Saturday, November 26, 2011


गेली काही वर्षे दहशतवाद हा जगाला भेडसावणारा आणि चिंतित करणारा प्रश्न जिथे-तिथे हिरीरीने मांडला जात आहे. त्याच्या बीमोडाकरिता अब्जावधी रुपयांची बरसात प्रत्येक देश आपापल्या क्षेत्रात करीत आहे. हा दहशतीचा प्रश्न एकदा निकालात निघाला की मग जणू सारे अरिष्ट चिंता मिटून जग आनंदमयी होणार, असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते आहे आणि त्यामुळे यापेक्षाही काळजीदायक वास्तवाकडे नकळत आपली डोळेझाक होत आहे. दहशतवादाचा उगम होण्यामागे आहे ते जगातील भयानक दारिद्रय़ आणि निरक्षरता. आज सारा समाज या वस्तुस्थितीला विचारातच घेत नाही. एक तर तो स्वत:च्या कोषात तरी पूर्ण दंग आहे वा दहशतवादाच्या सावटाखाली.
पण सर्व आलबेल वाटणाऱ्या जगातील न दिसणाऱ्या या दारिद्रय़ाची, या निरीक्षरतेची जाणीव मायक्रोसॉफ्टमधील तरुण अमेरिकन व्यावसायिक जॉन वूडने   `Leaving Microsoft to Change The World'   या आपल्या पुस्तकाने जगाला पुन्हा एकदा करून दिली आहे. जॉन वूडचे हे पुस्तक म्हणजे योगायोगाच्या प्रवासाची कहाणी आहे. जॉन हा सुट्टीत नेपाळमध्ये गिर्यारोहण करायला येतो तेव्हा हिमालयाच्या सान्निध्याने अध्यात्माकडे ओढला जातो. सारं जग विसरून तो सुट्टी आनंदाने उपभोगतो. जवळच्या खेडेगावातील एका लहानशा शाळेत तेथील गावकऱ्यांच्या आग्रहामुळे जातो आणि पुढे.. पुढे त्याचे सारे आयुष्यच बदलते.
या शाळेतील एका खोलीत कुलपात बंद करून ठेवलेली मोजकीच तीन-चार पुस्तके म्हणजे शाळेचे ग्रंथालय. रस्त्यावर सहजी रद्दीत मिळणारी ती पुस्तके, पण त्याचं अप्रूप तेथील निरागस मुलांना, त्यांच्या शिक्षकांना अपार, अमूल्य ठेव्याप्रमाणे ती पुस्तके हाच त्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास.
जॉन वूड आपल्या पुस्तकात पुढे लिहितो की, ७० टक्के निरक्षरता असलेल्या नेपाळमध्ये एवढय़ाशा खेडय़ातील ही शिक्षणाकरिता तरसणारी मुलं पाहून मला माझं बालपण आठवलं. तिथून निघताना मला गलबलून आलं. ‘सर, तुम्ही परत या, पण येताना पुस्तकं घेऊन या,’ या विनंतीनं तर मी अश्रूमय झालो. त्यांना पुस्तके आणण्याचं आश्वासन मी दिलं तर खरं, पण त्यांच्या पुढच्या वाक्यांनी जमिनीवर वास्तवात आलो. शिक्षक म्हणत होते, ‘आजवर हजारो प्रवासी आले, आश्वासन देऊन गेले, पण कुणीच परतलं नाही.’
नाटक-सिनेमाची कथा वाटावी, या पद्धतीने जॉन वूडने हा प्रवास कथन केला आहे. अध्यात्माची गोडी लागलेला जॉन वूड अंतर्मुख होऊन श्रीमंत देशांच्या तुलनेतील ही भयाण दारिद्रय़ाची, निरक्षरतेची दरी पाहतो. स्वत:ची लठ्ठ पगाराची नोकरी, जगभरातील मोठमोठय़ा शहरांतील भ्रमंती, साऱ्या सुखसोयींची मुबलकता याची त्या लहानग्या शाळेशी तुलना करू लागतो. अस्वस्थ होतो, बुद्ध मठात जातो, चिंतन ध्यानधारणा करतो आणि प्रचंड मानसिक घालमेलीत त्रस्त होतो. अमेरिकेत परतल्यावरही त्याला नेपाळी मुलांचे चेहरेच खुणावत राहतात.
बिल गेट यांच्या दौऱ्यावर जेव्हा तो चीनला जातो तेव्हा तेथील मोठय़ा टेलिव्हिजन इन्टरव्ह्य़ूकरिता बिल गेट यांचा सहाय्यक म्हणून रात्रंदिवस राबतो. बिल गेट मुलाखत देतात, पण जॉन वूडच्या त्यामागच्या श्रमाला फारशी किंमत देत नाहीत आणि वूडच्या मनात ही सारी श्रीमंती, संपत्ती, हजारो कोटींचे व्यवहार, त्यांनी अजून श्रीमंत होणारी मोजकी राष्ट्रे, माणसे याबद्दल घृणा निर्माण होते. केवळ भरपूर पैसे व सुरक्षिततेचं कवच याला आहारी जाऊन माझी तितकीशी जरुरी नसलेल्या बिल गेटकडे मी नोकरी करणं व ७० टक्के निरक्षर, पण ज्ञानाची आस असणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं समर्थनीय आहे? आज त्यांना माझी जरुरी असताना माझ्या केवळ स्वार्थापोटी त्यांच्याकडे पाठ फिरविणे योग्य आहे? आणि या साऱ्या विचारमंथनाने एका ‘नव्या’ जॉन वूडचा जन्म होतो. एकोणिसाव्या शतकात  Andrew Cornegie  हा धनाढय़ पोलाद व्यावसायिक अमेरिकेत अगदी वेगळ्या पद्धतीने जीवन जगला आणि इतिहासात अजरामर होऊन गेला. एका क्षणी अ‍ॅण्ड्रय़ूने आपला सारा धंदा विकून (१९०१ मध्ये) मिळालेली सारी संपत्ती  ($ 200 million) शिक्षण, ग्रंथालये यांच्या निर्मिती प्रसाराकरिता ट्रस्ट करून जनतेला देऊन टाकली आणि तो भौतिक सुखांपासून दूर झाला. अ‍ॅण्ड्रय़ू हा जॉन वूडचा आदर्श होता, त्याला समोर ठेवून त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत, त्याचे अनुकरण करीत जॉन वूडने आपल्याला भरपूर पैसा, सुखसुविधा मिळवून देणाऱ्या नोकरीचा त्याग केला आणि नेपाळ हे आपले कार्यक्षेत्र ठरविले आणि त्यातून उभी राहिली ‘खोली ग्रंथालयाची’  (Room To Read) ची संकल्पना.
पुस्तकातील ही सुरुवातीच्या प्रकरणातील जॉन वूडच्या मानसिक  हेलकाव्यांची कहाणी, तर नंतरची पुढची सारी प्रकरणे म्हणजे वृद्धिंगत होत जाणारे ‘रूम टू रीड’च्या यशस्वितेचे प्रगतीपुस्तक आहे. जॉन वूडने केलेले प्रयत्न, त्याच्या वडिलांकडून, मैत्रिणीकडून, अनेक अनोळखी लोकांकडून मिळालेला पाठिंबा, हजारोंनी पुस्तकांची जमवाजमव सारे स्तिमित करणारे आहे. ग्रंथालयापासून सुरू झालेली वूडची कल्पना यात्रा पुढे शाळा उभारणीकडे वळते. केवळ एकच देश (नेपाळ) सोडून व्हिएतनाम, कंबोडिया, श्रीलंका, भारत इथपर्यंत पसरते. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीस असताना दिनरात  `Nothing Small Every Thing Big'   हे एकच घोषवाक्य सतत जॉनच्या कानांवर पडायचे. त्याच्याच परिणामी हेच सूत्र या सामाजिक कार्यातही त्याने राबविले आणि आशिया-आफ्रिकेतील सात देशांमध्ये अल्पावधीत प्रचंड मोठे स्पृहणीय काम उभे केले. जगभरातून सतत मदतीचा ओघ चालू राहण्याकरिता भिक्षा मागीत भ्रमंती चालू ठेवली.
आज ५० लाख मुलांना साक्षर करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. मुलास साक्षर केले तर फक्त तो मुलगा साक्षर होतो, पण एक मुलगी साक्षर झाली तर सारं कुटुंब साक्षर होतं, यावरच्या श्रद्धेने तो मुलींना हलाखी अज्ञानातून बाहेर काढण्याकरिता धडपडतो आहे.
अनेक पारितोषिके मिळालेल्या त्याच्या या ‘विना नफा संस्थे’ने चार हजारांहून अधिक ग्रंथालये, ४० लाखांहून अधिक पुस्तकांचे वाटप/निर्मिती, ४०० शाळांची उभारणी, तर चार हजार मुलींना शिष्यवृत्ती देऊन शिक्षण प्रसाराचं आगळंवेगळं काम अनेक देशांतून केलं आहे.
हे पुस्तक अधूनमधून थोडंसं कंटाळवाणं वाटणारं, काही ठिकाणी आत्मप्रौढी मिरविणारं जरी असलं, तरी निलरेभी व्यावसायिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्यही कसं यशस्वितेचं शिखर गाठू शकतं, याचं समाजकार्याची आवड, तळमळ असणाऱ्यांकरिता मार्गदर्शक आहे.
नवश्रीमंतीचे वारे जगभर वाहत असताना, नवनवीन चैनीची उपभोगाची साधने सहजी उपलब्ध होत असताना आणि परदेशवारीचे ग्रह साऱ्यांच्याच भाग्यरेषेवर चमकत असताना दारिद्रय़ाचा सभोवताली पसरलेला अंधार आणि त्यातील लाखो निरक्षर हे अजून दूर काळोखात लोटले जाताहेत. समाज श्रीमंती शिखराकडे कूच करताना प्रत्येक पायरीने दारिद्रय़ाची दरी खोल खोल होत जाते आहे. पण काळोखाकडे बघायचेच नाही म्हटल्यावर व बघितल्यास शिखर चढतानाची पायरी घसरून खाली पडण्याची भीतीच बाळगल्यावर उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाची पहाट तरी कधी उगवणार? म्हणूनच जॉन वूडचं मोठेपण जाणवतं ते त्याच्या निश्चयात. संपन्न अमेरिकेतील मोठय़ा पगाराचा सत्ता-संपत्तीचा लोभ सोडून त्याने घेतलेल्या निर्णयात.`Leaving Microsoft to Change the World' हे पुस्तक म्हणजे जॉन वूडची कृतिगाथा नुसती वाचनीयच नाही तर अनुकरणीय आहे.

लीव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड:
लेखक : जॉन वूड
प्रकाशक :  हार्पर,  पृष्ठे : २७८
मूल्य :  १६.९९ यूएस डॉलर 

कुमार नवाथे - लोकसत्ता ग्रंथविश्व
kumar.nawathe@hotmail.com

Thursday, November 10, 2011

विश्वास दांडेकर,लोकसत्ता ग्रंथविश्व
 १५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य आले ते फाळणीच्या जखमा घेऊन. या ना त्या कारणामुळे आज ६४ वर्षांनंतरही या जखमा भरलेल्या नाहीत, भरली एखादी तरी पुन्हा उघडते. साहजिकच फाळणी-पाश्र्वभूमी-इतिहास-परिणाम यावर एक ग्रंथालय भरेल, एवढे लिखाण झाले आहे. याच धारेतले हे पुस्तक. प्रश्न असा आहे की, आता या विषयावर नवे काय सांगायचे शिल्लक आहे? त्यासाठी हे पुस्तक अवश्य अभ्यासायला हवे. 
फाळणीची कारणे नोंदताना : १) जीनांचा हट्टाग्रह २) ‘फोडा-झोडा’ ही ब्रिटिश नीती ३) नेहरू-पटेल यांना सत्ता स्वीकारण्याची घाई ४) महात्मा गांधींचा मुस्लीम अनुनय ५) अखंड भारत स्वीकारून प्रत्येक बाबतीत जीनांना ‘व्हेटो’ (नकाराधिकार) देऊन राष्ट्र दुबळे ठेवण्यापेक्षा तुकडा तोडण्याचा नेहरू-पटेल यांचा निर्णय  ६) अनेक तुकडे होण्यापेक्षा पाकिस्तान देऊन उरलेला भारत अखंड ठेवणे (सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्युजती पंडित:) असा विचार, अशी अनेक कारणे, त्याचे पुरावे-अनुमान-तर्क मांडले गेले आहेत. ‘अटळ निर्णय’ ते ‘फाळणीचे गुन्हेगार’ असा मोठा पट या कारणमीमांसेत व्यापला आहे.
एक मुद्दा सहजच लक्षात येतो की, वरील सर्व गोष्टी या भारतीय उपखंडातले घटक-घटना केंद्रस्थानी ठेवून मांडल्या आहेत. भारताच्या फाळणीला एक फार महत्त्वाचा मोठा पदर हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे (आजही अस्तित्वात) याकडे पुरेसे लक्ष दिलेले नव्हते. सरीला यांनी त्या गोष्टीला प्राधान्य देत अनेक बाबी नव्याने प्रकाशात आणल्या.
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) व दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) या विश्वव्यापी महायुद्धांनी अत्यंत बलशाली ब्रिटिश साम्राज्य कोसळले. जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर १९४७ ला स्वातंत्र्य शक्य नव्हते, हे आपण मनोमन स्वीकारलेले नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी आपणास गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत. मात्र पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नौदल अमेरिकेच्या नौदलापेक्षा लहान झाले व दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून पुढे येत ब्रिटनचे जागतिक महत्त्व संपले. सुंभ जळला पण पीळ? हा पीळ केविलवाणी वळवळ पुढे काही काळ करत राहिला. (सुवेझ १९५६, युद्धात भारतानेच प्रथम आक्रमण केले- १९६५ भारत-पाकिस्तान युद्ध- ब्रिटिश प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य.) या पीळ जपण्याच्या भावनेतून भारत सोडताना त्यातला पश्चिमेचा भाग (गिलगिट ते कराची हा पट्टा) हा त्या पलीकडच्या तेल क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी (इराण, इराक, आखाती देश, सौदी अरेबिया) आपल्याला सैनिकी तळ उभारू देईल, अशा मंडळींच्या ताब्यात हा पट्टा हवा. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर येणार असलेली काँग्रेस साम्राज्यवादविरोधी असल्याने तळ उभारू देणार नाही म्हणून फाळणी, असा विचार पक्का झाला, कृती झाली. याचे लिखित पुरावे लेखकाने तपशिलात दिले आहेत.
भारतात एकेकाळच्या अमेरिकेविरोधी तयार केलेल्या मानसिकतेमुळे दोन गोष्टी ठळकपणे मांडल्या जात नाहीत. १) भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी केलेले मोठे प्रयत्न व २) काश्मीरचे भारतातले विलीनीकरण कायदेशीर आहे ही अमेरिकेची सुरुवातीची भूमिका. १९४६ साली पं. नेहरूंच्या (अंतरिम) इंटेरिम मंत्रिमंडळाची सत्तेत स्थापना होणार हे लक्षात येताच ब्रिटनचा विरोध डावलून अमेरिकेने नवी दिल्ली येथे स्वत:चा राजदूत तातडीने नेमला. या सर्व घटनांचे तपशील पुस्तकात आहेत.
‘खनिज’ तेल या गोष्टीला अतोनात महत्त्व आले, ते साधारण गेल्या १००-११० वर्षांत. मात्र त्या आधी हाच गिलगिट ते कराची हा पट्टा रशिया दक्षिणेकडे हातपाय पसरेल या अनाठायी भीतीपोटी ब्रिटनला सामरिक महत्त्वाचा वाटत असे. याला आवर घालणे या बुद्धिबळाच्या खेळाला नाव पडले ‘द ग्रेट गेम’. ब्रिटन जाऊन अमेरिका आली, रशिया जाऊन चीन आला. ‘ग्रेट गेम’ सुरूच आहे. या पट्टय़ाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात वायव्य सरहद्द प्रांत जर भारताच्या बाजूला ठेवता आला असता तर पाकिस्तानची निर्मिती शक्य झाली नसती. कारण पश्चिम तेल क्षेत्राकडे भौगोलिक सलगता मिळत नव्हती. खान अब्दुल गफारखानांना बाजूला सारत हा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वाला हूल देत ब्रिटिशांनी कसा आपल्याला अनुकूल सोडवला त्याचा तपशील थक्क करणारा आहे.
महंमद अली जीना व त्यांचा फुलवलेला अहंकार हे खरे तर प्यादे होते. काँग्रेसच्या स्थापनेपासून (१८८५) १९४७ पर्यंत मुस्लीम समाज कधीच स्वातंत्र्य चळवळीत नव्हता. जीना काँग्रेसमध्ये असताना वा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना मुस्लीम जनतेत अनुयायी किती? अगदी १९४५-४६ पर्यंत पंजाब, सिंध, बंगाल व सरहद्द प्रांत (स्थापनेच्या वेळचा पाकिस्तान) इथले निवडून आलेले सत्ताधारी मुस्लीम पक्ष व नेते जीना व पाकिस्तान यांच्याविरोधीच होते. हे सर्व भाग मुस्लीम बहुसंख्येचे, त्यामुळे त्यांना ‘एक व्यक्ती-एक मत’ याआधारे सत्ता मिळतच होती, हिंदू बहुसंख्येची भीती नव्हती. जीनांना पाठिंबा आजच्या भारतातल्या - विशेषत: बिहार-उत्तर प्रदेश इथल्या मुस्लीम नेते-अनुयायांचा होता. हे सर्व राजकारण ब्रिटिशांनी कसे घडवले याचे काही नवे तपशील पुस्तकात आहेत. सिमला योजना ही एक हूल- धूळफेक होती. फाळणी करायची, पण ही मागणी जीनांप्रमाणे काँग्रेस नेतृत्वानेही करावी यासाठी भारताची अनेक शकले होण्याची शक्यता असलेली ही योजना एकमेव नव्हे. क्रिप्स मिशन, सिमला, कॅबिनेट मिशन हे सर्व एकाच माळेचे मणी. मात्र एकदा काँग्रेस नेतृत्वाने फाळणी स्वीकारल्यावर भारताचे आणखी तुकडे फाळणीच्या वेळी होणार नाहीत हे तत्त्व प्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी जपले.
गांधीजी १९२० पासून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्वोच्च नेते होते. १९३९ साली युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी व्हाइसरॉयना भेटून युद्ध प्रयत्नाआड काँग्रेस येणार नाही, असे आश्वासन दिले होते. ४ सप्टेंबर १९३९ रोजी सिमला येथे व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांना गांधीजी म्हणाले होते की, ते स्वत: या लढय़ाकडे एक इंग्रज पाहील तसे पाहतात आणि ब्रिटिश संस्कृतीच्या इमारती, संस्था यांना युद्धामुळे जी हानी पोचण्याची शक्यता आहे, त्याने ते फार अस्वस्थ आहेत.
भावना दाटून आल्यामुळे हे सर्व बोलताना गांधीजींचा कंठ दाटून येत होता व त्यांना त्या आवेगापोटी एका धारेत बोलणे अशक्य झाले होते. तेच गांधीजी १९४० च्या मध्याला जर्मनीने फ्रान्स जिंकल्यावर त्याच लिनलिथगो यांना सांगतात : ‘तुमच्या राष्ट्राचा ताबा जर्मनीकडे जाऊ देण्याचे धैर्य दाखवा. जर हिटलर तुमची घरे ताब्यात घेऊ पाहील तर घरे रिकामी करा. जर हिटलर तुम्हाला देश सोडून जायला प्रतिबंध करेल, तर मुले-स्त्रिया-माणसे सर्वानी मरणाला सामोरे जा.’ थोडक्यात, अहिंसा- मग नष्ट झाला तरी चालेल. (या १९४० च्या संभाषणाचा तपशील मौलाना आझादांच्या पुस्तकातही आहे.) गांधीजींचा हा अनाहूत ‘सल्ला’ जीवन-मरणाचा लढा देणाऱ्या राष्ट्राच्या मनात काय तरंग उमटवील?
थोडक्यात : स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी जीनांना पाठबळ दिले. मात्र दुसरे महायुद्ध ऐन भरात असतानाच युद्धोत्तर स्वतंत्र भारतात आपले तळ ‘तेल क्षेत्रा’साठी हवेत म्हणून फाळणी घडवून आणली. जीनांनी माघार-तडजोड असा मार्ग चोखाळला असता तर दुसऱ्या कुठल्या तरी साधनाने परतणाऱ्या ब्रिटिश सत्तेने फाळणी घडवलीच असती.
इतिहास-राज्यशास्त्राचे विद्यार्थी-प्राध्यापक यांनी अभ्यासलेच पाहिजे, सुजाण नागरिकांनी वाचलेच पाहिजे,असे हे पुस्तक अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत, संशोधन शिस्त न सोडता लिहिण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे.
हा परिचय लेख लिहिताना लेखक नरेंद्रसिंग सरिला यांच्या निधनाचे वृत्त आले. मध्य भारतातल्या एका लहानशा संस्थानचा हा राजपुत्र माऊंटबॅटन यांच्या ताफ्यात एडीसी म्हणून होता. पुढे भारतीय परराष्ट्र खात्यात निरनिराळ्या पदांवर कार्यरत राहत फ्रान्समध्ये भारताचा राजदूत झाला. परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यावर ‘नेस्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीत वरच्या पदावर काही काळ त्यांनी व्यतीत केला. भूव्यूहात्मक विश्लेषण करणारे लिखाण ते करत असत.
हा पुस्तक परिचय लेख ही भारताच्या या सुपुत्राला श्रद्धांजली. 

The Shadow of the Great Game: The Untold Story of India's Partition
 द शॅडो ऑफ द ग्रेट गेम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज् पार्टिशन- नरेंद्रसिंग सरिला.
प्रकाशक : हार्पर-कॉलिन्स २००५,
पुठ्ठा बांधणी आवृत्ती २००९.
पृष्ठसंख्या-४३६, मूल्य रु. : ६००/-.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...