो. पण दुसऱ्या भागाचं स्वरूपही स्वप्नवत असल्यामुळे वास्तव काय आणि स्वप्न कोणतं, हे वाचकाला नीट कळत नाही. कदाचित दोन्ही स्वप्नं असून, वास्तव तिसरंच असू शकेल, किंवा दोन्ही एकाच वेळी घडणारी समांतर वास्तवं असतील. ते ठरवण्याचं स्वातंत्र्य वाचकाचं. लेखक ते हिरावून घेत नाही.
स्वतच्या उत्कट भावनांचा आविष्कार कोणत्याही वाङ्मयीन संकल्पनेपेक्षा महत्त्वाचा मानणं, हे जर अभिव्यक्तीवादाचं मुख्य सूत्र असेल, तर ही कादंबरी नक्कीच अभिव्यक्तीवादी आहे. हिदायत ज्या काळात लिहीत होता, तो युरोपमध्ये अभिव्यक्तीवादी लेखनाला प्रोत्साहक असा काळ होता. काफ्काच्या साहित्यानं तरुण लेखकांना प्रभावित करायला सुरुवात केली होती. फ्रान्समध्ये शिकलेल्या हिदायतवरसुद्धा काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात, आणि विशेषत: या कादंबरीत ठळकपणे आढळते. हिदायतनं काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’चा फारसी अनुवादही केलेला आहे. तो स्वतला काफ्का आणि पो यांचा वंशज मानायचा. या दोघांची गुणसूत्रं त्याच्या साहित्यात सापडतात हे खरं. त्यामुळे हिदायत हा केवळ युरोपियन प्रभाव आत्मसात करून लिहीत होता, असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. हिदायतचा इस्लामपूर्व इराणी संस्कृतीचा खोल अभ्यास होता. अकराव्या शतकातला फारसी कवी मानुचेहरी याच्या कवितेचे संस्कारही हिदायतच्या साहित्यावर झालेले होते. ‘द ब्लाइंड आऊल’मधलं नायकानं काढलेलं चित्र मानुचेहरीच्या ‘मुसम्मत’ या दीर्घकवितेतल्या एका प्रसंगाचं आहे. व्यवस्थेविरोधातली बंडखोरी आणि नव्या वाङ्मयीन परंपरेचं प्रवर्तन हे या दोघांना जोडणारे आणखी काही दुवे. मानुचेहरीनं फारसी दरबारी कवितेचं स्वरूप संपूर्ण बदललं. ‘राजाचा स्तुतिपाठक’ ही कवीची ओळख पुसून त्यानं तत्कालीन सामाजिक वास्तव पहिल्यांदा कवितेत आणलं. हिदायतनं इराणी कादंबरीत नवीन प्रवाह सुरू केला. तो पुढे वाढला आणि समृद्ध झाला. त्यातूनच पुढे इराणी नवकादंबरीची ठिणगी पडली.
‘द ब्लाइंड आऊल’विषयी आपल्याला जिव्हाळा वाटेल अशी आणखी एक गोष्ट आहे. १९३७ ते १९३९ या काळात हिदायत मुंबईत मुक्कामाला होता. याच काळात त्यानं ‘द ब्लाइंड आऊल’ लिहून पूर्ण केली आणि तिची मर्यादित प्रतींची आवृत्ती मुंबईतच प्रकाशित केली. या प्रतींवर ‘नॉट फॉर सेल इन इराण’ असा शिक्का मारलेला आहे. ती इराणमध्ये प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला.
हिदायतच्या मुंबईतल्या वास्तव्यात त्याला हिंदू,तसंच बौद्ध संस्कृतीविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याचे पडसाद ‘द ब्लाइंड आऊल’मध्येही उमटलेले दिसतात. कादंबरीच्या पहिल्या भागात नायकाची आई हिंदू नर्तकी असल्याचा संदर्भ येतो. दुसऱ्या भागात लेखकाच्या खोलीत बुद्धाची मूर्ती असल्याचा उल्लेख येतो. कादंबरीच्या द्विदल रचनेत द्वैतवादाच्या खुणा आढळतात.
हिदायतचं आयुष्य मानसिक अस्थैर्यानं ग्रासलेलं होतं. उत्तरायुष्यात तो अफूच्या आहारी गेला. निराशावाद तर त्याच्या स्वभावातच होता. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यानं पॅरिसमध्ये स्वतला गॅसनं बंद केलेल्या खोलीत कोंडून आत्महत्या केली. या घटनेमुळे ‘द ब्लाइंड आऊल’ अशुभ आहे, अशी समजूत अनेक वर्षांपर्यंत इराणमध्ये प्रचलित होती. वाचकाला झपाटण्याची या कादंबरीची ताकद पाहता ती खरी असावी, असं मानायला जागा आहे.


कादंबरी:‘द ब्लाइंड आऊल’(The blind Owl)
लेखक : सादिक हिदायत(Sadegh Hedayat) 

हे पुस्तक सध्या मराठीत उपलब्ध नाही.अद्याप  त्याचा मराठीत अनुवाद कोणी केलेला  नाही
Buy The Blind Owl (Imported Edition:English) from Here

[This review of the novel 'The Blind Owl' :Author Sadegh Hedayat,is written by Mr.Nikhilesh Chitre for Loksatta daily]

Wednesday, February 15, 2012


मानवी मनोव्यापाराचे लहानसहान असंख्य पदर उलगडून दाखविणारा शेक्सपीअर (William Shakespeare)हा देश, धर्म, प्रांत आणि संस्कृतीच्या पल्याड पोचला तो त्याच्या अजरामर नाटय़ आणि साहित्यकृतींनी! मानवी भावभावना आणि त्यातील नातेसंबंधांचे गुंते हे कुठल्याही संस्कृतीत सारखेच असतात, यावर जणू शेक्सपीअरच्या असंख्य व्यक्तिरेखांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कालातीत ठरलेल्या या नाटय़कृतींचा गोष्टीवेल्हाळ कथास्वरूपात आस्वाद घेण्याची संधी मराठी वाचकांना ‘कथारूप शेक्सपीअर’ या ग्रंथरूपात मिळाली आहे. प्रभाकर देशपांडे साखरेकर लिखित ‘कथारूप शेक्सपीअर (खंड १)’ हा ग्रंथ औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ने प्रकाशित केला आहे. या कथाखंडात शेक्सपीअरच्या ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’, ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लियर’, ‘मॅकबेथ’, ‘ज्युलियस सीझर’, ‘अँटनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ या सात शोकान्तिकांचा समावेश आहे. 
रसाळ, ओघवत्या शब्दांमध्ये कथन केलेल्या शेक्सपीअरच्या नाटय़कृतींतील गोष्टी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. प्रत्येक कथेतील पात्रांची स्वभाववैशिष्टय़े, स्थल-काळाचे वर्णन, राजे, राण्या, राजपुत्र, प्रधान, सैनिक, दास-दासी असा कथानकाचा अपरिहार्य भाग असलेल्या सर्व व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतील, असे त्यांचे रूप या कथांमधून मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. 
शेक्सपीअरच्या या अनुवादित शोकान्तिकांमध्ये मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि बोलीभाषेचा चपखल वापर केलेला पुस्तकात जागोजागी आढळतो. त्यामुळेच त्या वाचताना अनुवाद आणि कथाकथन यांची सुंदर सरमिसळ झाल्याचे अनुभवास येते. प्रत्येक कथेत चितारलेले प्रसंग, त्यातील पात्रांचे संवाद, त्यातून उभे राहणारे नाटय़ या पुस्तकात पानोपानी भेटते. 
शेक्सपीअरच्या नाटकांचा हा कथारूप अनुवाद करताना वाचकाला मूळ नाटक वाचल्याचा आनंद मिळावा, यादृष्टीने काही पदरची वाक्ये आपण अभावितपणे लिहिल्याची कबुलीही देशपांडे यांनी पुस्तकाचे मनोगत व्यक्त करताना दिली आहे. हे पुस्तक लिहिताना शेक्सपीअरच्या साहित्यावर वा त्यांच्या नाटकांवर भाष्य करण्याचा, त्यांची चिकित्सा करण्याचा मोह आवरून मूळ नाटकातील आशय वाचकांपर्यंत जसाचा तसा नेमक्या पद्धतीने कसा पोचेल, याबाबतही अनुवादक आग्रही राहिला आहे, हे विशेष.
शेक्सपीअरने आपल्या नाटकांतून उभ्या केलेल्या अजरामर काल्पनिक पात्रांमधील संघर्ष, त्यांची महत्त्वाकांक्षा, नेतृत्वगुण, चारित्र्य, भावभावना यासंबंधीचे गुंतागुंतीचे विश्लेषण साध्या-सोप्या मराठीतून करणे खरेच कठीण होते. मात्र, हे शिवधनुष्य पेलण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रभाकर देशपांडे यांनी यानिमित्ताने केला आहे. काही ठिकाणी मात्र त्यात एकजिनसीपणा आढळत नाही. ‘नाटय़ की कथा’ नेमक्या कुठल्या प्रकारात मांडायचीय, या घोळात अनुवादक चाचपडतोय आणि त्यामुळे कथा सांगताना ती कुठल्या ‘काळा’त लिहायची, हा संभ्रम काही ठिकाणी असल्याचं जाणवतं. मात्र, या त्रुटी अगदीच क्षुल्लक व नगण्य आहेत. या पुस्तकाद्वारे एक अत्यंत महत्त्वाचं काम लेखकाने शेक्सपीअरच्या सकस नाटकांच्या कथारूपी अनुवादाने केले आहे. 

शेक्सपीअरने रंगविलेल्या अनेकानेक व्यक्तिरेखा, त्यांची वर्तणूक, त्यातून दिसणारे त्यांचे स्वभावदर्शन या साऱ्याचा परिचय मराठी वाचकांना यानिमित्ताने कथारूपात पुन्हा एकदा होत आहे. 

-सुचिता देशपांडे,लोकसत्ता ,रसग्रहण

कथारूप शेक्सपिअर -(खंड १- सात शोकांतिका),
-प्रभाकर देशपांडे साखरेकर
 जनशक्ती वाचक चळवळ,
 पृष्ठे- २५६, किंमत- २०० रु.

शरदिन्दू बंडोपाध्याय हे बंगाली रहस्यकथांच्या विश्वातलं गाजलेलं नाव. व्योमकेश बक्षी हा त्यांचा डिटेक्टिव्ह. बंगालीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या शरदिन्दू बंडोपाध्याय यांच्या या व्योमकेश बक्षीच्या गाजलेल्या रहस्यकथा रोहन प्रकाशननं मराठी वाचकांसाठी तीन भागांत आणलेल्या आहेत. मराठीत त्यांचा अनुवाद हा सुप्रसिद्ध अनुवादक अशोक जैन यांनी केलेला आहे. सत्यजित राय यांच्या ‘फेलुदां’च्या बारा पुस्तकांचा अनुवाद यापूर्वी जैन यांनीच केलेला आहे आणि ‘रोहन’तर्फेच हा पुस्तकांचा संच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच दर्जेदार परंपरेतला हा व्योमकेश बक्षीचाही संच म्हणता येईल.
‘व्योमकेश बक्षी’ आपल्याला तसा नवीन नाही. १९९३ साली बासू चटर्जी यांनी दूरदर्शनवर रजित कपूरला घेऊन व्योमकेश बक्षी हिंदी मालिकेत आणलेला होता आणि ती दूरदर्शन मालिका खूप गाजली होती. जाणकारांनीही या मालिकेला आणि रजित कपूरच्या अभिनयाला चांगली दाद दिली होती. मालिका पाहण्यापेक्षा या रहस्यकथा वाचतानाचा अनुभव वेगळा आहे. कथेतील रहस्य आणि ते सोडविताना व्योमकेश आपल्या तल्लख बुद्धिमत्तेची जी चमक दाखवितो, त्यामुळे ती रहस्यकथा वाचताना वेगळीच मजा येते. त्याची शोध घेण्याची पद्धत तर्कसुसंगत असते आणि एकेक करीत कथेतला तपशील आपल्यासमोर येत राहतो. कथेतली रहस्यं टप्प्या-टप्प्याने उलगडत जात असल्याने वाचक कथा वाचताना गुंगून जातो.
या कथा लिहीत असताना शरदिन्दूंच्या डोळ्यांसमोर शेरलॉक होम्स आहे, हे उघड आहे. तिथे शेरलॉक होम्सच्या मदतीला वाटसन आहे तर इथे अजित आहे आणि अजितच्या तोंडूनच सारा कथाभाग आपल्याला समजतो. शेरलॉक होम्सचा खूपच प्रभाव शरदिन्दूंवर आहे, पण तरीही या अस्सल बंगाली रहस्यकथा आहेत. फक्त कथा कोलकाताच्या आसपास घडतात म्हणून नाही तर कथेतील वातावरण अस्सल बंगाली आहे.
१९३२ साली ‘पाथेर काटा’ (या पुस्तकात ‘काटे’री रहस्य) ही कथा लिहून शरदिन्दूंनी रहस्यकथेची वाटचाल सुरू केली. छातीत घुसणारी ग्रामोफोनची सुई आणि तिच्याद्वारे होणारा खून, हा वेगळा प्रकार आहे. शरदिन्दूंच्या साऱ्याच रहस्यकथांमध्ये बरेचसे खून कसे घडवून आणलेले आहेत, हे पाहणं मोठं मनोरंजक ठरेल. व्योमकेश बक्षी याला आपल्याला ‘डिटेक्टिव्ह’ म्हणवून घेणं पसंत नाही. तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ म्हणवून घेतो. काही जण १९३३ साली शरदिन्दूंनी लिहिलेली ‘सत्यान्वेषी’ हीच त्यांची पहिली रहस्यकथा मानतात. ही कथा घडते कोलकत्याच्या बकाल भागात असलेल्या एका बोर्डिग हाऊसमध्ये. तिथं कथेचा निवेदक अजित राहत असतो. काही दिवसांनी अतुल चंद्र मित्रा हा तरुण येतो आणि अजित याचा रूमपार्टनर म्हणून राहू लागतो. हा बेकार तरुणच पुढे खुनाचं रहस्य उलगडतो आणि नंतर आपलं खरं नाव ‘व्योमकेश बक्षी’ असल्याचं जाहीर करतो आणि अजितला तो पुढे आपल्या बोर्डिग हाऊसमध्ये घेऊन जातो. व्योमकेशला त्याची बायको सत्यवती मिळते तीही अशाच एका खुनाच्या तपासातून. त्या कथेचं नाव आहे - ‘अर्थमनार्थम्’ (मृत्युपत्रानेच घेतला बळी). सत्यवतीच्या भावावर खुनाचा आरोप जवळजवळ पक्का झालेला असतो. ती व्योमकेशला भावाला वाचविण्याची विनंती करते. त्या तपासा दरम्यान सत्यवती आणि तो अधिक जवळ येतात. सत्यवती त्याची बायको झाल्यावर त्या दोघांच्यात झडणारे संवाद वाचून त्या काळात बंगालमधल्या भद्रलोकांमधील नवरा-बायकोचे संबंध कसे मोकळेपणाचे होते, हे आपल्या लक्षात येते.
या तीन पुस्तकांत शरदिन्दूंच्या बारा कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यात त्यांच्या ‘शोजारूर काँटा’ (साळिंदराचा काटा), ‘मकोरशार’ (टॅरंटुलाचं विष), ‘अग्निबाण’ (जीवघेणी ज्वाळा- भाग १), ‘उपसंहार’ (जीवघेणे ज्वाळा- भाग २), ‘चित्रचोर’ (चित्रचोर), ‘चिडीयाखाना’ (प्राणिसंग्रहालय) या गाजलेल्या रहस्यकथांचा समावेश आहे. आपल्या विशिष्ट अशा चित्रमय भाषाशैलीत शरदिन्दू या साऱ्या कथा सांगतात. त्यातली पात्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात. त्यामुळेच ‘चिडीयाखाना’वर सत्यजित राय यांनाही चित्रपट बनविण्याचा मोह झाला.
या रहस्यकथांतील एखाद-दुसरी कथा सोडता बहुतेक कथा या कोलकात्याच्या परिसरात घडतात. व्योमकेश बक्षीला छोटय़ा चोऱ्या, किरकोळ खून असल्या गोष्टींत रस नसतो. त्यामुळे तो बऱ्याचदा घरी निवांत बसून असतो. हे निवांतपण त्या काळातल्या संथ जीवनाचाच एक भाग म्हणता येईल. आजच्यासारखे मोबाइल फोन तर सोडाच, पण लॅण्डलाइन फोन तरी घरोघर कुठे होते? त्यामुळे फोन करण्यासाठी एखाद्या श्रीमंत माणसाकडे जावं लागतं. इन्स्पेक्टरला निरोप द्यायचा असेल तर नोकराकरवी चिठ्ठी पाठवावी लागे. हे दोघे खून झाल्यावर घटनास्थळी जातात ते बसनं किंवा ट्रेननं. आजच्या काळात हे सारं वाचताना आपल्याला ‘पीरियड फिल्म’ पाहिल्यासारखीच वाटते.  ‘या रहस्यकथा म्हणजे परदेशी कथांची इकडून तिकडून केलेली उचलेगिरी नसून त्यातल्या साऱ्या कल्पना या मूळच्या माझ्या आहेत आणि त्या कथा या पूर्णपणे माझीच निर्मिती आहे,’ असं शरदिन्दूंनी ठासून सांगितलेलं आहे.
१९९९ साली शरदिन्दूंची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्ताने ‘पेंग्विन’ने त्यांच्या काही निवडक कथांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध केले. अशोक जैन यांनी या इंग्रजी कथांचे अनुवाद केलेले आहेत. रहस्यकथेला साजेशा ओघवत्या मराठीत त्यांनी अनुवाद उतरवलेले आहेत. पण तरीही शॉवरला ‘तुषारस्नान’, पुस्तकाच्या शेल्फला ‘शिडाळी’, ग्रुप फोटोला ‘समूह फोटो’ असे काही गमतीशीर शब्द जैन यांनी का वापरले आहेत, ते समजत नाही. (‘सकाळचे साडेदहा वाजायला आले होते. उठून ‘तुषारस्नान’ घ्यावं, असा विचार करीत असतानाच टेलिफोनची घंटी अचानक वाजू लागली’ असं वाक्य वाचलं की बंगाली लोकांचं पान खाणंच अधिक आठवतं.)
शरदिन्दू बंडोपाध्याय यांचा आणि महाराष्ट्राचा जुना ऋणानुबंध आहे. १९३२ साली त्यांनी लेखनाला सुरुवात केली. नंतर १९३८ साली ते चित्रपटासाठी पटकथालेखन करण्यासाठी म्हणून मुंबईला आले. ‘बॉम्बे टॉकीज’ आणि अन्य कंपन्यांसाठी त्यांनी लेखन केलं. १९५२ पर्यंत ते मुंबईत होते. नंतर चित्रपटासाठीचे लेखन थांबवून त्यांनी पुन्हा ललित लेखन करायचं ठरवलं. त्यांनी त्यासाठी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी नंतरची १८ वर्षे बंगाली भाषेत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा, बालकथा असं विविध प्रकारचं लेखन केलं. आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं. १९७० मध्ये त्यांचं पुण्यातच निधन झालं. पुण्याचा आणि महाराष्ट्राचा शरदिन्दूंशी असा जवळचा संबंध आलेला आहे.
व्योमकेश बक्षींच्या तीन पुस्तकांच्या या संचाची निर्मिती रोहन प्रकाशननं त्यांच्या नेहमीच्या परंपरेला जागून देखणी केलेली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांची देखणी मुखपृष्ठं लाभलेला हा तीन पुस्तकांचा संच रोहन प्रकाशननं आकर्षक गिफ्ट पॅकमध्येही उपलब्ध करून दिलेला आहे. जुन्या काळात घडत असणाऱ्या या उत्कंठावर्धक, रोमहर्षक कथा जुन्या वाचकांना तर आवडतीलच, पण आजच्या नव्या पिढीलाही त्या आकर्षित करतील आणि खिळवून ठेवतील.


-मुकुंद टाकसाळे
व्योमकेश बक्षी - भाग १ (पृष्ठसंख्या - २०४) रु. १४०, व्योमकेश बक्षी - भाग २ (पृ सं - १७५) रु. १४०,व्योमकेश बक्षी - भाग ३ (पृ सं  - १७८) रु. १४०, ३ भागांचा संच - रु. ३५०
व्योमकेश बक्षी
लेखक - शरदिन्दू बंडोपाध्याय
अनुवाद - अशोक जैन

प्रकाशक - रोहन प्रकाशन

हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी इथे भेट द्या!

Sunday, February 5, 2012

सुरेश चांदवणकर
‘गॅलिलिओ गॅलिली’ (१५६४-१६४२) हे नाव घेतलं की अनेकांना पिसाचा झुकता मनोरा व तिथल्या चर्चमध्ये झुलणाऱ्या दिव्यावरून त्याला सुचलेली लंबकाची संकल्पना पटदिशी आठवेल. सत्तरच्या दशकात जे विज्ञानात पदवी परीक्षेचा अभ्यास करत होते त्यांना ‘लाइफ ऑफ गॅलिलिओ’ हे बरटॉल्ट ब्रेख्तचं अवांतर वाचनासाठी पण लेखी परीक्षेकरिता नेमलेलं नाटक आठवेल. आज इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्या कामाविषयी पुष्कळ माहिती शेकडो पानांमध्ये साठवून ठेवलेली वाचावयास मिळते. मात्र त्याच्या कुटुंबाविषयी फारच थोडी माहिती आढळते. देवा सोबल (kDeva Sobel) यांच्या ‘गॅलिलिओज् डॉटर’ या पुस्तकाने ही उणीव काहीशी भरून काढली आहे. त्या पत्रकार असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अक्षांश-रेखांशांची कल्पना मांडणारा जॉन हॅरिसन, सूर्य व पृथ्वीच्या स्थानांवरून व गतीबाबत धर्मपीठांशी संघर्ष ओढवून घेणारे कोपíनकस व गॅलिलिओ हे त्यांच्या खास अभ्यासाचे विषय असून लिखाणाचा बाज हा रसाळपणे गोष्टी सांगण्याचा असल्याने वाचकाला बांधून ठेवतो.
प्रस्तुत पुस्तकात गॅलिलिओच्या कौटुंबिक जीवनाची माहिती मिळते. मरिना गांबा या व्हेनिसच्या सुंदर तरुणीबरोबरच्या विवाहबाहय़ संबंधांतून १६०० ते १६०६ या काळात त्यांना तीन मुलं झाली. मोठय़ा दोन मुली (व्हर्जििनया व लिव्हिया) व व्हिन्सेनझियो हा मुलगा. तोवर त्याच्या वयाची चाळिशी उलटून गेलेली होती. मुलं लहान असतानाच मरिना गांबा मरण पावली. १९२० च्या आसपास ग्रँड डय़ूकच्या मत्रीतून त्यानं मुलाचा बाप्तिस्मा करवून घेतला. मुलगा त्याच्या कुटुंबाबरोबर अखेपर्यंत गॅलिलिओबरोबरच राहिला. मात्र दोन मुलींच्या समाजमान्यतेविषयी शंका असल्यानं व काहीशा असुरक्षिततेच्या भावनेतून गॅलिलिओनं दोन्ही मुलींना १०-१२ वर्षांच्या असतानाच जोगतिणी (Nuns) बनवायचं ठरवलं. त्यासाठी पण त्याला बडय़ा लोकांच्या ओळखीचा आधार घ्यावा लागला होता. फ्लॉरेन्समधल्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल करताना थोरल्या व्हर्जििनयाचं नाव बदलून Suor(सिस्टर)Maria Celeste Galile असं ठेवण्यात आलं. ती १९३४ मध्ये अवघ्या ३४ व्या वर्षी मरण पावली. कॉन्व्हेंटच्या बाहेरपण फारशी कधी पडली नाही. वडील कधीतरी येऊन भेटत. त्यांचं काम, राजघराण्याशी असलेली त्यांची मत्री व रोमच्या धर्मपीठानं दिलेली शिक्षा याविषयी ऐकीव माहितीच तिच्यापर्यंत पोहोचत असे. मात्र बापलेकीत नियमित पत्रव्यवहार होत असे. लेकीनं लिहिलेली १२४ पत्रं गॅलिलिओच्या जपून ठेवलेल्या कागदपत्रांतून अभ्यासकांच्या हाती लागली. मात्र बापानं लेकीला लिहिलेली पत्रं कॉन्व्हेंटच्या प्रमुख जोगतिणीनं जाळून टाकली. कारण गॅलिलिओ हा चर्चनं ठोठावलेली शिक्षा भोगणारा गुन्हेगार असल्यानं त्याची पत्रं सांभाळणं धोक्याचं ठरणारं होतं. त्यामुळं बापानं लिखाणातून व्यक्त केलेल्या भावना फारशा प्रकाशात आलेल्या नाहीत. पण इतरांशी केलेल्या पत्रव्यवहारातून ही मुलगी त्याची सर्वात लाडकी होती असं दिसतं.
१९२४ ते १९३४ या १० वर्षांत ही पत्रं लिहिलेली असून मूळ इटालियन भाषेतली ही पत्रं लेखिकेनं इंग्रजीत रूपांतरित केलेली आहेत. मोठी मुलगी या नात्यानं आईच्या पश्चात वडिलांचं खाणंपिणं, कपडे, औषधं व भावनिक आधार याबाबत तिची जागरूकता या पत्रांतून पानोपानी जाणवते. या लिखाणाभोवतीच लेखिकेने या अनोख्या पिता-पुत्रीची कहाणी लिहिलेली आहे. यानिमित्ताने गॅलिलिओचं चरित्र, तत्कालीन रोमन साम्राज्यातल्या राजसत्ता व धर्मपीठ यांचे नातेसंबंध व वैज्ञानिकांची झालेली ससेहोलपट या गोष्टींचा आढावा घेण्यात आलेला आहे.
एकूण सहा विभागांत व तेहतीस प्रकरणांत या ४०० पानी पुस्तकाची रचना केलेली असून रोमन काळातली रेखाचित्रं, नकाशे, शिल्पं इ.चा कल्पक वापर केलेला आढळतो. शेवटी काळानुसार महत्त्वाच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या यादीवरून एक नजर टाकली तरी एक मोठा कालखंड डोळय़ांसमोरून जातो. उदा. कोपíनकसनं(१४७३-१५४३)सूर्य हा केंद्रस्थानी असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, असं आयुष्याच्या अखेरीस लिहून प्रसिद्ध केलं. त्यानंतर २१ वर्षांनी गॅलिलिओ जन्माला आला.१६०० साली कोपíनकसच्या पुढे जाऊन ब्रुनोनं (Bruno) सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे असं मांडलं. या प्रमादाबद्दल शिक्षा म्हणून रोमच्या धर्मपीठानं त्याला जिवंत जाळून मारलं. अशा दहशतीच्या वातावरणात काम करायचं आहे याचं भान गॅलिलिओला होतं. त्यामुळेच अतिशय सावधपणे राजसत्तेशी मत्री करून व धर्मसत्तेशी जुळवून घ्यायचं धोरण त्यानं अंगीकारलं होतं. याची अनेक उदाहरणं या पुस्तकात आढळतात. ग्रहगोलांची स्थानं व भ्रमणावरचं कोपíनकसचं काम पुढ नेत असताना गॅलिलिओचं इतर अनेक विषयातलं स्वतचं काम व अध्यापनाबरोबरच पुस्तकं लिहिणं पण चालूच होतं.
स्वत: सश्रद्ध असूनही दुर्बणिीतून दिसणाऱ्या निराळय़ाच विश्वाचं दर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, अशी कळकळ त्याला होती. त्यामुळेच ‘दि डायलॉग’ हे संवादात्मक पुस्तक त्यानं लिहिलं व धर्मपीठाच्या परवानगीनंच १६३२ मध्ये प्रसिद्ध केलं. यात तीन मित्रांनी टोलेमी, कोपíनकस व गॅलिलिओच्या सिद्धांतांवरती गप्पा मारलेल्या आहेत. तेसुद्धा या तिघांची नावं न येऊ देता. त्याची भाषा ही अभिजनांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कुणालाही समजेल अशीच आहे. त्यामुळेच त्यावर गदारोळ उठला. पुढच्याच वर्षी चौकशी होऊन त्यावर बंदी घालण्यात आली. त्या चौकशी समितीसमोर झालेली मूळ प्रश्नोत्तरं पुस्तकात दिलेली असून ती मुळातूनच वाचावीत अशीच आहेत. १९३३ मध्ये शिक्षा म्हणून चर्चची जाहीर माफी मागावी लागली व एकांतवासाला सुरुवात झाली. पण तोवर पुस्तकाच्या काही प्रती व इतर हस्तलिखितं गुपचूप युरोपातल्या इतर देशांत जाऊन पोहोचली होती. १९३४ साली त्याची मुलगी सिस्टर सेलेस्ते मरण पावली. पण या सगळय़ा मन:स्तापाच्या काळात तिची पत्रं हाच मोठा दिलासा गॅलिलिओला होता.सुमारे ८० वर्षांच्या आयुष्यात गॅलिलिओनं इटलीतल्या पिसा, रोम व फ्लॉरेन्स शहरांमध्येच काम केलं. त्याच्या आयुष्यात त्यानं केलेल्या कामाला मान्यता मिळाल्याचं त्याला पाहायला मिळालं नाही. पण त्याच्या पुस्तकांच्या माध्यमातनं हे काम इतरत्र पसरलं व आधुनिक ‘विज्ञानाचा जनक’ अशी कीर्ती त्याला मरणानंतर लाभली. त्याचा पट्टशिष्य टॉरिसेली यानं या कामी बराच पुढाकार घेतला. ते काम व्हिन्सेंझो व्हिव्हियानी (१६२२-१७०३) या आणखी एका शिष्यानं पुढं चालवलं. १६४२ मध्ये निधन पावलेल्या गॅलिलिओचं शव त्याच्या इच्छेप्रमाणं त्याच्या कुटुंबीयांच्या दफनभूमीत पुरण्यात आलेलं होतं. ते नव्या जागी सन्मानानं भव्य स्मारकात हलवलं जावं, याकरिता व्हिव्हियानीनं आयुष्यभर अयशस्वी खटपट केली. तो गेल्यावर त्याची शवपेटिका त्याच्या इच्छेप्रमाणं गुरू गॅलिलिओच्या शवपेटीवर पुरण्यात आली. पुढं अनेकांच्या प्रयत्नांना यश येऊन गॅलिलिओचं शव १७३७ मध्ये खास तयार केलेल्या स्थळी समारंभपूर्वक हलवण्यात आलं. त्यावेळच्या उत्खननात गॅलिलिओच्या शवपेटीखाली आणखी एक शवपेटी आढळली. ती पेटी पण सन्मानपूर्वक नव्या ठिकाणी हलवण्यात आली. आजही ती तिथं आहे पण तिच्यावर "Suor Maria Celeste Galilei" या नावाची पाटी मात्र नाही. १८३५ मध्ये त्याच्या ‘दि डायलॉग’ हय़ा पुस्तकावरची बंदी मागं घेण्यात आली. १९३५ मध्ये पोपच्या हस्ते व्हॅटिकन वेधशाळेचं (ऑब्झर्वेटरी) उद्घाटन झालं. त्यानं मांडलेले सिद्धांत व केलेली अनेक भाकितं आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकानं अनेक पारितोषिकं मिळवली. ते वाचून अलीकडेच खगोलशास्त्रांनी ‘शुक्रा’वरील एका विवराला (क्रेटरला) Suor Maria Celeste हे नाव दिलेलं आहे.


सौजन्य:लोकसत्ता

Related Posts Plugin for WordPress, Blogger...